एअर इंडियाचा नवा लोगो सादर करण्यात आला आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचं रीब्रँडिंग करण्यात आलं असून टाटा समुहाने एअर इंडियाचा ब्रँड कलर, लोगो आणि इतर चिन्हं बदलली आहेत. कंपनीने आज (१० ऑगस्ट) एका मोठ्या लाईव्ह इव्हेंटचं आयोजन केलं होतं. यामध्ये कंपनीचा नवीन लोगो लॉन्च करण्यात आला. यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, एयर इंडिया ही कंपनी टाटा समुहासाठी व्यवसाय नसून ते आमचं पॅशन (आवड) आहे. ते आमचं राष्ट्रीय मिशन आहे. एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान कंपनी बनवण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला आहे.
एअर इंडिया कंपनी टाटा समुहाकडे परत आल्यापासून एअर इंडियाला उभारी देण्यावर भर दिला जात आहे. नवीन लोगोमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगासह जांभळा रंग वापरण्यात आला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी हा नवीन लोगो लॉन्च केला.
हे ही वाचा >> Money Mantra : घर, वाहन अन् इतर कर्जदारांसाठी RBI चा नवा प्रस्ताव, बदलत्या व्याजदरांपासून दिलासा मिळण्याची शक्यता
या लॉन्चिंगप्रसंगी एन. चंद्रशेखरन म्हणाले, टाटा समूह गेल्या १५ महिन्यांपासून एअर इंडिया कंपनीचा कायापालट करण्यावर काम करत आहे. तंत्रज्ञान, ग्राउंड हँडलिंग यावर आगामी काळात काम केलं जाईल. यासाठी आम्ही आमची सर्वोत्त टीम दिली आहे. तसेच आमच्या या विमान कंपनीने विमानांची संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स दिल्या आहेत. आम्ही तंत्रज्ञानावर सर्वाधिक भर देत आहोत आणि येत्या ९ ते १२ महिन्यांत आमच्याकडे सर्वोत्तम तंत्रज्ञान असेल.