संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत जवळपास २३ वैकल्पिक विषय असतात. आम्ही आधी लिहिल्याप्रमाणे, यातले काही वैकल्पिक विषय हे उमेदवारांमध्ये जास्त लोकप्रिय असतात. लोकप्रिय असणाऱ्या वैकल्पिक विषयांवर काय आणि कसे प्रश्न येऊ शकतात हे आपण गेल्या काही लेखांमध्ये पाहिलं आहे. काही वैकल्पिक विषय असेही आहेत जे फार थोडे विद्यार्थी घेतात. अशा काही वैकल्पिक विषयांबद्दल जाणून घेऊया…

लॉ (कायदा ) आणि फिलॉसॉफी (तत्त्वज्ञान ) या वैकल्पिक विषयांवर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आजच्या लेखात पाहूया. कायदा हा विषय सर्वसाधारणत: ज्यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे, म्हणजेच ज्यांनी किमान एलएलबी केलं आहे असेच उमेदवार घेतात. या विषयात मार्क्स मिळवणं कठीण मानलं जातं आणि त्यामुळे हा विषय घेणाऱ्यांचं प्रमाण कमी असतं. वैकल्पिक विषयावर मुख्य परीक्षेत बरेच प्रश्न विचारलेले असतात त्यात थिअरीवरचे प्रश्नही बरेच असतात त्यामुळे व्यक्तिमत्त्व चाचणीत अर्थातच प्रॅक्टिकल स्वरूपाचे प्रश्न जास्त विचारले जाऊ शकतात. तुमच्या कायदेविषयक ज्ञानाचा तुम्हाला सरकारी नोकरीत कसा फायदा होईल? हा नेहेमीचाच प्रश्न आहे. तुम्हाला वकील म्हणून प्रॅक्टिस का करायची नाही? वकिलीत अधिक पैसे मिळू शकतात, ते सोडून तुम्हाला मर्यादित पगाराची नोकरी का करायची आहे? हेही प्रश्न अपेक्षित असतात.

भारतात नुकतेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे ११ जुलै २०२४ पासून अंमलात आणले आहेत. या नवीन कायद्यांचे प्रयोजन काय आहे? त्याची अंमलबजावणी तुमच्या राज्यात पूर्णपणे होत आहे का? कायदेविषयक सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने मलिमथ आयोग नेमला होता त्यांनी काय सूचना केल्या आहेत? जे कायदे आता वापरात नाहीत किंवा कालानुरूप जे कायदे कालबाह्य झाले आहेत असे अनेक कायदे एकाच कायद्याच्या आधारे स्थगित केले गेले त्याविषयी आपणास माहिती आहे का? भारत सरकारने जन विश्वास नावाचा कायदा आणला, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? भारतातल्या सर्वच स्तरावरच्या न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर केसेस अडलेल्या आहेत, ही पेंडन्सी कशी संपवता येईल? सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ असावे अशी मागणी नियमितपणे होत असते, याबद्दल तुमचं मत काय आहे? सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ सुरू केल्यामुळे काय फायदे होऊ शकतात? ‘रुल ऑफ लॉ’चं लोकशाहीमध्ये काय महत्त्व आहे? कायद्यासमोर समानता याचा अर्थ काय ?

कायदा करण्यामागे कोणती उद्दिष्टे असतात? भारताची राज्यघटना ही देशातल्या इतर कायद्यांपेक्षा वरचढ आहे का? न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य म्हणजे काय? न्यायसंस्थेची सक्रियता म्हणजे काय? न्यायसंस्थेची सक्रियता, न्यायिक पुनरावलोकन आणि न्यायिक अधिक्षेप यात काय फरक आहे हे उदाहरणासहित सांगा? राज्यघटनेची मूळ रचना म्हणजे काय? केशवानंद भरती केस कशासंदर्भात होती? राज्यघटनेत बदल करण्याची प्रक्रिया काय असते? मध्यस्थी म्हणजे काय? केसेसची पेंडन्सी कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो का? वैकल्पिक विवाद निराकरण यंत्रणा म्हणजे काय? या संदर्भात भारतात काही धोरण आहे का? १९८७ च्या लीगल सर्व्हिस अॅक्टअन्वये लोक अदालत मध्ये कोणत्या प्रकारचे खटले त्वरीत निकाली काढले जातात? भारतात इंडियन ज्युडिशिअल सर्व्हिस का नाही? न्यायालयीन नेमणुका कशा होतात? न्यायिक कॉलेजियम प्रणाली म्हणजे काय? राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग म्हणजे काय? त्यांचं काम काय आहे? ICJS Interoperable क्रिमिनल जस्टिस सिस्टीम म्हणजे काय आणि त्यात कोणत्या संस्थांना ऑनलाइन कनेक्ट केले आहे?

तत्त्वज्ञान हा विषय आवड म्हणून घेणारेही अनेक उमेदवार असतात. या विषयाचा अभ्यासक्रम आणि मुलाखतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न यात फरक जाणवतो. त्यामुळे उमेदवारांनी तत्त्वज्ञान विषयाची मुलाखतीसाठी चौफेर तयारी करायला हवी. या विषयासाठी वाचनही बरंच करावं लागतं. २०२४ च्या अंतिम निकालात भारतात तिसरा आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक संपादन करणाऱ्या अर्चित डोंगरे याने फिलॉसॉफी हा ऐच्छिक विषय घेऊन परीक्षा दिली.

या विषयावर नेहमी विचारला जाणारा प्रश्न तत्त्वज्ञान या विषयाचा प्रशासनात काय उपयोग होईल? या प्रश्नाचं उत्तर जे काही दिलं जाईल त्यातून काही उपप्रश्न पण विचारले जाऊ शकतात. हा विषय फक्त थिअरी आहे असं तुम्हाला वाटत नाही का? रोजच्या आयुष्यात त्याचा काही उपयोग नाही असं तुम्हाला वाटत नाही का? भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चिमात्य तत्वज्ञान यात कोणते फरक आहेत? दर्शन वाङ्मय म्हणजे काय? चार्वाकाने जीवनाबद्दल काय तत्वज्ञान सांगितले होते? अद्वैतवाद म्हणजे काय? कोणत्या भारतीय तत्वज्ञानाचा परमेश्वर या संकल्पनेवर विश्वास आहे? परमेश्वर ही संकल्पना न मानणारी तत्वज्ञान कोणती आहेत? पाश्चिमात्य तत्त्वज्ञान आणि भारत तत्त्वज्ञान यातले सामान धागे कुठचे?

भारतात बौद्ध धर्माचा उगम झाला पण आज बौद्ध धर्माचे अनुयायी भारतापेक्षा श्रीलंका, दक्षिण आशिया, जपान सारख्या देशात अधिक प्रमाणात कसे दिसून येतात? जैन धर्माचा भारताबाहेर प्रसार का झाला नाही? जैन धार्मिक तत्त्वज्ञानाची तीन रत्ने कोणती आहेत? श्वेतांबर आणि दिगंबर या २ पंथात कोणता फरक आहे? जैन धर्माचे २३ वे तीर्थंकर पारसनाथ यांचे धार्मिक स्थळ इकोटुरिझमसाठी खुले केल्याने झारखंड राज्यात कोणता वाद झाला? वसूधैवकुटुंबकम या जी २० परिषदेच्या ब्रीदवाक्याचा बौद्ध धर्माशी काही अनुबंध आहे का? स्टॉइसिझम म्हणजे काय? भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मात प्रवेश का केला? द्वैत, अद्वैत आणि विशिष्ट अद्वैत यात नेमका फरक कोणता?

आजचे दोन्ही वैकल्पिक विषय हे वैचारिक स्वरूपाचे आहेत आणि त्यामुळे संकल्पनेबरोबरच त्याच्या उपयोजनाबद्दलचे प्रश्नदेखील नक्कीच विचारले जातील.

mmbips@gmail. com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

supsdk@gmail. com