रणरणतं उन, उष्णतेचा वाढता पारा, असह्य उकाडा अशी मे महिन्याची ओळख. पण या वर्षी ‘गर्मी मे थंडी का एहसास’ निसर्गाने दाखविला. मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाचा १०७ वर्षांचा उच्चांक मोडत, या वर्षी मे महिन्यात उन्हाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यातील दवबिंदू हे शीतल चांदण्यासारखे भासत होते. निसर्गात असे सुखद बदल घडत असताना, आमची निफ्टी थोडीच पाठी राहणार! निफ्टीनेदेखील निसर्गाच्या प्रसन्न सुरात ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ म्हणत सरलेल्या सप्ताहात, २५,०००च्या वरच्या लक्ष्याला पुन्हा एकदा गवसणी घातली आणि गुंतवणूकदारांना तेजीच्या चांदण्यात न्हाऊन काढलं.
येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने २४,७०० चा स्तर सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २५,००० ते २५,२००, द्वितीय लक्ष्य २५,५०० ते २५,८०० असे असेल. ही नाण्याची एक बाजू झाली. निफ्टी निर्देशांक २४,७०० स्तराखाली सातत्याने टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २४,५००, २४,२००, २४,००० ते २३,८०० असेल.
चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेची
हल्ली कामाच्या धकाधकीत गुंतवणूकदारांना इच्छा असूनही आपल्या समभाग संचाकडे (पोर्टफोलिओकडे) लक्ष्य द्यायला वेळ मिळत नाही. कंपन्याचे तिमाही वित्तीय निकाल हे महत्त्वाचे वळणबिंदू असतात. त्यातच हल्ली कंपनीचे तिमाही वित्तीय निकाल नितांत सुंदर पण, निकाल जाहीर झाल्यावर भांडवली बाजारात समभागाचा भाव गडगडतो. या विपरीत जाहीर झालेला वित्तीय निकाल निराशाजनक पण भांडवली बाजारातील समभागाच्या किमतीत अल्पशी घसरण होऊन नंतर भरीव सुधारणा होते. मग दोहोंपैकी नेमकं खरं काय? या गोंधळाच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांच्या पैशांची हेळसांड होऊ नये म्हणून तांत्रिक विश्लेषण (टेक्निकल ॲनालिसीस) आणि मूलभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसीस) यांमधील सोनेरी संकल्पना एकत्र करून त्यावर अभ्यास करून गुंतवणूकदारांसाठी साधी, सोपी अशी ‘निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना विकसित केली. प्रत्यक्ष निकालानंतर समभागाचा भाव ‘महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तर’ राखण्यास यशस्वी ठरल्यास जाहीर झालेला निकाल चांगला. असा समभाग राखून ठेवावा अथवा अल्पमुदतीसाठी खरेदी करून नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य झाल्यावर नफारूपी विक्री करावी. निकालानंतर समभागाचा भाव ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखण्यास अयशस्वी ठरल्यास, समभागाच्या खरेदीपासून काहीकाळ दूर राहावे. या पार्श्वभूमीवर ‘महत्त्वाचा केंद्र बिंदू स्तर’ या संकल्पनेची चिकित्सा ही ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ या न्यायाने व्हायला हवी.
तथापि ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरली का? यासाठी आपण या स्तंभातील २६ मे २०२५ च्या लेखातील ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ ब्रीदासह भारतात जीवन विम्याची मुहूर्तमेढ रोवणारी, पाया घालणारी, विमा क्षेत्रातील आघाडीची ‘एलआयसी ऑफ इंडिया लिमिटेड’ या समभागाच्या मांडलेल्या निकालपूर्व विश्लेषणाचा आधार घेऊ. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही २७ मे होती. २३ मेचा बंद भाव ८६० रुपये होता. प्रत्यक्ष निकालाआधी गुंतवणूकदारांना आर्थिक चिंतन, मनन करायला एक दिवसाचा कालावधी होता. प्रत्यक्ष निकाल जेव्हा जाहीर झाला, तेव्हा मूलभूत विश्लेषणातील (फंडामेंटल ॲनालिसीस) संकल्पनांचा आधार घेता, वार्षिक निकाल नितांत सुंदर होता. नफ्यात ३८ टक्क्यांची वृद्धी होऊन, तो १३,७६३ वरून १९,०१३ कोटी रुपये झाला. नवीन विमापत्र संकलनाचे हप्ते (प्रीमियम) हे ६२,४९५ कोटी जे ८.२८ टक्यांची व्यवसाय वृद्धी दर्शविणारे होते. संचालक मंडळाचा भविष्यकालीन आशादायक दिशानिर्देशन वगैरे प्रत्यक्ष निकालाची वैशिष्ट्ये ठरली. प्रत्यक्ष निकालाअगोदर मूलभूत विश्लेषणातील ही माहिती, तांत्रिक विश्लेषणातील ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेत रूपांतरित केली गेली. ज्यायोगे निकालापश्चात समभागाचा बाजारभाव ८४० रुपयांचा ‘महत्त्वाचा केंद्र बिंदूस्तर’ राखण्यात यशस्वी ठरल्यास लेखात नमूद केलेले ९२५ रुपयांचे वरचे लक्ष्य साध्य होणार हे गृहीत धरावे, असे सूचित केले होते. झालंही तसंच प्रत्यक्ष निकालानंतर दुसऱ्याच दिवशी २८ मेला ‘एलआयसी’ने ९४८ रुपयांचा उच्चांक मारत, लेखात नमूद केलेलं ९२५ रुपयांचे वरचे लक्ष्य साध्य केले. त्या समभागाचा साप्ताहिक बंद भाव (शुक्रवार ३० मेचा बंद भाव) ९५४ रुपये आहे. आशीष ठाकूर लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.