मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर’च्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध फेरनिवड झाली. केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना नुकताच समारंभपूर्वक अध्यक्षपदाचा कार्यभार प्रदान करण्यात आला.
शतकमहोत्सव समारोह सुरू झालेल्या वर्षात अध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याचा गौरव प्राप्त करण्याऱ्या ललित गांधी यांच्या पदभार प्रदान कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा आणि अनुभव हे येणाऱ्या काळातील विकासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे अमित शाह यांनी नमूद केले आणि आगामी शंभर वर्षासाठीचे नियोजन करावे, असा सल्ला दिला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर संस्थेने उद्योग, व्यापार आणि शेतीच्या क्षेत्रात नवे उद्यमी तयार करण्याची मुहूर्तमेढ रोवली. देशात अनेक चेंबर ऑफ कॉमर्स/इंडस्ट्री नाव असलेल्या संस्था आहेत. पण कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर असे एकत्रित नाव असलेली ही एकमेव संस्था असून, याच संस्थेच्या माध्यमातून ‘फिक्की’सारख्या संस्थेची निर्मिती झाली, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र चेंबरचे संचालक मंडळातील सदस्य बी.जी.खेर हे स्वातंत्र्यानंतरचे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले यावरून महाराष्ट्र चेंबरचा प्रभाव लक्षात येऊ शकतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
पुढे ते म्हणाले, आज शेठ वालचंद हिराचंदजी यांचे स्मरण अतिशय महत्त्वाचे आहे, कारण देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्या भूमिपुत्रांपैकी ते एक आहेत. त्यांनी या संस्थेची निर्मिती केली व हजारो लोकांना प्रेरणा दिली. शेठ वालचंदजी यांनी रोपटे लावलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर या संस्थेचे आताचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात या संस्थेसाठी 100 वे वर्ष ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या उद्योग व्यापार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, या क्षेत्राचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून प्रभावी नेतृत्व करू अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.