पीटीआय, नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या असलेल्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडा-आयडिया यांनी सरलेल्या सप्टेंबर महिन्यात १ कोटी ग्राहक गमावले आहेत. तर या स्पर्धेमध्ये आश्चर्यकारकरीत्या सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची सरशी झाली. सप्टेंबरमध्ये सुमारे ८.५ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत, असे ट्रायने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओने ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर २०२४ मध्ये ७९.६९ लाख ग्राहक गमावले आहेत. यासह रिलायन्स जिओचे वायरलेस ग्राहकांची संख्या सप्टेंबरमध्ये ४६.३७ कोटी आहे. जिओ खालोखाल व्होडाफोन आयडियाने १५.५३ लाख आणि भारती एअरटेलला १४.३४ लाख ग्राहक सोडून गेले आहेत. याकाळात बीएसएनएलने ८.४९ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तर भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे सप्टेंबर अखेर ३८.३४ कोटी आणि २१.२४ कोटी ग्राहक होते. सप्टेंबरमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या एकूण संख्या ९.१८ कोटी झाली आहे.

हेही वाचा : अदानींवर डॉलरमधील रोखे विक्री गुंडाळण्याची नामुष्की, ‘वेदान्त’ची योजनाही बारगळली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवाढीमुळे फटका

खासगी दूरसंचार कंपन्यांनी जुलैमध्ये मोबाइलच्या दरात प्रत्येकी १० टक्के ते २७ टक्क्यांची वाढ केली होती. परिणामी ग्राहकांच्या महिन्याकाठी दूरसंचार सेवेवर होणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिमाणसी महसुलात वाढ होणार आहे. मात्र सरकारी कंपनी बीएसएनएलने प्रतिस्पर्ध्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे टाळत दरवाढ केली नाही. शिवाय दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी ऑक्टोबर महिन्यात स्पष्ट केले.