-डॉ. नंदू मुलमुले


माणसानं जगायचं कुणासाठी? तर, ‘स्वत:साठी’ हे उत्तर नव्या पिढीत लोकप्रिय असलं, तरी आजी-आजोबांच्या पिढीला ते पटेल का?.. जिथे मनाचा मनाशी कोणताच संवाद नाही, अशा व्यक्तीनं जीवनेच्छा कशी टिकवून धरायची?.. माधवराव आणि त्यांचा चाळिशीतला मुलगा राघव यांची कथा अशीच. माधवरावांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळतील का?

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
Loksatta Chaturang Fearless Concepts of fear by age
 ‘भय’भूती : भय अशाश्वतीचे
readers reaction on chaturang articles
पडसाद: शासनाने शिक्षणाकडे लक्ष द्यावे

माणसाच्या हातात त्याचा मृत्यू नसतो, असं सरसकट विधान केलं जातं. खरंतर जन्म माणसाच्या हातात नसतो, पुढे सारं आयुष्य आणि त्याचा शेवट सर्वस्वी त्याच्या हातात असतो. म्हणजे, असायला हवा. मृत्यू ही अत्यंत व्यक्तिगत, खासगी बाब आहे. त्यावर दुसरा कुणी, अगदी सख्खा मुलगाही मालकी गाजवू लागला, तर त्याला समजावणं क्रमप्राप्त ठरतं.

हेही वाचा…मुलांना हवेत आई आणि बाबा!

गोष्ट आहे सत्तरीचे माधवराव आणि चाळिशीतला त्यांचा मुलगा राघव यांची. माधवराव आणि त्यांच्या पत्नी उषाताई अत्यंत शांत, सौम्य प्रकृतीचे आई-वडील. त्यांच्या पोटी जमदग्नीचा अंश असलेला राघव कसा जन्मला कुणास ठाऊक. जन्म आपल्या हातात नसतो, तसं कोण जन्माला यावं हे आईबापाच्या हातात नसतं हेही खरं. लहानपणापासून राघव अतिशय हुशार, मात्र संतापी स्वभावाचा. सुरुवातीला ‘थोडा हट्टी आहे’ या कौतुकाचं रूपांतर ‘जिद्दी आहे.. आपलंच खरं म्हणतो.. ऐकतच नाही,’ या निरीक्षणापर्यंत केव्हा पोहोचलं कळलं नाही. जन्मल्यापासून आईचं आयुष्य अपत्याच्या धाकातच गेलं. माधवरावांनाही त्याच्या पंजाचे ओरखडे झोंबत. ‘तुम्ही मला अमक्या शाळेत घातलं, तिथे मुलंच चांगली नाहीत,’ ‘तमक्या शाळेत शिक्षक चांगले नाहीत,’ तिसऱ्या शाळेत ‘शाळाच चांगली नाही,’ अशा तक्रारींनी त्यानं अनेक शाळा बदलायला लावल्या. आणि पुढे ‘सारख्या शाळा बदलल्यानं तुम्ही माझं नुकसान केलं,’ म्हणून बापावरच खापर फोडलं! अशी अनेक खापरं मायबापांवर फोडण्यासाठी त्यानं आयुष्यभर गोळा करून ठेवली होती.

इंजिनीयिरगला प्रवेश घेताना माधवरावांनी त्याला विषय सुचवला, त्यावर ‘‘थांबा हो! तुम्हाला यातलं काही कळत नाही,’ असं डाफरून राघवनं स्वत:च विषय ठरवले. माधवरावांची पिढी अतीवनिष्ठा (हाय कमिटमेंट) असलेली. वडिलधारे जे सांगतात ते आपल्या हिताचं, असं समजून आयुष्याची वाट चालायची! पानात पडलं ते खायचं आणि मांडवात उभी केली त्या पोरीला सहधर्मचारिणी मानायचं. राघवची पिढी काहीशी अल्पनिष्ठा ठेवणारी आणि स्वैरशोध (हाय एक्स्प्लोरेशन) घेणारी. त्यामुळे माधवरावांनी त्याच्या हितासाठी काही सुचवायचं आणि त्यानं डाफरून उलटा रस्ता धरायचा, असं सुरू झालं. माणसाचा संतापी स्वभाव हा भोवतालच्या साऱ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात असाव्यात या हेतूपोटीच तसा झालेला असतो. जोवर नियंत्रण आहे, तोवर ते तुलनेनं शांत असतात. अधूनमधून ते हसतात, हास्यविनोदात भाग घेतात.. मात्र तो विनोद आपल्यावर येऊ नये, इतरांची हिम्मत वाढू नये, यासाठी अधूनमधून गुरगुरत राहतात.

हेही वाचा…खाऊ या ‘त्यांच्या’साठीही!

राघवची बहीण लग्न होऊन सासरी गेली. अचानक हार्टअटॅक येऊन आईचा निमूटपणे चाललेला इहलोकीचा प्रवास संपला. आता घरात फक्त साडेतीन माणसं उरली! राघव, त्याची बायको, तीन वर्षांची मुलगी आणि सेवानिवृत्त माधवराव. राघवची बायको समंजस निघाली. तिनं नवऱ्याच्या स्वभावाशी जुळवून घेतलं. तसेही दिवसाचे तिचे दहा तास जाणं-येणं धरून नोकरीत जायचे. उरलेल्या वेळात स्वत:साठीही हवा, म्हणून नवऱ्याचा स्वभाव तिनं स्वीकारला, त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. किमान त्याची तक्रार तिनं कुणाजवळ केली नाही.

संघर्ष म्हणायचा तो उरला फक्त बापलेकात. माधवरावांनी निवृत्ती तशी सर्वार्थानं स्वीकारली, त्यामुळे बापाकडून संघर्ष संपलाच होता. मात्र नातं असेपर्यंत काही मुद्द्यांवर एकमेकांच्या मताला छेद जाणारच. वडिलोपार्जित शेताचा तुकडा आपल्या विश्वासू गड्याच्या नावे करावा, असं माधवरावांचं म्हणणं होतं. तर ‘‘तो दारू पितो, त्याच्या नावे बरंच कर्ज झालं आहे. तुमच्या मृत्युपत्रावरची शाई वाळेपर्यंत तो शेत फुंकून मोकळा होईल,’’ असं राघवचं म्हणणं. ‘‘तुम्हाला काय म्हणावं आता?.. कशाला त्या दारूड्याला आजोबांच्या नावाचं शेत देता? तुमच्या दानशूरतेचा त्या दगडावर काहीही परिणाम होणार नाही,’’ असं तिरकस, तिरसट आवाजात चिडून बोलणं. अशा अनेक छोटया छोटया प्रकरणांतून धडा घेऊन माधवरावांनी साऱ्याच सांसारिक देवाणघेवाणीतून लक्ष काढून घेतलं. आता उरलं काय? तर गावाकडचं घर आणि पुढे निघून गेलेल्या जोडीदाराच्या आठवणी.

हेही वाचा…सांदीत सापडलेले.. ! : शिस्त

वडिलांनी गावाकडे एकटं राहू नये, हे राघवचं म्हणणं. माधवराव मुंबईला राघवकडे काही दिवस बरे राहात, मग त्यांना एक परकेपणाची भावना घेरू लागे. सारं काही उत्तम, मात्र पोराशी मोकळा संवाद नाही. त्यात पलीकडच्या बेडरूममध्ये रात्रीच्या नीरव शांततेत नवरा-बायकोंचे काही वाद सुरू झाले, आवाज चढत गेले, की माधवरावांना विलक्षण चोरट्यासारखं होई. सूनबाईला विचारलं, तर ती सहज म्हणायची, ‘‘कुठले वाद? बाबा असले वाद तर चालत राहतात त्यांच्या-माझ्यात. तुम्ही नका टेन्शन घेऊ!’’ पण तणाव हा हवेत पसरलेल्या धुळीसारखा. तो टाळून श्वास घेणंही अशक्य. मग पुढचे काही दिवस माधवराव अस्वस्थ राहात. गावी एक वेगळंच एकटेपण असे, पण ‘माणसांच्या अभावातलं एकटेपण हे माणसांतल्या एकटेपणापेक्षा बरं,’ या विचारानं ते गावी परतत. तिथे सोबतचे निवृत्त मित्र असेच विखुरलेले. नाही म्हणायला त्यांचे फॅमिली डॉक्टर प्रधान भेटत. आता ओसाड पडलेल्या दवाखान्यात गप्पांचा फड रंगे. दोघं शाळकरी मित्र. डॉक्टरांचा मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, असा चौफेर अभ्यास. माधवराव चेष्टेनं त्यांना ‘निसर्गोपचारतज्ज्ञ’ म्हणत. म्हणजे डॉक्टर काहीही औषधं देवोत, त्यांचे रुग्ण नैसर्गिक प्रतिकारशक्तीनंच बरे होतात!

‘‘तुम्ही तिकडे एकटे राहून का आमच्या डोक्याला ताप देता? तुम्हाला काही झालं तर आमची किती धावपळ होईल याचा काही विचार?’’ माधवराव गावाकडे निघाले की राघवची कायम तक्रार असे. त्याच्या बोलण्यात तथ्य नव्हतं असं नाही, पण प्रश्न पुन्हा बोलण्याच्या स्वराचा. त्यात काळजीपेक्षा ‘काय डोक्याला ताप आहे’ ही भावना! अतिकाळजी मनाला थकवणारी असते. मग कधी तरी गफलत ठरलेली. एकदा पायरीवरून माधवरावांचा पाय निसटला आणि मुरगळला. हाड मोडल्याची शक्यता गृहीत धरून डॉक्टरांनी उपचार सुरू केला. अगदी धावतपळत नाही, पण राघवला यावं लागलं. त्यानं वडिलांचं चंबुगवाळं उचललं आणि मुंबईला नेलं.

हेही वाचा…माझी मैत्रीण : मैत्रीतलं चुंबकत्व!

माधवराव काहीच दिवसांत ठीक झाले, शरीरानं. मात्र आता त्यांच्या मनानं एक वेगळाच रोख धरला. निरिच्छा त्यांच्या मनाला धुक्यासारखी वेढू लागली. पहाटे उठणारे, मॉर्निग वॉक न चुकता करणारे माधवराव आता सकाळी उठेनासे झाले. जागे होत, मात्र बिछान्यावर पडून राहात. संध्याकाळचं जेवण, आम्लपित्त होतं या कारणानं बंद झालंच होतं, आता त्यांनी न्याहारीही बंद केली. ‘‘तुम्ही लोक दिवसभर काम करता, तुम्हाला कॅलरीज्ची गरज आहे. माझं काय, न कुठे जाणं न येणं! शो-पीस म्हणून ठेवलेल्या इंजिनसारखं! त्यात डिझेल भरून काय उपयोग?’’ माधवरावांचं हे स्पष्टीकरण रास्त होतं, पण त्यांचं वजन लक्षणीयरीत्या कमी दिसायला लागल्यावर सूनबाईनं काळजी व्यक्त करायला सुरुवात केली. राघवनं सरळ बापाला फैलावर घेतलं, ‘‘आता हा कोणता उपद्वयाप सुरू केलात? कशाला टेन्शनमध्ये भर घालता आमच्या?’’ माधवराव काही बोलले नाहीत. त्यांना आता प्रतिवाद करण्याची इच्छा उरली नव्हती. संवादच नाही, तिथे प्रतिवाद कुठला? इथे राघवला पहिल्यांदाच क्रोधानं कुणाच्या मनाचा ताबा मिळत नाही याची जाणीव झाली. त्यानं डॉ. प्रधान यांच्याशी संपर्क केला. ते अनायासे मुंबईत त्यांच्या मुलाकडे आले होते.

‘‘डॉक्टर, खरं सांगू?’’ माधवराव मित्राला भेटून थोडे मोकळे झाले होते. ‘‘अशी वेळ येऊन ठेपते आयुष्यात, की लक्षात येतं, आपल्या अस्तित्वाचा ना समाजाला, ना कुटुंबीयांना, ना स्वत:ला काही उपयोग उरला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते, असा कंटाळा मनाला वेढून राहतो. उजेडाचे कायदे पाळायचे, रात्र झाली की दिवे जाळायचे.. काय आहे जगण्यात एवढं, किती रोज मृत्यूला टाळायचे?.. अशी मन:स्थिती होऊन जाते.’’

‘‘बाबा, असले विचार का करता?’’ वडिलांचे निरवानिरवीचे विचार ऐकून राघवला पहिल्यांदा आतून हलल्यासारखं झालं. माधवरावांनाही त्याच्या स्वरात कधी नव्हे ते काळजी जाणवली. ‘‘आपल्यात संवाद नाही राहिला रे! नुसतं खाणंपिणं म्हणजे स्वत:ला जगवणं. जीवनाला प्रयोजन लागतं. कुणासाठी, कशासाठी, या प्रश्नांना उत्तरं लागतात.’’

‘‘स्वत:साठी?’’ कधी नव्हे तो राघवचा स्वर खाली उतरला. ‘‘स्वत:साठी ही शेवटची पायरी! माणूस आपलं अस्तित्व हे इतरांच्या संदर्भात पाहात असतो. ते संदर्भ सुटले, क्षीण झाले, की मग अस्तित्वाचं प्रयोजन उरत नाही.’’ ‘‘पण आपणहून मरणाला जवळ करायचं? इच्छामरण?’’ डॉक्टरांनी मित्रत्वाच्या नात्यानं थेट प्रश्न केला.

हेही वाचा…जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट

‘‘डॉक्टर, ती प्रेरणा जन्मल्यापासूनच कार्यरत असते. तुम्हीच मानसशास्त्र सांगता ना?.. व्यसनांच्या आहारी जाणं, बेफाम वाहन चालवणं, साहसी खेळ करणं, औषधोपचारांकडे दुर्लक्ष करणं, हे सारं माणूस स्वेच्छेनं करत असतो ना?’’ राघव निरुत्तर झाल्यासारखा झाला आणि त्यानं डॉक्टरांकडे पाहिलं.

‘‘हे बघ राघव,’’ डॉक्टर नंतर एकट्या राघवलाच बाजूला घेऊन बोलू लागले. ‘‘तुझा बाप शांत स्वभावाचा असला, तरी विचारांचा ठाम आहे. त्याला नैराश्याची कुठलीच लक्षणं नाहीत. त्यानं जो निर्णय घेतला असेल त्याचा आदर करणं हेच आपल्या हातात आहे. तू फक्त विनंती करू शकतोस.’’

राघव डॉक्टरांसह आत आला. वडिलांसमोर बसत म्हणाला. ‘‘बाबा, तुम्ही फक्त तुम्ही म्हणून आमच्यासाठी हवे आहात. माझ्या स्वभावाला संतापी वृत्तीचे वेढे पडले आहेत, त्यामुळे आतापर्यंत कधी ते बोललो नसेन मी.. पण,’’ गहिवरणं राघवच्या स्वभावात नसलं तरीही काही काळ त्याला थांबावं लागलं.

‘‘तुम्ही हवं तिथे राहा, हवे तसे राहा, हवे तितके दिवस.. मी त्रागा करणार नाही.’’

हेही वाचा…‘ती’च्या भोवती..! : आजही आईचं घर उन्हाचंच?

‘‘कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतम समा:’’ डॉक्टर प्रधान हलक्या आवाजात म्हणू लागले. राघवनं त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. ‘‘ईशावास्योपनिषदातला मंत्र आहे. तो नेहमी ऐकवतो मला!’’ माधवरावांच्या चेहऱ्यावर किंचित स्मित उमटलं होतं. राघवनं पुन्हा प्रश्नार्थक पाहिलं. ‘‘माणसानं आपलं कर्म करीत शंभर वर्ष जगण्याची इच्छा बाळगावी. त्याच्या हाती अन्य दुसरा पर्याय नाही!’’ राघवच्या खांद्यावर हात ठेवत माधवराव म्हणाले. त्यांच्या आत्मस्वीकारानं डॉक्टर आणि राघव दोघंही आश्वस्त झाल्यासारखे दिसत होते.

nmmulmule@gmail.com