मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. महिलेकडे बघून शिट्टी वाजवल्याप्रकरणी तीन जणांवर लैंगिक अत्याचारासह अन्य गुन्हे दाखल केले होते. पण, शिट्टी वाजवल्याने लैंगिक अत्याचार होत नाही, असं मतं नोंदवत औरंगाबाद खंडपीठाने तीन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रार करणारी महिला आणि तीनही आरोपी अहमदनगरमध्ये एकमेकांचे शेजारी आहेत. महिलेच्या आरोपांनुसार आरोपी गच्चीवरून शिट्टी वाजवणे, घरातील भांडे वाजवणे आणि सतत गाडीचा हॉर्न वाजवणे असे कृत्य करतात. याप्रकरणी महिलेने एससी/एसटी कायद्याअंतर्गत तसेच, धमकी देणे, हल्ला करणे, पाठलाग करणे आणि लैंगिक अत्याचार असा गुन्हा तिघांवर दाखल केला होता. या तीन आरोपींमध्ये एका महिलेचाही सहभाग आहे.
हेही वाचा : मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतोष बांगर यांचा प्राचार्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, “महिलेवर…”
याप्रकरणाची सुनावणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकनवाडी आणि न्यायमूर्ती अभय वाघवसे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. यावर न्यायालयाने म्हटलं की, “शिट्टी वाजवल्याने किंवा अन्य आवाज काढल्याने आरोपीने लैंगिक अत्याचार केला, असा निष्कर्ष ठरत नाही. याप्रकरणात आरोपींविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचं समोर येत आहे,” असं न्यायालयाने सांगितलं.