मनसे कमकुवत झाल्याने गेल्या वेळी जिंकलेल्या जागांवर यंदा शिवसेना व भाजपचा डोळा असून, मनसेची मते कोणाकडे वळू शकतात याचा अंदाज दोन्हीकडून घेतला जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गेल्या वेळी मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. पाच वर्षांपूर्वी होती तशी हवा यंदा मनसेची दिसत नाही. गतवेळच्या तुलनेत मनसे कमकुवत झाल्याचा फायदा उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, पण त्याच वेळी मनसेची मते आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपही प्रयत्नशील आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मनसेच्या जागा कमी झाल्या होत्या. त्याचा फायदा भाजपला झाला होता. २०१०च्या तुलनेत २०१५च्या पालिका निवडणुकीत मनसेचे संख्याबळ घटले. मनसेच्या जागा कमी झाल्या, पण त्याचा फायदा भाजपला झाला होता. पुणे आणि नाशिकमध्ये मनसेच्या फुटिरांनी भाजप आणि शिवसेनेचा मार्ग स्वीकारला. मनसेच्या मतांचा फायदा उठविण्याचा भाजपचा या दोन्ही शहरांमध्ये प्रयत्न आहे.
गेल्या वेळी मिळालेल्या जागा किंवा मते यंदा मनसेला मिळण्याची शक्यता कमी आहे. ही मते आपल्याकडे वळविण्याकरिता शिवसेना प्रयत्नशील आहे. मनसेच्या पारंपरिक मतदारांना भाजपपेक्षा केव्हाही शिवसेना अधिक जवळची आहे. परिणामी, ही मते शिवसेनेला मिळू शकतात, असे सेनेचे गणित आहे. कल्याण-डोंबिवलीच्या धर्तीवर मुंबईतही मनसेची मते आपल्याला कशी मिळतील याचे नियोजन भाजपच्या वतीने केले जात आहे. मनसेच्या ताब्यातील ८ ते १० जागा मिळाल्या तरी संख्याबळात वाढ होऊ शकते, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील आपला प्रभाव कायम ठेवण्याकरिता मनसे प्रयत्नशील आहे. पण गेल्या वेळच्या तुलनेत मते न मिळाल्यास पक्षाची अडचण होऊ शकते.
काँग्रेस झाकोळलेली
शिवसेना आणि भाजपच्या लढतीत काँग्रेस पक्ष कोठेही फारसा चर्चेतही दिसत नाही. काँग्रेसने गेल्या रविवारी मालवणी येथे प्रचाराची सुरुवात आणि जाहीरनाम्याचे प्रकाशन केले, पण मालवणीतील त्या सभेला मिळालेला प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता, असे काँग्रेसच्या गोटात बोलले जाते. पक्षांतर्गत गटबाजी कमी होऊन गुरुदास कामत हे प्रचारात सहभागी झाले असले तरी काँग्रेसचा तेवढा जोर दिसत नाही. राष्ट्रवादी आपले वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्येच ताकद लावून आहे. काँग्रेसने आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसला एमआयएमची भीती आहे. मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएम किती मतांचे विभाजन करते याचा काँग्रेस नेत्यांना अद्याप अंदाज येत नाही. उत्तर भारतीय मते ही भाजप आणि काँग्रेसमध्ये विभागली जातील. शिवसेना आणि भाजपच्या लढतीत काँग्रेसला स्थान मिळविणे कठीण जात आहे.