डॉ. महेश शिरापूरकर

आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर दोन मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारत व जागतिक महासत्ता यांविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत. यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि जपान या महासत्तांशी असणारे द्विपक्षीय संबंध यांचा समावेश होतो.

भारताच्या महासत्तांशी असणाऱ्या संबंधांचे अध्ययन करताना दोन्ही देशांमधील लोकशाही, बहुलवादी समाज, विकास, दोन्ही देश सामोरे जात असलेल्या समान समस्या अशी एक केंद्रांभिमुखता (Convergence)बौद्धिक संपदा अधिकार, व्यापार विवाद, पर्यावरणीय वाटाघाटी यांसारखे विवादास्पद (Confrontation) मुद्दे, व दहशतवाद, प्रदूषण, पर्यावरणीय व जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटींमध्ये समान भूमिका, व्यापाराचा विकास, जागतिक शांतता व स्थैर्य आदी सहकार्यात्मक (Co- Operation)क्षेत्रांना ओळखून या घटकाची तयारी पद्धतशीरपणे करता येते. या लेखामध्ये आपण भारताचे अमेरिका, रशिया आणि जपान या देशांसोबत असणाऱ्या संबंधांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

भारत-अमेरिका

भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनयिक संबंधांची सुरुवात नोव्हेंबर १९४१ पासून झाली. अमेरिकेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाबाबत सहानुभूती होती. अमेरिकेला असा विश्वास होता की, भारताने हिटलरविरुद्धच्या संघर्षांमध्ये दिलेल्या सहकार्याच्या बदल्यात ब्रिटनने भारताला स्वयंशासनाचे वचन द्यावे. भारत-अमेरिका संबंधांची अशाप्रकारे सुरुवात झाली होती. या दोन्ही देशातील संबंधांचे, शीतयुद्धकालीन परिस्थिती, भारताकडून अमेरिकेला वेळोवेळी करण्यात आलेली मदत तसेच शीतयुद्धानंतरचा कालावधी व सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर अध्ययन करणे आवश्यक ठरते. सध्या भारत-अमेरिका द्वीपक्षीय संबंध जागतिक व्यूहात्मक भागीदारीमध्ये विकसित झालेले आहेत. दोन्ही देशातील संबंधांमध्ये एककेंद्राभिमुखता वाढत असल्याचे दिसते. शिवाय अमेरिकेच्या पुर्नसतुलन धोरणामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून भारताचे महत्त्व अधोरेखित होते. नुकतीच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये झालेली चर्चा ही रशिया-युक्रेन संघर्षांच्या आणि चीनच्या वाढत्या आक्रमक धोरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे. अमेरिकेला चीन आणि रशिया यांनी आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर आणि विशेषत: दक्षिण आशियामध्ये भारतासारख्या बलाढय़ राष्ट्राची जवळीकता हवी आहे. भारतालाही दहशतवादाचा मुकाबला, चीनचे आव्हान आणि तंत्रज्ञानात्मक प्रगती यासाठी अमेरिका, जपान या राष्ट्रांचे सहकार्य हवे आहे. २०२१ च्या मुख्य परीक्षेत पुढील प्रश्न विचारला होता- ‘अमेरिकेला चीनच्या रूपात अस्तित्वाच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे, जो पूर्वीच्या सोव्हिएत संघापेक्षा खूपच आव्हानात्मक आहे.’ स्पष्ट करा. (गुण १०, शब्दमर्यादा १५०).

भारत-रशिया

भारत-रशिया संबंध भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. हे संबंध काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी ही परंपरेनेच राजकारण, संरक्षण, नागरी अणुऊर्जा, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि अंतरिक्ष विज्ञान या पंचसूत्रीवर आधारित असल्याचे दिसते. याबरोबरच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व प्राप्त होण्याबाबत रशियाने नेहमीच भारताला समर्थन दिले आहे. अलीकडे रशिया आणि चीन यांच्यातील संबंध वृद्धिंगत होताना दिसतात मात्र हे संबंध त्या दोन्ही राष्ट्रांसाठी व्यापारी व राजनयीक अपरिहार्यता आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामध्ये भारताने घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे पाश्चात्य देशांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसते. हे युद्ध भारतीय परराष्ट्र धोरणाची परीक्षा पाहणारे आहे कारण भारताला रशियाबरोबरच युरोप किंवा इतर पाश्चात्य राष्ट्रांसोबत असणारे संबंध महत्त्वपूर्ण आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत-जपान

भारत व जपान यांच्यातील संबंधांना आर्थिक, व्यापारी आणि सामरिक परिमाण लाभलेले आहे. दोन्ही देशातील निकटच्या संबंधांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहेच मात्र आशियातील सत्ता संतुलनाच्या दृष्टीने हे संबंध महत्त्वपूर्ण ठरतात. १९९८ मध्ये पोखरण अणुचाचणीनंतर जपानने भारतावर निर्बंध लादले होते. तथापि, ‘शांततेसाठी अणूकार्यक्रम’ या भारताच्या तत्त्वाची प्रचीती आल्याने जपानने आपले निर्बंध शिथिल केले. काही वर्षांपासून भारत व जपानचे पंतप्रधान एकमेकांना भेटून आर्थिक पायाभूत सुविधा, संरक्षण, व्यापार-उदीम, माहिती आणि तंत्रज्ञान, सांस्कृतिक आदानप्रदान अशा क्षेत्रांतील संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात संघर्षांची परिस्थिती उदभवली असताना जपानने भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. चीनने केलेल्या आर्थिक प्रगतीने जपानच्या आर्थिक वर्चस्वाला शह मिळाला आहे. गेली काही वर्षे हिंदूी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रातील चीनचा वावर आणि वाढते वर्चस्व रोखण्यासाठी भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य महत्त्वाचे आहे.
२०१९ साली विचारलेला प्रश्न पहा – ‘भारत आणि जपान यांनी मजबूत समकालीन संबंध प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी समाविष्ट असेल आणि या संबंधाचे आशिया आणि संपूर्ण जगासाठी खूप महत्त्व असेल.’ टिप्पणी करा. (गुण १०, शब्दमर्यादा १५०).
हा घटक चालू घडामोडींवर आधारित आहे. याकरिता पंतप्रधानांचे विदेश दौरे, यामध्ये झालेले करार, शिखर परिषदा इ. बाबींचा नियमित मागोवा घेणे उचित ठरेल. या घटकाच्या तयारीकरिता परराष्ट्र मंत्रालय, व कऊरअ ची वेबसाईट, द हिंदू , इंडियन एक्स्प्रेस ही वृत्तपत्रे व वल्र्ड फोकस हे नियतकालिक अभ्यासणे उपयुक्त ठरेल.