Modern Indian History In Marathi : मागील लेखातून आपण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये झालेला संघर्ष आणि मुघल दरबारातील गटबाजींबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण माहिती घेतली. या लेखातून आपण इतर बादशाहांबाबत जाणून घेऊया.

फारुखसियार (१७१३ ते १७१९)

झुल्फिकार खानाचा वाढता प्रभाव बघता मुघल दरबारातील इतर उमरावांनी त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचण्यास सुरुवात केली. जहाँदारशहानेही अनेकदा त्याच्यावर अविश्वास दाखवला. अखेर इ.स. १७१३ मध्ये जहाँदारशहाचा पुतण्या फारुखसियार याने बंड केले. जहाँदारशहा आणि फारुखसियार यांच्यात आग्रा येथे युद्ध झाले. या युद्धात जहाँदारशहाचा पराभव झाला आणि फारुखसियार गादीवर बसला. या युद्धात ज्या उमरावांनी फारुखसियारला मदत केली, त्या उरमावांचे नाव होतं, हसन ऊर्फ अब्दुल्ला खान आणि हुसैन अली. त्यांना सय्यद बंधू या नावाने ओळखले जायचे.

गादीवर बसताच फारुखसियारने दोघांना वजीर आणि मीरबक्षी या पदांवर नियुक्त केले. मात्र, फारुखसियारने प्रशासनाची सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवली. सय्यद बंधूंचा प्रशासनातील हस्तक्षेप त्याला मान्य नव्हता. यादरम्यान त्याने अनेकदा सय्यद बंधूंना पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला अपयश आले. याच संघर्षातून अखेर इ.स. १७१९ साली सय्यद बंधूंनी फारुखसियारची हत्या केली.

महम्मदशहा (१७१९ – १७४८)

फारुखसियारच्या हत्येनंतर सय्यद बंधूंनी रफी-उद्-दरजात आणि रफी-उद्दौला या दोन राजपुत्रांना लागोपाठ गादीवर बसवले. पण अल्पावधीच त्यांचा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे सय्यद बंधूंनी १८ व्या वर्षी महम्मदशहा याला गादीवर बसवले. मात्र, सय्यद बंधू आपल्याला कधीही ठार करू शकतात, या भीतीने महम्मदशहाने गादीवर बसताच दरबारातील इतर उमरावांच्या मदतीने सय्यद बंधूंपैकी हुसैन अली खान याला ठार केले. तर आग्र्याजवळील एका लढाईत अब्दुल्ला खान याचा पराभव केला. यासाठी त्याला निझाम-उल-मुल्क या उमरावाची साथ मिळाली. त्यामुळे त्याने निझाम-उल-मुल्कला वजीर म्हणून नियुक्त केले. निझाम-उल-मुल्क हा अतिशय कर्तबगार उमराव होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महम्मदशहा हा अतिशय दुर्बल राजा होता. तो नेहमी ऐषोआराम आणि चैनीच्या गोष्टींमध्ये गुंतलेला असायचा. त्याने राज्यातील कारभाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे मुघल दरबाराचा भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढला होता. आपल्या सम्राटाची चंचल वृत्ती बघून निझाम-उल-मुल्कने आपल्या वजीरपदाचा त्याग केला आणि हैदराबाद संस्थानाची निर्मिती केली.