छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. दरम्यान वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन भावांचा समावेश आहे. सिल्लोड तालुक्यातील मौजे सारोळा येथे यश राजू काकडे (वय १४) व रोहित राजू काकडे (वय २१) या दोन भावांचा शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून मृत्यू झाला. तसेच मोढा बु. येथील रंजना बापूराव शिंदे (वय ५०) आणि शिवाजी सतीश गव्हाणे यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.
शनिवारी दिवसभर अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी पडून गेल्या. काही भागांत मुसळधार पाऊस झाला. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेडचे वार्ताहर कळवितात की, जिल्ह्यात ९ जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासहित पाऊस बरसल्याने केळीसकट सर्वच फळबागांना तडाखा बसला. केळी बागांचे नुकसान झाले असताना बाजारात केळीचे दरही गडगडले.
आडत आणि कट्टीच्या नावाखाली केळी उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केळी व्यापारी आणि शेतकरी वर्गाची बैठक बोलावली. या बैठकीत केळी व्यापाऱ्यांच्या समन्वयातून जिल्हाधिकारी कर्डिले यांनी टपाल व बीजक खर्च रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध प्रकारचे कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शनिवारी नांदेडमध्ये कोरडा दिवस. धाराशिव जिल्ह्यातही सायंकाळी पावसाळी वातावरण तयार झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.