लंडनच्या रॉयल सोसायटीला जून २०१० मध्ये ३५० वष्रे पूर्ण झाली. या प्रसंगी सोसायटीचे फेलो म्हणून भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. उद्घाटनाच्या भाषणात माशेलकरांनी म्हटले होते की, ‘‘विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक ही तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल करणार आहे. जगातल्या ज्या देशांना सृजनशीलतेने काम करायची परंपरा आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर सर्जनशीलतेने करायचे माहीत आहे, त्यासाठी योग्य अशा संस्थांची उभारणी करता येते असेच देश आज विकसित झाले आहेत.’’ आज अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचा जरी विचार केला तरी माशेलकरांच्या बोलण्यातील तथ्य उमजते. संशोधन हा अमेरिकेतीलच नव्हे तर जवळपास सर्वच देशांतील उच्च शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. संशोधनातदेखील मूलभूत संशोधन  व उपयोजित संशोधन या दोन्ही प्रकारच्या संशोधनाची आवश्यकता असते व आहे. मूलभूत संशोधन ज्ञाननिर्मितीसाठी आवश्यक आहे, तर उपयोजित संशोधन ज्ञानाचे रूपांतर तंत्रज्ञानात करण्यासाठी आवश्यक आहे. संशोधनातील हा फरक लक्षात घेता, भारतासारखा महासत्तेचं स्वप्न बघणारा देश म्हणूनच संशोधनावर व्यापक प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अगदी माध्यमिक विद्यार्थ्यांपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संशोधनातील आवड व सहभाग वाढावा यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापकी एक म्हणजे ‘उन्हाळी संशोधन पाठय़वृत्ती कार्यक्रम’ (Summer Research Fellowship Programme).
उन्हाळी संशोधन पाठय़वृत्ती ही केंद्र सरकारच्या विज्ञानातील तीन अग्रगण्य संस्था अनुक्रमे इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगलोर, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नवी दिल्ली व नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया, अलाहाबाद यांच्याकडून दरवर्षी देण्यात येते. ही पाठय़वृत्ती हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी प्रकल्पासाठी देण्यात येते. या पाठय़वृत्तीचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. विद्यार्थी-शिक्षकांच्या सोयीसाठी हे प्रकल्प उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण करता यावेत अशी योजना असते. २०१३ मधील या पाठय़वृत्तीसाठी विज्ञान शाखेतील विविध विषयांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाश्र्वभूमी :
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढावी हा या पाठय़वृत्तीमागील प्रमुख उद्देश आहे. सुरुवातीला म्हणजे अगदी मार्च २००७ पर्यंत ही पाठय़वृत्ती फक्त इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगलोर यांच्याकडून देण्यात येत होती. त्यानंतर मात्र २००७ मध्ये विज्ञानातील अजून दोन प्रमुख संस्था अनुक्रमे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नवी दिल्ली व यादेखील या उपक्रमात सहभागी झाल्या. या तिन्ही संस्थांना एकत्रित ‘अकॅडमिक्स’ असे संबोधण्यात येते.
१९९५ मध्ये ही पाठय़वृत्ती अगदी छोटय़ा पातळीवर सुरू करण्यात आली. १९९५ साली एकूण फक्त तीन जणांना ही पाठय़वृत्ती देण्यात आली होती. मात्र २०१० साली ही संख्या वाढून १२००पर्यंत पोहोचली. यातूनच या पाठय़वृत्तीची व्यापकता किती वाढली आहे, याचा अंदाज येतो. २०१० साली सर्व विषयांतून एकूण १०,३५४ विद्यार्थ्यांनी तर ६६२ शिक्षकांनी या पाठय़वृत्तीसाठी अर्ज केले होते. त्यामधून पाठय़वृत्तीसाठी एकूण १,३१२ जणांची निवड झाली, परंतु संस्थांनी शेवटी मात्र १२०० जणांना ही पाठय़वृत्ती बहाल केली. हीच संख्या २०११ साली १२५६ तर २०१२ साली १६७१ पर्यंत पोहोचली. २०१२ मधील या फेलोज्ना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण १८१ संशोधन संस्थांमधील १६९० गाइड्सची निवड झाली होती. आतापर्यंतचे अहवाल सांगतात की, अनेक विद्यार्थ्यांची (अथवा शिक्षकांची) संशोधनासाठी पहिली पसंती ‘आय.आय.एस्सी, बेंगलोर’ किंवा ‘आय.आय.टी, मुंबई’ असते.
अर्ज प्रक्रिया :
अर्ज संस्थांच्या वेबसाइटवर दिलेल्या विहित नमुन्यात ऑन लाइन भरायचा आहे. ऑन लाइन अर्ज वरील तिन्ही संस्थांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. (लेखाच्या शेवटी वेबसाइट्सची यादी दिलेली आहे). अर्जाबरोबर अर्जदाराचा बायोडाटा व अर्जदाराला जे संशोधन करायचे आहे, त्याचे २५० शब्दांत संक्षिप्त वर्णन (Write Up) पाठवावे लागते. सोबत अर्जदाराला ज्या गाइडबरोबर संशोधन करायचे आहे त्याचे नाव पाठवावे लागते. तिन्ही संस्थांशी संलग्नित सर्व गाइड्सची व त्यांच्या संबंधित विषयांची यादी अकॅडमिक्सच्या वेबसाइटवर दिलेली आहे. तसेच भरलेल्या अर्जाची पिंट्र घेऊन ती संस्थेला पुन्हा स्पीड पोस्टाने पाठवायची आहे. त्याबरोबर अर्जदार विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित विषयातील एका प्राध्यापकाचे शिफारस पत्र (Recommendation Letter) बंद लिफाफ्यात संस्थेकडे पाठवावे लागेल. हे पत्र विद्यार्थ्यांने न पाठवता संबंधित प्राध्यापकाने थेट संस्थेकडे पाठवायचे आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Coordinator, Science Education Programme, Indian Academy of Sciences, C.V. Raman Avenue, Near Mekri Circle ,Sadashivanagar, Bangalore 560 080..
निवड प्रक्रिया :
पाठय़वृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला शक्यतो मार्चच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कळवले जाते. यामध्ये त्याला विषयाशी संबंधित संशोधन संस्था व त्याला अकॅडमिक्सने दिलेल्या शास्त्रज्ञाची (गाइड) माहिती असते. एकदा मिळालेली संशोधन संस्था व गाइड बदलता येत नाहीत. निवड झालेल्या विद्यार्थी अर्जदाराला रु. सहा हजार प्रति महिना तर शिक्षक अर्जदाराला रु. नऊ हजार प्रति महिना पाठय़वृत्ती दिली जाते. तसेच रेल्वेचे द्वितीय श्रेणीचे येण्या-जाण्याचे भाडे दिले जाते. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यावर संस्थेचे विज्ञान मासिक ‘रेझोनन्स’ दर महिन्याला मोफत पाठवले जाते.
शेवटची मुदत :
ऑन लाइन अर्ज भरण्याची शेवटची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१२ आहे तर त्याच अर्जाची पिंट्र काढून ती स्पीड पोस्टाने पाठवण्याची शेवटची मुदत ७ जानेवारी २०१३ आहे.
आवश्यक पात्रता
वरील पाठय़वृत्तीसाठी कोणत्याही महाविद्यालयातील खालील विषयांतील विद्यार्थी अथवा शिक्षक अर्ज करू शकतात.
१ ) कृषी
२ ) पदार्थविज्ञान
३) रसायन शास्त्र
४) जैविकविज्ञान
५) गणित
६) अभियांत्रिकी व संगणकशास्त्र
७) भूशास्त्र
विद्यार्थ्यांसाठी संस्थांनी तशी कोणतीच आवश्यक पात्रता जाहीर केलेली नाही. मात्र शक्यतो पदवीच्या अगोदरच्या वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा (Pre-final year students of degree) या उपक्रमाला जास्त प्रतिसाद असतो हे दिसून येते. उदा. बी.एस्सीच्या द्वितीय किंवा एम.एस्सीच्या प्रथम वर्षांतील अथवा अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षांतील विद्यार्थी या पाठय़वृत्तीसाठी प्रामुख्याने अर्ज करू शकतात. याचे प्रमुख कारण म्हणजे पदवी संपताना या विद्यार्थ्यांना या पाठय़वृत्ती अंतर्गत पूर्ण झालेला प्रकल्प त्यांच्या महाविद्यालयाला सादर करता येतो.
महत्त्वाच्या वेबसाइट्स:
http://www.ias.ac.in,
http://www.insaindia.org,
http://www.nasi.org.in