गेले काही आठवडे बाजार सतत दबावाखाली आहे. भांडवली बाजारातील निर्देशांक डळमळीत आहेत, परदेशी गुंतवणूकदार (एफपीआय) मोठ्या प्रमाणावर शेअर विक्री मारा करत आहेत, कंपन्यांची कमाई आणि पी/ई गुणोत्तरे खालावलेत, अमेरिकेची शुल्क धोरणाबाबतची भाषा अधिक भडक होत आहे आणि सोने-चांदी दोन्हींचे भाव झपाट्याने वाढले आहेत. जागतिक आर्थिक अस्थिरता आणि भूराजकीय तणाव यात भर घालत असून या वातावरणात प्रश्न असा उद्भवतो की, ऑक्टोबर महिन्यांत बाजाराचे चित्र पालटेल का?

१. कंपन्यांची कमाई आणि पी/ई नरमाई: गुंतवणुकीसाठी संधी?

गेल्या वर्षभरात भारताच्या कंपन्यांच्या कमाईतील वाढ मंदावली आहे आणि पी/ई गुणोत्तर कमी होत आहे, जे सूचित करते की, गुंतवणूकदारांच्या जवळच्या काळातील परताव्याच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत. ही गोष्ट गुंतवणूकदारांसाठी नक्कीच चांगली आहे. जेव्हा अपेक्षा कमी होतात, तेव्हा उच्च-गुणवत्ता असलेल्या कंपन्यांचे मूल्यांकन सामान्य पातळीवर असते. या मूल्यांकनावर खरेदी केलेल्या खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो.

२. परदेशी गुंतवणूकदार: अल्पकालीन व्यापारी, दीर्घकालीन समर्थक नव्हेत

‘एफपीआय’ हे जागतिक तरलता आणि स्वतःच्या कामगिरीच्या दडपणानुसार हालचाल करणारे संधीसाधू असतात. ते दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूकदार नाहीत. वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत त्यांनी सुमारे १.१६–१.१७ लाख कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढले आहेत. हे भारतीय बाजाराच्या कामगिरीपेक्षा जागतिक व्याजदर चढ-उताराचे द्योतक आहे.

३. देशांतर्गत ‘एसआयपी’चा मजबूत प्रवाह

भारतीय किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या सहभागामुळे ‘एफपीआय’ने केलेल्या विक्रीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेवर मात करणे शक्य झाले आहे. जुलै २०२५ मध्ये गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’च्या माध्यमातून विक्रमी २८,४६४ कोटी गुंतविले. ही गुंतवणूक बाजाराच्या स्थैर्यात खूप मोठी भूमिका बजावत आहे.

४. मान्सून, महागाई आणि ग्रामीण अर्थव्यवस्था

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विद्यमान वर्ष २०२५ मध्ये दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे १०६ टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान अपेक्षित आहे. शेतीचे उत्पन्न वाढल्यामुळे ग्रामीण क्रयशक्ती पुनर्जीवित होईल. पुरेशा कृषी उत्पादनामुळे अन्नधान्याच्या किमती कमी होऊन महागाई नियंत्रणात राहील. किरकोळ महागाई झपाट्याने कमी होत आहे. जुलै २०२५ मध्ये किरकोळ महागाई अर्थात ‘सीपीआय’ १.५५ टक्क्यांपर्यंत कमी झाला, परिणामी ऑगस्टच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपोदरात अर्ध्या टक्क्याची कपात करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे तसेच वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ दर कपातीमुळे ग्राहकांच्या हातात जास्त क्रयशक्ती राहील आणि रिझर्व्ह बँकेला आक्रमक पावले उचलण्याची गरज नाही.

५. जागतिक पुनर्संरेखन: भारतासाठी संधी

अर्थकारणापलीकडे पाहता भू-राजकारणात भूकंपासारखे बदल घडत आहेत. भारताने एकाच वेळी अमेरिका, रशिया, चीन आणि इतर राष्ट्र गटांशी विविध पातळींवर बस्तान बसवायला नव्याने सुरुवात केली आहे. तसेच जागतिक पुरवठा साखळीत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ‘चीन प्लस वन’ पर्याय शोधणाऱ्या पाश्चात्त्य कंपन्या भारतात अधिक थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) करण्याचा विचार करीत आहेत. या जागतिक पुनर्रचनेमुळे पुढील दशकात देशात उत्पादन, निर्यात आणि भांडवली गुंतवणूक वाढू शकते.

६. रुपया आणि ‘कॅपेक्स’ सायकल

रुपया प्रतिडॉलर ८७.८० ते ८८.२० या पातळीवर बऱ्यापैकी स्थिर आहे. एकंदरीत विनिमय दरात सापेक्ष स्थैर्य असून अनेक वर्षांनंतर खासगी भांडवली गुंतवणूक वाढेल अशी चिन्हे आहेत. गुंतवणूकदारांसाठी हा सकारात्मक संकेत आहे.

७. हिरवे कोंब दिसू लागलेत, पण मुळे अजून नाजूक

शांघाय सहकार संघटनेच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी केलेले विधान, ‘भारत-चीनशी आता वसाहतकालीन भाषेत बोलता येणार नाही’, भारताच्या भू-राजकीय प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब करते. ‘जीएसटी’ परिषदेची सुधारणात्मक पावले उत्पादन, उपभोग आणि रोजगाराला बळ देणारी आहेत. तरीसुद्धा महागाई घटली, मान्सून जोरदार आहे, भांडवली खर्च अर्थात ‘कॅपेक्स’ वाढू लागला तरीही अपेक्षेइतपत बाजारात सुधारणा झालेली नाही. यावरून स्पष्ट होते की, हिरवे कोंब दिसू लागलेत, पण मुळे अजून घट्ट व्हायची आहेत.

८. गुंतवणुकीचा मंत्र : ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल’

जेव्हा सर्वकाही छान चाललेले असते, तेव्हा नफा कमावणे सोपे नसते. परंतु जेव्हा निराशेचा अंधकार असतो आणि बाजार मोठ्या घसरणीला सामोरा जात असतो, तेव्हा योग्य गुंतवणूक करून चांगला ‘अल्फा’ बहुतेकदा कमावता येतो. सध्याचा परिप्रेक्ष्य हा संयमी आणि लवकर सुरुवात करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य काळ ठरू शकतो.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

साहसी गुंतवणूकदार (तुम्हाला अस्थिरता सहन करता येत असेल तर): वित्तीय, भांडवली खर्च/औद्योगिक उत्पादने, तंत्रज्ञान सेवा आणि अक्षय्य ऊर्जा-आधारित उद्योगांवर लक्ष केंद्रित करा. ‘स्टेप-अप एसआयपी’ किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करत राहा. तळ पकडण्याच्या प्रयत्नात वेळ वाया घालवू नका.

स्थैर्य हवे असल्यास लार्ज-कॅप किंवा बाजारातील विस्तृत निर्देशांकाधारित (इंडेक्स) फंडांत गुंतवणूक करा, सोन्या/चांदीमध्ये ५-१० टक्के गुंतवणूक ठेवा. थोडी तरलता (रोख/डेट) राखून ठेवणे आवश्यक असून बाजार अजून खाली आला तर संधी घेता येईल.

निष्कर्ष

बाजारातील तेजी सुरक्षित वाटली तरी बहुतेकदा कमी फायदेशीर असते. मंदीत बाजार गोंधळलेले असले तरी नफा कमाविण्याच्या संधी आहेत. मान्सून चांगला सुरू आहे, महागाई उतरली आहे, देशांतर्गत ‘एसआयपी’ प्रवाह भक्कम आहे. रुपया एका पातळीवर तग धरून आहे. शिवाय वाढता भांडवली खर्च, जीएसटी सुधारणा उपभोगाला चालना देणार आहेत. जागतिक पातळीवर अस्थिरता कायम असली तरी राजकारण भारताच्या बाजूने फिरताना दिसते आहे. ऑक्टोबरमध्ये बाजार उसळी मारेल की नाही हे पहायचे आहे. पण हे लक्षात ठेवा की, समभाग गुंतवणूक ही ५-१० वर्षांसाठी करायची असते केवळ ५-१० महिन्यांसाठी नाही. जे सैन्य शांततेत घाम गाळते त्या सैन्याचे लढाईत कमी रक्त वाहते. त्याप्रमाणे जे मंदीत खरेदी करतात तेच तेजीचा लाभ घेताना दिसतात. अस्थिरतेत शिस्तबद्ध गुंतवणूक करीत राहणे हा मोठा लाभ मिळवण्याचा राजमार्ग आहे.