मागच्या आठवड्याची गोष्ट सांगते. एका जोडप्याचं आर्थिक समुपदेशन सुरू होतं. लग्नाला अजून एक वर्षपण झालं नव्हतं. पण पुढील आर्थिक आयुष्य सुखकर करण्यासाठी नवरा-बायको दोघेही सज्ज होते. नवरा एका खासगी कंपनीत बेताच्या पगाराची नोकरी करत होता, तर बायको निमसरकारी नोकरी सांभाळत होती. तिचा पगार मात्र कमी होता. त्यांचा आर्थिक आराखडा त्यांना समजावला तर त्या दोघांनी एकच प्रश्न मला विचारला- ‘थोडा वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला. आम्ही दोघेही नोकरी जरी करत असलो तरी आमच्या मित्र-मैत्रिणींचे पगार बघून आम्ही कुठे तरी मागे राहिलो आहोत असं वाटतं. आता आमच्यावर फारशी काही जबाबदारी नाही, पण पुढे काय करावं जेणेकरून आमचे पगार वाढतील आणि त्यानुसार आम्ही जी कोणती ध्येयं बाळगत आहोत ती पूर्णत्वाला नेताना आम्हाला फार काटकसर नाही करावी लागणार?’

त्या दोघांचं हे बोलणं तसं साधंच होतं. परंतु त्यातून कुठेतरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे – चांगला पगार कसा मिळवावा? आता चांगला पगार म्हटला की, चांगल्या ठिकाणी नोकरी हवी, त्या नोकरीला पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि तंत्रज्ञानाचा फटका बसू नये, काळानुसार वाढीव जबाबदारी आणि त्यानुसार पगारामधील वाढ मिळावी, शक्य तितकं पगार आणि वार्षिक बोनस नियमित मिळावा हे सर्व आलंच! आणि यासाठी आलं योग्य शिक्षण आणि मुळात अभ्यासात आणि इतर बाबतीत असणारी व्यक्तिगत कामगिरी.

आज आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा पाहतो तर आपल्याला लक्षात येत आहे की, शिक्षणाचे पर्याय आणि खर्च अतोनात वाढलेले आहेत. आधीच्या काळात सरकारी शाळांमधून आणि अनुदानित महाविद्यालयांमधून रास्त खर्चात शिक्षण मिळत होतं. शिवाय नोकरीच्या संधीसुद्धा बऱ्यापैकी असल्याने सर्वसाधारण कुटुंब चांगलं राहणीमान जगत होतं. चांगल्या नावाजलेल्या महाविद्यालयांमधून पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलांना देशात आणि परदेशात नोकरीच्या चांगल्या संधी मिळत होत्या.

परंतु याच गोष्टीचा आज आपण एक वेगळाच अनुभव घेतोय. शहरी भागामध्ये खासगी शाळा, निरनिराळे बोर्डांचे प्रकार, तऱ्हेतऱ्हेचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे पर्याय जरी उपलब्ध असले तरी ते अतिशय महाग आहेत. शिवाय एवढं सर्व करून, निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा देऊन पुढे जेव्हा नोकरी मिळते तेव्हा अनेकांच्या बाबतीत असं लक्षात येतं की, लाखोने खर्च केला, पण नोकरी मिळते मासिक काही हजारांच्या पगाराची! एक ढोबळ गणित मांडायचं तर ५० लाख ओतले आणि नोकरी मिळाली १५ लाखांची, खर्च वसूल करायला लागणार ५०/१५ म्हणजे ३.३३ वर्षे, आणि तेसुद्धा जेव्हा १५ लाख आपल्या खात्यात जमा होतील तेव्हा. (कर वजावट, भविष्य निर्वाह निधी, नॅशनल पेन्शन स्कीम इत्यादींची कात्री लागून मासिक पगार कमी होतो!) जर हाच आकडा १० लाख असेल तर ५ वर्षे लागतील. याला ‘पेबॅक पिरियड – Payback Period’ म्हणतात.

इथे जर शैक्षणिक कर्ज असेल, तर त्यावरील व्याजसुद्धा देणं लागतं. चार वर्षांच्या कोर्ससाठी जर ५० लाखांचं कर्ज ९ टक्के व्याजदराने घेतलं असेल, आणि पाचव्या वर्षी २० लाख पगार असलेली नोकरी मिळाली तर ७७ लाखांची परतफेड करायला ३.८५ वर्षे लागतील. आणि हाच खर्च जेव्हा परदेशी वास्तव्य करून पेलावा लागतो तेव्हा अनेक पालकांच्या आणि त्यांच्या मुलांच्यासुद्धा नाकी नऊ येताना लक्षात येत आहे.

हे सर्व करून मुळात ती नोकरी किती टिकाऊ आहे हे कोणी बघतं का? काही नोकऱ्या बँकेतील मुदत ठेवींसारख्या असतात – हमी जास्त, जोखीम कमी… पगार बेताचाच आणि पगारवाढ नियमित पण दर कमी. तर काही नोकऱ्या समभागांमधील गुंतवणुकीसारख्या असतात – मजबूत पगारपण पगाराच्या वाढीचा दर नक्की नाही, अनियमित बोनस (कधी भरपूर, तरी कधी काहीच नाही), अजिबात हमी नाही. शिवाय कंपनी आज असेल तर तीन वर्षांनी नसेल अशी दाट शक्यता! त्यामुळे सगळ्याच बाबतीत प्रश्नचिन्ह – खात्रीशीर कमी पगाराची नोकरी की बेभरवशाची पण कमी काळात भरपूर पैसे मिळवायची संधी देणारी नोकरी पत्करावी? एकीकडे पगार मिळेल, पण वाढ महागाईनुसार तरी असेल का हा प्रश्न आणि दुसरीकडे पगारच मिळेल की नाही हा प्रश्न. पुढे बढती मिळवण्यासाठीसुद्धा भरपूर मेहनत घ्यावी लागते. अनेकदा लक्षात येतं की, नोकरी मिळाली तेव्हा पगार चांगला होता, परंतु पुढे मात्र चांगली वाढ नाही. इथे कधी आपल्याकडे हवे ते कौशल्य नसतं किंवा जे काम आपण करतो त्याला पुढे फार काही वाव नसतो. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि तंत्रज्ञान यामुळे कमी खर्चात जर कामं होणार असतील तर ते कोणाला नको! याशिवाय प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येत अभ्यास करून महाविद्यालयांमधून बाहेर पडणारी नवीन मुलं, ज्यांच्या पगाराच्या अपेक्षा कमी असतात आणि ज्यांना कमीतकमी वेळात नवीन तंत्रज्ञान शिकवून कामासाठी तयार करता येतं. तेव्हा या मुलांकडूनसुद्धा आपल्याला स्पर्धा आहे आणि ती वर्षागणिक वाढत चालली आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात घेता काय बरं करता येऊ शकतं? शिक्षण घेताना आपण नक्की कोणत्या कामासाठी घेतोय, त्यात कोणती जोखीम आहे, किती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होऊ शकतो, सामान्य व्यवस्थापन करायचंय की, विशिष्ट क्षेत्रात संशोधन करायचंय की, फार डोक्याला त्रास नसलेली रोजची कामं करायची आहेत. या गोष्टी जर आधी ठरवल्या तर योग्य दिशेने मेहनत घेऊन, पैसे खर्च करून आपल्याला आवडेल आणि आपल्या कौशल्यानुसार व क्षमतेनुसार साजेशी नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. पुढे बढतीसाठी काय करावं याचा विचारसुद्धा योग्य वेळीच करावा. आपल्या नोकरीला गृहीत धरू नका. आपल्याला कोणत्या गोष्टी खूप छान करता येतात, कुठे स्पर्धा कमी आहे, कोणतं कौशल्य वाढवून आपण आपलं महत्त्व वाढवू शकतो यासाठी नेहमीच विचार, अभ्यास आणि कृती झाली पाहिजे.

तरीही एक अजून गोष्ट लक्षात असू द्या की, कंपनी कोणतीही असो, तिथे डोक्याची कामं करणारे लोक किती आहेत, त्यांना कोणते अनुभव असणं महत्त्वाचं आहे, रोजची कामं व्यवस्थित करण्यासाठी माणसं आणि मशीन कशा वापरल्या जातात, कंपनीचा फायदा कशावर अवलंबून आहे, जे काम आज हातात आहे त्यापेक्षा वरच्या पातळीचं काम किती सहजपणे मिळू शकतं, आपल्याकडे असं काही खास कौशल्य आहे का ज्यासाठी कंपनीने आपल्याला इतरांपेक्षा जास्त पगार किंवा बोनस द्यावा, असे प्रश्न वेळोवेळी आपण विचारावे आणि त्याची माहिती मिळवून पुढील प्रगतीचा आराखडा मांडावा. नोकरीतून होणारी मिळकत या गोष्टींवर अवलंबून असते – कंपनीची कामगिरी, आपण काम करत असलेल्या विभागाची कामगिरी, आपली वैयक्तिक कामगिरी, सरकारी कायदे आणि पुढे अपेक्षित असलेली अर्थव्यवस्थेतील वाढ. यात अजून गडबड होऊ शकते ती नोकरीतील निरनिराळ्या राजकारणाची. हे समीकरण फार क्लिष्ट असतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यावर लक्ष ठेवावं. दक्ष राहा, प्रयत्नशील राहा, फक्त नोकरीवर अवलंबून नका राहू, खर्च सांभाळत गुंतवणूक वाढवा, योग्य वेळी दुसरी नोकरी शोधा, कोणता उद्योग किंवा व्यवसाय स्वबळावर सुरू करता येईल यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळवून जोखीम क्षमतेनुसार नोकरी सोडायचा निर्णय घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळ साधा. आपल्याकडे काही खेळाडू आणि नट-नट्यांची उदाहरणं आहेत ज्यांनी खूप कमी कालावधीत भरपूर कमाई केली, पण त्यांच्याकडे विशिष्ट कौशल्य होतं. शिवाय कमी कालावधीत मिळालेले भरपूर पैसे जर चांगल्या पद्धतीने गुंतविले तरीसुद्धा गरजा भागवल्या जाऊ शकतात. परंतु सगळेच स्पेशालिस्ट नसतात. म्हणून आपण काय आहोत, काय शिकून काय बनू शकतो आणि पुढे स्वतःची प्रगती कशी करू शकतो हे प्रत्येकाने स्वतः तपासलं पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर हा विचार करणं ही काळाची गरज आहे. कर्ज घेऊन शिकताना आपण नक्की काय, कधी आणि किती मिळविण्यासाठी धडपड करतोय याचं भान ठेवलं तर त्यातून फायदा नक्कीच होईल. परंतु मित्र-मैत्रिणी करतात, कर्ज मिळतंय, परदेशी शिक्षणाचं आकर्षण म्हणून घेतलेले निर्णय डोईजड तर होतात पण पुढे अपेक्षाभंगसुद्धा होतो. त्यातून मिळणारी निराशासुद्धा त्रासदायी असते. आपल्या शिक्षणाला आणि त्यानंतर मिळणाऱ्या नोकरीला एका गुंतवणुकीसारखं समजा. शैक्षणिक खर्चाचा ‘पेबॅक पिरियड’ जमेल तितका कमी ठेवा, नोकरी मिळाल्यावर किंवा व्यवसाय सुरू केल्यावर तेथील कामगिरीकडे नीट लक्ष द्या, वेळीच उच्च कौशल्य मिळवा, धोक्याची चिन्हं ओळखा आणि मोठे निर्णय घ्यायच्या आधी चहुबाजूने विचार करा. भावनिक राहिल्याने संधी कमी होऊ शकतात, तेव्हा अतिशय खोलवर विचार करून व्यवहारचातुर्याने निर्णय घ्या. ९९ टक्के मेहनत आणि १ टक्का नशीब हे ध्यानात ठेवा आणि प्रगतिशील आणि प्रयत्नशील राहा. यशप्राप्ती योग्य वेळी होईल ही सदिच्छा!

  • तृप्ती राणे
    trupti_vrane@yahoo.com
    प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.