केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी निवड परीक्षा (१) २०१४ अंतर्गत संरक्षण दलात थेट अधिकारी पदावर निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील निवड परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
जागांची संख्या व तपशील : योजनेअंतर्गत उपलब्ध जागांची संख्या ३७५ असून त्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीअंतर्गत ३२० (पायदळ २०८, नौदल ४२, तर वायुदल ७०) याप्रमाणे, तर नौदल अकादमीअंतर्गत असणाऱ्या ५५ जागांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार शारीरिकदृष्टय़ा सक्षम व खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी- पायदळ : अर्जदारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी- नौदल व वायुदल व नौदल अकादमी : अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोगट : अर्जदाराचा जन्म २ जुलै १९९५  ते १ जुलै १९९८ च्या दरम्यान झालेला असावा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २० एप्रिल २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
त्यानंतर निवडक उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा तिच्या कुठल्याही सहयोगी बँकेच्या शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे प्रकाशित करण्यात आलेली राष्ट्रीय संरक्षण अकादमीची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१४.
बारावी उत्तीर्ण अशा ज्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या माध्यमातून संरक्षण दलांमध्ये अधिकारी पदावर आपले भवितव्य घडवायचे असेल अशांनी या स्पर्धा निवड परीक्षेचा जरूर लाभ घ्यावा.