Success Story Of Mangesh Khilari : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही जगातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करता येते. पण, प्रत्येक जण यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही. अशा वेळी अपयश आले की, विद्यार्थी निराश होतात. कारण- काही जण फार कष्ट करून येथपर्यंत पोहोचलेले असतात. पण, याचबरोबर अनेकांची गोष्ट आपल्याला भरपूर प्रेरणासुद्धा देऊन जातात. तर आज आपण असेच एक आयएएस अधिकारी मंगेश खिलारी यांची कहाणी जाणून घेऊ…
मंगेश खिलारी यांचे वडील एकेकाळी चहा विक्रेता म्हणून काम करायचे. त्यामुळे मंगेशने मोठ्या प्रमाणात गरिबीचा सामना केला. पण, सगळ्या संकटांना तोंड देत त्यांनी २०२२ च्या नागरी सेवा परीक्षेत ३९६ वा क्रमांक मिळवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. मंगेश हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावचा रहिवासी आहे. त्याने त्याच्या गावातून दहावी पूर्ण केली. पुढील शिक्षणासाठी तो संगमनेर तालुक्यात गेला. नंतर तो राज्यशास्त्रात पदवी मिळविण्यासाठी पुण्याला गेला आणि तेथे त्याने चार वर्षे शिक्षण घेतले.
तेलाच्या दिव्याखाली बसून अभ्यास (Success Story)
मंगेशचे कुटुंब शहरात एक छोटेसे चहाचे दुकान चालवत होते आणि हेच त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन होते. यूपीएससी परीक्षेत पास होण्याचे श्रेय मंगेश त्याच्या पालकांच्या भक्कम पाठिंब्याला दिले. कारण- त्याचे पालक नेहमीच मंगेशला शिक्षणात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करीत होते. अत्यंत गरिबी आणि कोचिंगसाठी पैसे नसतानाही मंगेशने सार्वजनिक ग्रंथालयात बसून परीक्षेची तयारी केली. परीक्षेसाठी तो मोफत मिळणाऱ्या अभ्यास साहित्यावर अवलंबून राहिला. त्याच्या गावातील घरात योग्य प्रकाश नसल्यामुळे तो तेलाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा.
मंगेशच्या आयुष्यात महत्त्वाचा असा एक टप्पा आला जेव्हा तो त्याच्यासारख्याच पार्श्वभूमी असलेल्या स्थानिक आयएएस अधिकाऱ्याला भेटला. त्यामुळे त्याला प्रेरणा मिळाली आणि त्याने कुटुंबाकडून चालविल्या जाणाऱ्या चहाच्या दुकानातील जबाबदाऱ्या आणि अभ्यास यांचे संतुलन साधले. तो दररोज १५-१६ तास अभ्यास करायचा. तो दोनदा मुलाखतीच्या टप्प्यावर पोहोचला; पण यशस्वी झाला नाही. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात त्याने ३९६ वा क्रमांक मिळवला.
मंगेश खिलारीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्याच्याकडे अभ्यासासाठी खूप कमी संसाधने होती; पण आयुष्यात काहीतरी साध्य करण्याचे त्याचे स्वप्न मोठे होते. प्रबळ इच्छाशक्ती, कधीही हार न मानण्याची वृत्ती; जी त्याच्या यशाचा पाया बनली.