धनादेश वटणावळीसाठी लागणारा दोन दिवसांपर्यंतचा कालावधी कमी करून, ४ ऑक्टोबरपासून तो अवघ्या काही तासांवर आणण्याचे रिझर्व्ह बँकेने वाणिज्य बँकांना निर्देश दिले. मात्र ही घोषणा हवेतच विरली असून, प्रत्यक्षात अजूनही बहुतांश बँक शाखांमध्ये दोन दिवस सरले तरी धनादेश वटले नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

रिझर्व्ह बँकेने बँकिंग व्यवस्थेत बदल करत धनादेश वटणावळीसाठीची ‘चेक ट्रंकेशन सिस्टम (सीटीएस)’ ही प्रचलित प्रणाली बदलून, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि बँक ग्राहकांची व्यवहार पूर्ततेची (सेटलमेंट) जोखीम कमी करण्यासाठी ‘सेटलमेंट ऑन रियलायझेशन’ म्हणजेच आधी वसुली नंतर पूर्तता आणि निरंतर वटणावळीचा हा बदल अंमलात आणला. तथापि धनादेश वटणावळीसाठीचा तीन दिवसांचा कालावधी बँकांना अजूनही तासाभरावर आणता आलेला नाही.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘एनपीसीआय’कडून बँकांसाठी देयक प्रणाली राबवली जाते. मात्र बँकांकडील सॉफ्टवेअर प्रणाली आणि एनपीसीआयची देयक प्रणाली यांच्या एकात्मीकरणात (इन्टिग्रेशन) समस्या येत आहे. या तांत्रिक समस्येमुळे, आउटवर्ड क्लिअरिंगचे हजारोंनी धनादेशांवरील प्रक्रिया प्रलंबित आहे, असे खासगी बँकेतील अधिकाऱ्याने सूचित केले.

रिझर्व्ह बँकेची धनादेश वटणावळीसाठीची अंमलबजावणी जानेवारी २०२६ पासून अपेक्षित होती. मात्र मध्यवर्ती बँकेने ४ ऑक्टोबरपासून प्रणाली लागू केल्याने बँकिंग प्रणालीवर दबाव निर्माण झाला आहे. अनेक बँक शाखांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आणि कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण दिले नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी धनादेश वटणावळीसाठी लागणाऱ्या स्कॅनरसारख्या पायाभूत सुविधा देखील अपुऱ्या आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने स्वतः खासगी क्षेत्रातील एका मोठ्या बँकेत धनादेश वटणावळीसाठी दिल्यानंतर या शाखेत सध्या ही त्वरित वटणावळीची सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर शाखेत पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देण्यात आले.

सहकारी बँकांकडून संदेश

सहकारी बँकांनी धनादेश वटणावळीसाठी तांत्रिक समस्येमुळे विलंब होत असल्याचे संदेश ग्राहकांना पाठवले आहेत. गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी निधी हस्तांतरणासाठी एनईएफटी, आरटीजीएस, यूपीआय, नेट/मोबाइल बँकिंग सारख्या पर्यायी डिजिटल पद्धतीचा वापर करण्याचे सुचविले आहे.

बँकेच्या कर्मचाऱ्यांवर सध्याच्या धनादेश वटणावळीच्या नवीन प्रणालीमुळे प्रचंड ताण आला असून, १२ तासांपेक्षा अधिक आणि रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते आहे. रिझर्व्ह बँकेने पुरेसे प्रशिक्षण न देता थेट निर्देश दिल्याने प्रत्यक्ष प्रणाली वापरताना बँका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. – देविदास तुळजापूरकर, सचिव, ‘यूनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ (महाराष्ट्र).

हेही वाचा

अनेक बँकांमध्ये धनादेशचे आउटवर्ड क्लिअरिंग सकाळी चारपर्यंत सुरू आहे. शिवाय ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कामकाज केले जात आहे, त्यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. एका दिवसांत हजारो धनादेशांचे स्कॅनिंग करण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे. – विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ बँकिंगतज्ज्ञ

विलंब का?

  • सुधारित प्रणालीबाबत प्रशिक्षणाचा अभाव
  • पायाभूत सुविधांची कमतरता
  • बँकांना प्रणाली अद्ययावत करण्यासाठी अल्प कालावधी
  • घाईघाईने स्कॅनिंगमुळे, अस्पष्ट आणि अपूर्ण धनादेशाच्या छायाचित्राने चुका