लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबईः रिझर्व्ह बँकेने ग्राहक कर्जावरील जोखीम भार मात्रा २५ टक्क्यांनी वाढवल्यामुळे, बँका आणि बँकेतर वित्तीय कंपन्यांकडून (एनबीएफसी) मुख्यतः वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे. मध्यवर्ती बँकेच्या नव्या निर्णयामुळे येत्या तिमाहीत बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या नफ्यावर देखील परिणाम होण्याची भीती व्यक्त केली गेली आहे.

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी, १६ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून बँका आणि एनबीएफसीच्या ग्राहक कर्जावरील जोखीम भार तरतूद थेट २५ टक्क्यांनी तात्काळ प्रभावाने वाढवत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे व्यक्तिगत कर्ज आणि क्रेडिट कार्डावरील उसनवारी थकल्यास, जोखमीपासून संरक्षण म्हणून भांडवलातून (जोखीम भार – रिस्क वेटेज) तरतूद बँकांसाठी १०० टक्क्यांवरून १२५ टक्के, तर एनबीएफसीसाठी १२५ वरून १५० टक्के झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या निर्णयाने या कर्ज प्रकारात दिसून आलेल्या वाढीला बांध घातला जाईल आणि बँकांनाही अशा कर्ज व्यवसायासाठी उच्च लक्ष्य राखण्यापासून परावृत्त केले जाईल, अशी अपेक्षा आहे.

आक्रमक कर्ज वाढ

कर्जासंबंधित ताज्या आकडेवारीनुसार, बँकांचे वैयक्तिक कर्ज वाटप सप्टेंबर २०२३ अखेर ४८.२६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे सप्टेंबर २०२२ मध्ये ३७.०२ लाख कोटी रुपये झाले. सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत, खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्र बँकांनी त्यांच्या असुरक्षित कर्ज घटकामध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याच बँकांच्या अन्य प्रकारच्या कर्जांसह, पतपुरवठ्यातील एकंदर वाढ या कालावधीत जेमतेम दोन अंकी पातळीवर आहे.

आता रिझर्व्ह बँकेच्या कठोर भूमिकेमुळे आता या प्रकारच्या कर्जवाटपासाठी अतिरिक्त भांडवल उभारणे बँकांसाठी गरजेचे ठरेल, असे रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर आर गांधी म्हणाले. ते शक्य न झाल्यास, या कर्ज घटकाअंतर्गत बँकांचा व्यवसाय प्रभावित होऊन, त्यांचा नफाही कमी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरा मार्ग म्हणजे या कर्ज प्रकारांसाठी निधी जुळवणे जितके महागडे ठरेल, त्या प्रमाणात ही कर्जेही महाग केली जाणे म्हणजे त्यांच्या व्याजदरात वाढ होणे क्रमप्राप्त दिसेल, असा विश्लेषकांचे म्हणणे आहे.


अपवाद कोणत्या कर्जांचा ?

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या परिपत्रकानुसार, वाणिज्य बँकांच्या (विद्यमान तसेच नवीन) व्यक्तिगत कर्जाचा जोखीम भार वाढला आहे. मात्र गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज यासारखी तारणयुक्त सुरक्षित कर्जे यातून वगळण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे एनबीएफसीकडून वितरित गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज आणि बचत गटाला दिलेली कर्जे नव्या नियमातून वगळली गेली आहेत.


बँकांच्या भांडवली पर्याप्ततेवर ०.६ टक्क्यांनी वाढ – एस अँड पी

असुरक्षित वैयक्तिक कर्जासाठी जोखीम भार वाढवणारा रिझर्व्ह बँकेच्या कठोर निर्णयामुळे बँकांच्या भांडवली पर्याप्ततेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा फटका बँकापेक्षा आणि बँकेतर वित्तीय कंपन्यांना अधिक बसेल आणि दोहोंचे प्रथम श्रेणी भांडवली पर्याप्तता प्रमाण ६० आधार बिंदू (०.६ टक्के) घटू शकेल, असे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सने शुक्रवारी स्पष्ट केले. कर्जाची हळूवार वाढ आणि जोखीम व्यवस्थापनावर भर वाढल्यामुळे भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील पत गुणवत्ता सुधारण्याला मदत होईल, अशी पुस्तीही या संस्थेने जोडली आहे.


बँका आणि बँकेतर वित्तीय कंपन्यांच्या समभागात घसरण

मुंबई: असुरक्षित कर्ज वाटपाशी संबंधित रिझर्व्ह बँकेच्या कठोर नियमामुळे शुक्रवारी भांडवली बाजारात बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांच्या समभागांना विक्रीच्या ताणाचा सामना करावा लागला आणि या समभागांनी तीन टक्क्यांहून मोठी घसरण अनुभवली.

मुख्यत: स्टेट बँकेसह, एसबीआय कार्ड्स, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह आघाडीच्या बँकेतर वित्तीय कंपन्यांचे समभाग जबर घसरले. क्रेडिट कार्ड व्यवसायात असलेल्या एसबीआय कार्ड्सचा समभाग ५.९१ टक्क्यांनी घसरून ७३४.२० रुपयांवर बंद झाला. तसेच स्टेट बँक समभाग ३.७२ टक्के म्हणजेच २१.७५ रुपयांनी घसरला आणि ५६२.९० रुपयांवर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात हा समभाग ३.६४ टक्के घसरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲक्सिस बँक ३.०३ टक्के, कॅनरा बँक २.०२ टक्के, आरबीएल बँक ७.८२ टक्के, पंजाब नॅशनल बँक २.११ टक्के, आयसीआयसीआय बँक, १.४५ टक्के, फेडरल बँक १.४० टक्के हे मुंबई शेअर बाजारातील सर्वाधिक फटका बसलेले बँकिंग समभाग ठरले. या सर्वांचे प्रतिनिधित्व करणारा बीएसई बँकेक्स इंडेक्स १.४८ टक्क्यांनी गडगडला. बरोबरीने बँकेतर क्षेत्रातील, बजाज फायनान्सचा समभाग शेअर्स १.९१ टक्क्यांनी घसरून ७२२१.७५ रुपयांवर बंद झाला. तर पेटीएमचा समभाग २.०३ टक्क्यांनी घसरून ८८७ रुपयांवर बंद झाला. उज्जीवन फायनान्स ५ टक्के, आयआयएफएल फायनान्स ३.०८ टक्के असे अन्य घसरण झालेले समभाग होते.