महेश झगडे, निवृत्त सनदी अधिकारी

आपल्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात असलेली गती वेळीच ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यामुळे भविष्यात नोकरीत आणि आयुष्याच्या प्रवासात विनाअडथळे आनंदाने मार्गक्रमण करता येते. सध्याच्या स्पर्धात्मक जगात तुम्हाला तुमची जीवनकौशल्ये ही बदलत रहावी लागणार आहेत, कारण जागतिक अहवालानुसार चौथ्या औद्योगिक क्रांतीमधील तंत्रज्ञानामुळे पुढील पंधरा ते वीस वर्षांत सद्यस्थितीत असणाऱ्या ६५ टक्के नोकऱ्या कमी होणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, अल्गोरिदम सॉफ्टवेअर्स, मशीन लर्निग आदी विविधांगी तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांमध्ये घट होण्यासह काही प्रमाणात नवीन स्वरूपातील नोकऱ्यांचीही निर्मिती होईल. पण या नोकऱ्यांमध्ये स्थिरता नसेल. तर व्यवसायामध्ये स्थिरता असेल, पण यामध्येही कायमस्वरूपी बदल करावे लागतील ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण नोकरी व व्यवसायासाठी फक्त महाराष्ट्रापुरती व भारतापुरती मर्यादित नाही राहिले पाहिजे. काळानुसार जागतिक पातळीवरील नोकरीच्या संधींचाही विचार करायला हवा. भारतात कारखानदारी व सेवा क्षेत्रामध्ये जवळपास ४१ ते ४२ कोटी रोजगार आहे. ४५ टक्के रोजगार हा शेतीवरती अवलंबून आहे. कारखानदारी व सेवा क्षेत्रामध्ये ५६ टक्के रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी जास्त आहेत.

भारतामधील ९३ ते ९४ टक्के नोकऱ्या या असंघटित, ६ ते ७ टक्के शासन व संघटित आणि २.७ ते ३ टक्के नोकऱ्या या शासनव्यवस्थेत आहेत. भारतात सर्वाधिक नोकऱ्या या शासकीय यंत्रणेत आहेत. तुमच्यात देशाचा चेहरामोहरा बदलण्याची तळमळ आणि देशसेवा करण्याची इच्छा असल्यास, शासकीय सेवेत येण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. नोकरीची सर्वाधिक हमी ही शासकीय सेवेत आहे. यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकार शासकीय सेवेत विविध पदांसाठी भरती करीत असते. बुद्धीचा कस लागणाऱ्या या परीक्षेत प्रचंड स्पर्धात्मक वातावरण असल्यामुळे, विद्यार्थी ताणतणाव तसेच नैराश्यात जातात. यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे ‘प्लॅन बी’ म्हणून पाहिले पाहिजे आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्या, व्यवसाय व इतर गोष्टींचा ‘प्लॅन ए’ म्हणून विचार करायला हवा. यामुळे आपले करिअर हे सुरक्षित राहते आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्यास आपल्याला ताणतणाव येत नाही. जर स्पर्धा परीक्षांची तयारी ही व्यवस्थित करायची असेल, तर शालेय, माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरापासून इतिहास व इतर विषयांवर प्रभुत्व असण्यासह कष्ट असणे महत्त्वाचे आहे. सूत्रबद्ध आणि सातत्य ठेवून अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे कठीण नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पर्धा परीक्षेत अपयश येत राहिल्यास तिसऱ्या प्रयत्नाच्या पुढे कोणीही जाऊ नये. कारण यामुळे निराशेच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ होत जाते. स्पर्धा परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासामुळे तुमचे ज्ञान वाढून व्यक्तिमत्व विकास होतो. यामुळे कष्ट वाया जात नाहीत. यूपीएससी परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर तुम्ही शासनाच्या इतर ८० ते ८५ टक्के नोकऱ्यांमध्ये यश मिळवू शकतात, यासाठी विशेष अभ्यास करण्याची गरज नसते. तर आपले सरकार हे संयुक्त राष्ट्र संघटना व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या मार्फत आंतराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या नोकरीच्या संधीही उपलब्ध करून देत असते. आपण आयुष्य हे फक्त पैसे कमविण्यासाठी न जगता सुखी राहण्यासासाठी जगले पाहिजे. त्यामुळे आवड व आनंद असलेल्या क्षेत्रात काम केले तर जगण्याचा आनंद द्विगुणित होतो.