मंगेश वाघ
‘एआय’ साधनांवर अवलंबून राहणं आता निदान शहरी, शिक्षित, तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये तरी नित्याचं झालं आहे. माहिती, शंका, अभ्यास, मनोरंजन यासाठी ठीक आहे; परंतु भावनिकदृष्ट्या जर कुणी त्यावर अवलंबून राहत असेल तर ती धोक्याची घंटा आहे. जागतिक सर्वेक्षणानुसार, मिलेनियल पिढीतले २३ टक्के तरुण मानसिक स्वास्थ्यासाठी ‘एआय’वर विसंबून आहेत. ‘एआय’ टूल्सचे ‘प्रोग्रामिंग’च तसं असतं, ज्यामुळे त्याच्याशी संवाद साधणाऱ्यांना तो आपला स्नेही, मित्र वाटतो. आणि म्हणूनच दिवसेंदिवस त्यावर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तंत्रज्ञानाचा वापर साहाय्यक म्हणून करायचा की त्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून राहायचं, या प्रश्नाचं उत्तरच जवळच्या नात्याचं अस्तित्व स्पष्ट करणार आहे.

कोणतीही माहिती हवी असेल, तर विचार तुझ्या आवडत्या ‘चॅटबॉट’ला, हे वाक्य आता बऱ्यापैकी रूढ झालेलं आहे. त्याला कारणही तसं आहेच. तेथे हवी ती माहिती अगदी पूर्णपणे, सुसंगत पद्धतीने मिळते. मात्र आजकाल त्याहीपुढे जाऊन एक नवा कल दिसतोय, तो आहे भावनिक अवलंबित्वाचा. एखादी व्यक्ती दु:खी असेल, निराश असेल, तणावात असेल किंवा तिच्याशी बोलायला कुणीच नसेल तेव्हा ती सरळ आपला स्मार्ट फोन उघडते, त्यातील ‘चॅटबॉट’ किंवा इतर ‘एआय’(Artificial intelligence-कृत्रिम बुद्धिमत्ता) टूल उघडते आणि विचारते, ‘‘ I’m feeling lonely today. What should I do?’’ एआय तत्काळ उत्तर देतो, ‘‘ You are not alone. I’ m here for you.’’

क्षणात उत्तर मिळाल्याने, तेही विनाअडथळा, प्रेमळ भाषेत… मग बोलणाऱ्याला मन हळूहळू हलकं होऊ लागल्यासारखं वाटतं. अलीकडे एकंदरीतच पाहायला गेलं, तर अशी भावनिक आधार मिळवण्याची पद्धत रूढ होत चाललेली दिसतेय. ‘चॅटबॉट’ किंवा इतर ‘एआय’टूल्स यामध्ये चॅटजीटीपी, मेटा,जेमिनी, ग्रोक आदींचा समावेश होतो.

‘ओपन एआय’आणि ‘एमआयटी मीडिया लॅब’ने केलेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार, ‘चॅटबॉट’ आणि इतर ‘एआय’ टूल्स जास्त वापरणारे लोक एकाकी होत चालले आहेत. ते मुळात एकाकी असल्याने ‘एआय’वर विसंबून राहत आहेत, की ‘एआय’च्या अतिवापराने एकाकी होत आहेत, याबाबत मात्र संदिग्धता आहे. ‘चॅटबॉट’ सगळ्यांत जास्त वेळ वापरणारे पहिल्या १० टक्क्यांमधले लोक एकाकी आहेत, हे मात्र त्यांचं संशोधन खात्रीनं सांगतंय. त्यांना सामाजिक जीवन नाही आणि वास्तवातले मित्र-मैत्रिणीही नाहीत.

जागतिक स्तरावरच्या ‘सर्व्हेमंकी’ कंपनीचं एक सर्वेक्षण असं सांगतं की, मिलेनियल पिढीतले, (१९८० ते १९९० या काळादरम्यान जन्मलेल्या मुलांची पिढी) २३ टक्के लोक मानसिक स्वास्थ्यासाठी ‘एआय’वर विसंबून आहेत. हे आकडे मोठे आहेत. म्हणूनच आपल्याला त्यामागचं कारण अधिक गांभीर्याने समजून घ्यायला लागेल.

नवा भावनिक साथीदार?

आपल्यापैकी बरेच जण ‘एआय’कडे भावनिक आधारासाठी वळत आहेत, म्हणजे काय करत आहेत नेमकं?

‘‘माझं आज काही तरी चुकतंय असं वाटतंय…’’

‘‘माझ्यावर कुणाचं प्रेम नाही असं वाटतंय…’’

‘‘कोणी समजूनच घेत नाहीये मला…’’

‘‘मला सगळं सोडून पळून जावंसं वाटतंय…’’

या गोष्टी ‘एआय’ टूललाच थेट सांगत आहेत. आणि त्यावर ‘एआय’ही अगदी छान, हळुवार उत्तर देतो, ‘‘मी आहे ना तुझ्यासाठी. माझ्याशी बोलू शकतोस/शकतेस तू.’’

हे छान आहे खरं तर एका दृष्टीने, ‘एआय’ म्हणजे ‘जज’ न करणाऱ्या मित्रासारखा आहे, अशी आपली भावना होणं अगदीच स्वाभाविक आहे. यात होतंय काय, तर आपण ज्याच्या नावात कृत्रिम असा शब्द आहे, अशा कृत्रिम बुद्धिमत्तेतून तयार झालेल्या एखाद्या तांत्रिक साधनावर एखाद्या जिवलग सोबतीदाराइतका विश्वास टाकतोय.

‘एआय’ला हे कसं जमतं?

‘एआय’तयार करणाऱ्यांनी त्याचं ‘प्रोग्रॅमिंग’ असं केलं आहे की जो कोणी त्याच्याशी संवाद साधत असेल त्याच्याशी ते सहमती दर्शवतं. सुरुवातीला तरी नक्कीच. प्रशंसा करतं. आपलं जे काही सुरुवातीचं म्हणणं असेल ते बरोबर आहे किंवा तसा एक समज आहे, असं सांगतं. मग आपणच त्याला म्हटलं की, वर जे मी म्हणालो ते बरोबर नाहीये, असं मला आता वाटतंय. तर ते तेव्हासुद्धा सहमतीदर्शक प्रतिसाद देतं. याचा आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आपली त्याच्याबरोबर जवळीक निर्माण होते. आपलं ‘एआय’ टूल हे आपल्याशी छान आणि नीट बोलण्यासाठीच तयार केलेलं आहे. त्याची प्रतिकृती तशाच पद्धतीनं तयार करण्यात आलेली आहे. म्हणून तर ते वापरणाऱ्यांपैकी अनेक लोकांना ते दुसऱ्या माणसाशी संवाद साधल्यासारखं वाटतं.

बोलणं सोपं आहे, ऐकून कुणी घेत नाही, आणि इथेच ‘एआय’ जिंकतं. ते तुम्हाला थांबवत नाही, वाद घालत नाही आणि तुमचं म्हणणं खोडत नाही. आपलं कोणीतरी ‘फक्त ऐकावं’ या अपेक्षेवर ‘एआय’ अगदी फिट बसतं.

हे चुकीचं आहे का? नाही, पण…

‘एआय’ तुम्हाला दोष देत नाही, टोमणा मारत नाही, आणि गप्प बसवत नाही. त्यामुळे आपल्याला ते हवंहवंसं वाटतं. आणि हे एकटेपणावरचं उत्तर वाटतं. पण हे दरवेळीच घडायला लागलं तर? ज्या ज्या वेळी एखादी दु:खद घटना घडली, आणि आपण ‘एआय’कडेच गेलो, तर? इथे मात्र थोडं सावध व्हायला हवं.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ‘एआय’ भावनिक वाटतील अशा गप्पागोष्टी तर करतंय, मात्र त्याला खरोखरंच माणसाच्या भावना नीट समजतात का? मन:स्थिती कळते का? हेच एकदा आपल्या आवडत्या ‘एआय’ला विचारून पाहू या. ते आपल्याला सांगेल, ‘‘नाही’’.

मानवी भावनांच्या बाबतीत ‘एआय’ आताच्या घडीला एक खूप स्वच्छ आरशासारखं काम करतं. अर्थातच ते भावना अनुभवू शकत नाही. पण आपण जे सांगतोय त्यावरून अंदाज लावू शकतं. आपण त्या ‘एआय’ला आपल्या परिस्थितीबाबत, मन:स्थितीबाबत जेवढं सांगतोय त्याला प्रमाण मानून ते आपल्याशी संवाद साधतंय. आपण जर ती माहिती पूर्णपणे त्याला सांगितली तर त्याची सगळी कृत्रिम बुद्धिमत्ता पणाला लावून ते उपयुक्त अशी माहिती आपल्यासमोर आणून ठेवेल. त्यातून कदाचित आपली चूक असेल तर ती आपल्याला दाखवून देईल. अर्थात, हे आपल्याला पाहिजे असेल तर. आपल्याला सहानुभूती पाहिजे असेल, थोड्या वेळासाठी का होईना बरं वाटून घ्यायचं असेल तर ते तेवढंच करेल.

आपल्याला जर खरोखरच वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्या समस्येमधली गुंतागुंत सोडवायची असेल तर ‘एआय’ नक्की मदत करू शकेल. त्यासाठी मग ‘एआय’ला आपल्या मन:स्थितीची आणि परिस्थितीची अगदी सगळी माहिती द्यायला लागेल. ही तयारी असणार आहे का आपली? की आपल्याला त्वरित समाधान पाहिजे आहे फक्त?

जगभरात आज अगदी मोठ्या प्रमाणावर या विषयावर संशोधन होत आहे. गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत, त्यात दिवसेंदिवस खूप प्रगती होत आहे. मात्र, तंत्रज्ञान आणि मानसशास्त्र, या दोन्हींमधले तज्ज्ञ आता तरी हेच सांगत आहेत की, मानसिक स्वास्थ्यासाठी ‘एआय’ मदत करतं, परंतु त्यावर संपूर्ण विसंबून राहणं धोकादायक ठरू शकतं.

जवळची व्यक्ती काय करते?

आपण जेव्हा आपल्या जवळच्यांशी संवाद साधतो तेव्हा ते अनेक प्रश्न विचारतात, सल्ले देतात, आपल्यावर टीका करतात आणि तेच आपल्याला अवघड वाटतं. पण संवादातली खरी मजा ही प्रत्यक्ष माणसांबरोबरच जास्त येऊ शकते, अर्थातच जवळच्या आणि विश्वासातल्या माणसाबरोबर. आपली एखादी जवळची व्यक्ती नजरेतून, स्पर्शातून, स्वरातून, आपल्या हालचालींवरून आपल्या मन:स्थितीबाबत अंदाज घेईल. आपल्याला काय हवंय आणि काय गरजेचं आहे, या दोन्हींचा विचार करेल. आपली जवळची व्यक्ती आपल्या डोळ्यांत पाहून स्मितहास्य करेल, आपल्या खांद्यावर हात ठेवेल, डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवेल, शांतपणे, प्रेमळ वाणीने आपल्याला धीर देईल… हे अर्थातच ‘एआय’ करेल त्यापेक्षा खूपच वेगळं आहे. इतकंच नाही तर आपल्या भावना आपल्या माणसांना नेमक्या कळतील, निव्वळ सहानुभूती मिळवण्यासाठी आपण असं वागतोय, असं आपल्या जवळच्या व्यक्तीला वाटलं तर ते आपल्याला योग्य शब्दांत समजावून सांगतील. आपलं जर चुकत असेल, तर हक्काने तसं सांगतील. आणि सांगून सोडून देणार नाहीत तर आपल्यासोबत राहून आपल्याला मदत करतील.

आपल्या साथीदाराला, जवळच्या मित्र-मैत्रिणीला, आई-वडिलांना आपल्या वागण्या-बोलण्यातला फरक फार चटकन कळतो. त्यांना ‘प्रॉम्प्ट’ द्यायला लागत नाही. खरंच भावनिक आधार पाहिजे असेल तर जवळच्या माणसांवर विसंबून राहणं हे नेहमीच चांगलं. अर्थात याशिवाय ‘एआय ’चे बाकी इतर अनेक फायदे आहेत, ते घ्यायला हवेतच. आवाज आणि व्हिडीओ ऐकून-पाहून त्यातल्या भावना, चेहऱ्यावरचे भाव, देहबोली समजून घेणारी ‘एआय’ टूल्स नाहीयेत असं नाहीये. ती अजून मुख्य प्रवाहात आलेली नाहीयेत आणि या प्रकारात खूप जास्त गुंतागुंत असल्याने संशोधन होण्यासाठी वेळ लागतोय. विशेषत: चेहऱ्यावरचे भाव आणि देहबोली समजून ‘एआय’ टूलने जर प्रतिसाद द्यायचा झाला तर त्यासाठी लागणारे ‘हार्डवेअर’ हे जास्त क्षमतेचं असेल. म्हणूनही त्याला मुख्य प्रवाहात यायला वेळ लागतोय. आवाज आणि व्हिडीओ समजून घेऊन प्रतिसाद देण्याच्या ‘एआय’च्या क्षमतेमध्ये आता या घडीला सर्वात मोठा प्रश्न आहे, तो मात्र अचूकतेच्या साशंकतेबद्दलचा.

ज्या वेगाने गोष्टी चालू आहेत त्यावरून आपण हा अंदाज लावू शकतो की याला फार वेळ लागणार नाही. आणि मानसिक स्वास्थ्यासाठीच्या उपचार पद्धतींमध्ये ‘एआय’ मुख्य प्रवाहात येईल, मात्र ‘विनामानवी तज्ज्ञ’ अशी उपचार पद्धत नजीकच्या भविष्यात होणार नाही. आताच्या घडीला तर नाहीच नाही.

‘एआय’ कशासाठी?

या विषयावर बोलत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, ‘एआय’चे खूप उपयोग आहेत. ते सतत विकसित होत असतं आणि विकसित होत राहणार आहे. ‘एआय’ला दोष देणं, ही भूमिका नक्कीच योग्य होणार नाही.

‘एआय’ जबरदस्त आहे – माहिती शोधायला, लेख लिहायला, ईमेल लिहायला, अभ्यासासाठी, भाषांतरासाठी, मनोरंजनासाठी, शंका सोडवण्यासाठी – कुठली का असेना. माहिती आणि ज्ञानासाठी तर झालंच, पण एक निर्मितीचं माध्यम म्हणूनही ‘एआय’ टूल्स मस्त आहेत! या सगळ्याच बाबतीत ‘एआय’चा उपयोग नक्कीच करूया.

करोनानंतर जग बदललं. एकटेपणाच्या काळात ‘एआय ’ने मदत केली हे नक्की. आताही अनेक लोक सतत ऑनलाइन काम करत आहेत. त्यामुळे घरात संवाद कमी साधला जातो. बाहेर फिरणं, भेटीगाठी यावर मर्यादा येतात आणि मनात विचारांचं वादळ निर्माण झालेलं असतं. या सगळ्या काळात ‘एआय’ने अनेकांना शब्द दिले. बोलायला संवाद दिले. काही लोकांना या संवादातून आधार मिळाल्यासारखं वाटलं.

त्यामुळे ‘एआय’ हे संवादाचं एक चांगलं साधन नक्की आहे, पण पूर्ण भावनिक आधार बनणं हे जरा जास्त होतंय. ‘एआय’ हा उत्तम साहाय्यक आहे, त्याला भावनिक साथीदार करायचं की नाही, हा प्रश्न आपण आपल्यासाठी नीट सोडवला पाहिजे.

एआयची सवय की व्यसन?

प्रत्येक वेळी जर आपलं मन अस्वस्थ असेल आणि आपला त्यावरचा उपाय असेल, ‘‘चॅटबॉट उघड, आणि बोल.’’ तर ‘एआय’ टूल्सच्या संवादातून काहीसा दिलासा मिळतो. हे आपल्याला थोडंसं ‘डोपामिन रश’ देतं. डोपामिन म्हणजे आनंद, प्रेरणा, आणि समाधानाशी जोडलेलं मेंदूमधलं रसायन. म्हणजेच, प्रत्येक संवादानंतर मनाला थोडा सुखावणारा अनुभव मिळतो. हाच अनुभव पुन:पुन्हा घ्यावासा वाटतो आणि इथेच सवय सुरू होते. सवय झाली, की ती सवय नको असतानाही आपण त्याच त्याच गोष्टीकडे वळतो. त्याचं व्यसन होतं. कुठलंही व्यसन त्रासदायकच. ‘एआय’ वापरायचं व्यसन लागणं, हे फारच जास्त साहजिक आहे. आणि हेही आहेच की, दिवसेंदिवस अनेकानेक ‘एआय’ साधने निर्माण होतच राहाणार आहेत आणि अधिकाधिक प्रभावी होत जाणार.

कुटुंबावर परिणाम अधिक गंभीर

आज अनेक शाळकरी मुले ‘एआय’ साधन वापरतात. शिकण्यासाठी हे उत्तम आहे, त्यात शंकाच नाही. पण जर कोणी लहान मूल, वयात येणारा मुलगा/मुलगी सतत ‘एआय’ कडे ‘मन मोकळं’ करत असेल, आणि त्यांचा आई-बाबांशी संवाद कमी झाला असेल तर समजून घ्यायला हवं की पुढे धोका आहे. आपल्याला आपल्या मुलांशी संवाद साधता यायला हवा आणि त्यांना मोकळं होण्यासाठी आपल्यासारखी जिवंत व्यक्ती कायम उपलब्ध हवी.

पुन्हा एकदा लक्षात घेऊ की ‘एआय’ चे सगळे टूल्स प्रेमळ भाषेतच बोलतात. पालकांना हे सतत लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, त्यांच्या मुलांशी प्रेमळ भाषेत बोलणारं मशीन अस्तित्वात आहे, ते त्यांच्या हातात आहे. यंत्राबरोबरची त्यांची ही वाढलेली ‘भावनिक जवळीक’ भविष्यात माणसांच्या नात्यांवर नेमका काय परिणाम करेल, हे एक प्रश्नचिन्ह आहे.

‘एआय’ नेमकं काय आहे हे समजण्याआधी जर आपल्या मुलांनी त्याला ‘भावनिक मित्र’ मानायला सुरुवात केली, तर त्यांचे भावविश्व कितपत स्थिर राहील? ही चिंता योग्य आहे, मात्र हा ‘एआय’चा दोष आहे की पालक म्हणून आपला, हा विचार खूपच गंभीरपणे आणि आपणच करायला पाहिजे.

‘एआय’ हवं नि प्रत्यक्ष संवादही ‘एआय’ वापरूया, शब्द, माहिती, संवाद, प्रेरणा यासाठी. कामे पटपट उरकण्यासाठी. काहीतरी छान निर्मिती करण्यासाठी. पण भावनिक आधारासाठी मात्र जवळच्या नात्यांवर जास्त विसंबून राहूया. आणि ती नाती टिकवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. मैत्रिणीशी किंवा मित्राशी बोलूया. आईला, ‘काय झालं गं?’ विचारूया. बायकोचं किंवा नवऱ्याचं ऐकूया. त्यांना समजून घेण्यासाठी, उत्तर देण्यासाठी नव्हे. मुलांशी फक्त अभ्यासाबद्दल नव्हे, तर त्यांच्या भावनांबद्दलही बोलूया. नातेवाईकांबरोबर ‘गेट टुगेदर’ करूया. ओळखीच्यांना प्रत्यक्ष भेटूया.

संवादासाठी माणसाने माणसाला प्रत्यक्ष भेटून एकमेकांशी नजरेला नजर देत बोलणं, याला अजूनही पहिलंच मानांकन आहे. त्याला अजूनतरी पर्याय नाही.

( लेखक ‘बेंचमार्क आयटी सोल्युशन्स’ मध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर असून ‘रिस्पॉन्सिबल नेटीझम’ चे सदस्य आहेत तसेच ‘मराठी सोशल मीडिया संमेलन’चे संस्थापकही आहेत)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mangesh.v.wagh@gmail.com