रणजित कुलकर्णी
सध्याच्या काळात भेडसावणारे सर्वाधिक खर्चाचे तीन मुद्दे म्हणजे शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि निवृत्ती वेतन. पूर्वी निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन हे सरकारी नोकरीचे एक महत्त्वाचे आकर्षण होते. मात्र वर्ष २००३-४ मध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना बंद होऊन सर्व नवीन नोकरदार वर्गाला नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली आहेत.

आतापर्यंतच्या निवृत्ती वेतन योजना या ‘डिफाइन्ड बेनिफिट स्कीम’अंतर्गत येत होत्या. म्हणजे ठरावीक मुदतीनंतर ५५/६० व्या वर्षी निवृत्त होताना अथवा स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेताना आपल्याला किती निवृत्ती वेतन मिळणार आहे, याची माहिती आपल्याकडे असायची. आता मात्र सर्व योजना या ‘डिफाइन्ड कॉन्ट्रिब्युशन स्कीम’मध्ये मोडतात. म्हणजे तुम्ही किती पैसे भरणार आहात, किती काळ भरणार आहात, हे तुम्हाला माहिती आहे. पण त्यानंतर वयाच्या ५५ किंवा ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यावर किती निवृत्ती वेतन मिळणार हे नक्की नाही. ही रक्कम अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे तुमची जमा रक्कम त्यावरचे व्याज अथवा ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’ आणि तत्कालीन व्याजदर. या सर्व गोष्टींच्या एकूण जमा निधीवर ही रक्कम ठरते. या एकूण जमा निधीवर तेव्हाच्या काळात जो काही व्याजाचा मासिक दर असेल, त्यादराने निवृत्ती वेतन मिळते. ही अनिश्चितता टाळायची असेल तर आयुर्विमा कंपन्यांच्या निवृत्ती वेतन योजनांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

सध्या विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना बाजारात उपलब्ध आहेत. ज्या अगदी कमी वयात गुंतवणुकीस मुभा देतात. यामध्ये वयाच्या २५ व्या वर्षी प्रत्येक वर्षाला अमुक रक्कम गुंतवा आणि वयाच्या साठव्या वर्षापर्यंत अमुक एक निधी जमा होईल. तेवढीच राशी जमा करण्यासाठी ३५ व्या वर्षापासून अधिक गुंतवणूक करावी लागेल, त्यापेक्षाहे उशिरा सुरुवात केली तर गुंतवणूक रक्कम अधिकच वाढेल अथवा मुदतीअखेर मिळणार निधी कमी होईल वगैरे. पण प्रत्यक्षात कितीही म्हणले तरी २५ ते ३० वर्ष हे काही निवृत्ती नियोजनाचे वय नाही. या वयात कोणी तो विचारच करू शकत नाही. धडाडीने भविष्याकडे पाहणारा पंचविशीतला तरुण? का निवृत्तीची काळजी करेल? तो विचार चाळिशीनंतरच प्रबळ होतो आणि ते योग्यही आहे. सध्या एक चांगली गोष्ट म्हणजे, अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासामुळे आणि आधुनिक वैद्यकीय प्रगतीमुळे लोकांची सर्वसाधारण आरोग्याबद्दलची जाण वाढली आहे. भारतात सरासरी आयुर्मान वाढले आहे. तुमच्या आजूबाजूला ८५-९० वर्षांचे अनेक जण आढळतील. वित्तीय नियोजनाच्या दृष्टीने या बदलाचा परिणाम म्हणून निवृत्ती वेतनाचा विचार अपरिहार्य आहे.

अनेक प्रकारच्या ॲन्युइटी, निवृत्ती वेतन, वर्षासन योजना उपलब्ध आहेत. त्यातले दोन महत्त्वाचे प्रकार म्हणजे एक त्वरित निवृत्ती वेतन योजना ज्याला ‘इमिजिएट ॲन्युइटी’ असे म्हटले जाते. यामध्ये तुम्ही जमा केलेल्या रकमेवर अगदी पुढच्या महिन्यापासूनदेखील वर्षासन चालू होते. दुसऱ्या प्रकारच्या योजनेमध्ये ठरावीक मुदतीनंतर वर्षासन चालू होते. या प्रकारात तुम्ही एकरकमी किंवा दरवर्षी हप्ता भरून ठरावीक मुदतीनंतर वर्षासन/ निवृत्ती वेतन चालू करण्याचे नियोजन करू शकता. या योजनांमध्ये उत्पन्न वेगवेगळ्या दराने, मासिक, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक घेता येते. त्याचप्रमाणे पती-पत्नी दोघांनाही एकत्रित घेता येते.

या ॲन्युइटी योजनेचे मुख्यतः दोन पर्याय असतात. पहिल्या पर्यायात भरलेली रक्कम मरणोत्तर वारसाला मिळते आणि दुसऱ्या पर्यायात भरलेली रक्कम मात्र मरणोत्तर परत मिळत नाही. अर्थात पहिल्या पर्यायात व्याजदर कमी असून दुसऱ्या पर्यायात मात्र व्याज दर चढा असतो. भारतात पुढील पिढी करता तरतूद करण्याची मानसिकता दुसरा पर्याय स्वीकारू देत नाही, तरीसुद्धा अनेक परदेशस्थ मुलांचे आई-वडील मात्र आता जास्त व्याजदराचा पर्याय स्वीकारताना दिसतात. अर्थात हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय असून आपली मानसिकता, मुलांची आर्थिक स्थिती, इतर स्थावर जंगम मालमत्ता, गुंतवणूक याचा विचार करून हा पर्याय निवडावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सर्व योजना तीस वर्षे वयापासून उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांग मुलाचे/मुलीचे नाव तुमच्या सोबत जोडून आपल्या पश्चात अशा वारसाला दरमहा उत्पन्न मिळेल अशी तरतूददेखील करता येते.

ठराविक मुदतीनंतर निवृत्ती वेतन देणाऱ्या ‘डिफर्ड ॲन्युईटी’ योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे भविष्यातील व्याजदराची हमी. उदा. आज जर वयवर्षे ५० असलेल्या व्यक्तीने, जो आर्थिकदृष्ट्या सक्षम असून त्याला अधिक मासिक उत्पन्नाचा पर्याय नको असेल. कारण त्याला आत्ता मिळणारे उत्पन्न हे आधीच्या उत्पन्नात जमा होऊन त्याचे करदायित्व वाढेल. परंतु साठाव्या वर्षी, अजून दहा वर्षांनंतर येणाऱ्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी ती व्यक्ती आजच निवृत्ती वेतन योजना घेऊन ठेवू शकतो. ती निवृत्ती वेतन योजना गुंतवणूक साठ वर्षांनंतर त्याला चढत्या दराने तहहयात उत्पन्न देईल. चाळिशीनंतर हळूहळू अशी योजना घेऊन आपण चांगले निवृत्ती वेतनाचे नियोजन करू शकता.
मर्यादा नेमक्या काय?

अर्थात या योजनांच्या काही मर्यादादेखील लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिले म्हणजे या सर्व योजना करपात्र आहेत म्हणजेच करमुक्त नाहीत. तसेच हा निश्चित व्याजदर भविष्यातील चलनवाढ अथवा महागाईसाठी तरतूद करू शकत नाही. त्याकरता वेगळे उपाय आणि आर्थिक तरतुदी कराव्या लागतील. पण तरीसुद्धा एक ठरावीक रक्कम दरमहा येणे हे महत्त्वाचे आहे. निवृत्त वेतन आपणास सुखी-समाधानी आणि दीर्घायुष्याची खात्री देते. घटते व्याजदर, बुडणाऱ्या बँका, पतपेढ्या, फसवणूक करणारी अनेक आर्थिक प्रलोभने यापासून ही रक्कम अतिशय सुरक्षित आणि तहहयात विनाकाळजी सतत अव्याहत येत राहते. निवृत्तीकरिता भाडे उत्पन्न हा अनेकांचा आवडता पर्याय करोनाकाळात नाहीसा झाला आणि त्याची अनिश्चितता समोर आली. शेअर बाजाराने तर लाभांश उत्पन्नावर जगणे हा शब्दच नाहीसा केला आहे. सध्याचे शेअरचे बाजारभाव आणि मिळणारा लाभांश याचा मेळच लागत नाही. शेवटी निवृत्ती वेतन हे काही तुम्हाला मौजमजा करण्याकरिता नसून तुमचे दैनंदिन खर्च किराणा, औषधे, वीजबिल दैनंदिन इतर गरज इत्यादी सुरळीत चालावे आणि एक सुखी आयुष्य घालवता यावे यासाठीच असते. ज्याला आर्थिक परिभाषेत अत्यावशायक खर्च, टाळता न येणारे खर्च म्हणतात. जे अटळ असतात एवढेच नव्हे तर आयुष्यभर करावे लागतात. त्याची तरतूद ही सुनिश्चित करणे गरजेचे असते.

तरुण वयात या प्रकारच्या गुंतवणुकीचे महत्त्व समजत नाही. मात्र वृद्ध लोकांच्या परिस्थितीचा अभ्यास करणारा एक अहवाल असे सांगतो की, ज्यांना निवृत्ती वेतन नाही असे ४२ टक्के वृद्ध म्हणतात की, आम्हाला कुटुंबात सन्मान मिळत नाही. ३८ टक्के वृद्धांना शाब्दिक अपमान झेलावे लागतात. २८ टक्के वृद्ध हे दुर्लक्षित आणि आर्थिक छळ आणि त्रासाने ग्रासलेले आहेत. मुले-सुना यांच्याकडून त्रास जाच ही एक सर्वसाधारण तक्रार आहे. ५४ टक्के वृद्धांनी याबाबत हतबलता दर्शवून काय करणार अशी निष्क्रिय मानसिकता दाखवली. या सर्वेक्षणात ८२ टक्के वृद्धांनी नियमित उत्पन्नाचे साधन म्हणून निवृत्ती वेतनाची आवश्यकता मान्य केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी निवृत्ती वेतन म्हणजे आपण काहीही न करता विनासायास, विनाकाळजी, विनाजोखीम नियमितपणे, वर्षानुवर्षे हयातभर मिळणारे उत्पन्न असावे. आणि ‘ॲन्युईटी’ गुंतवणूकदारांसाठी ते तसेच असेल, ही खात्री विमा कंपन्यांच्या काही योजना नक्कीच देतात.