एलजीबीटीक्यू (प्लस) समाजाबद्दल आता फारसं कुतूहल राहिलेलं नाही. मात्र चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी लैंगिकता या विषयावरच बोलणं कठीण होतं, त्यामुळे समलैंगिकता हा विषय तर फारच दूरचा. अर्थात समाजात हा घटक प्राचीन काळापासून आहेच, अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर नवी पिढी निदान ते समजून घेऊ लागली आहे, हा बदल महत्त्वाचा आहे.

‘‘तिच्याशी नको बोलू, ती ‘ती’ आहे.’’

त्यांच्याशी झालेली माझी ही पहिली ओळख. ‘कॉलेज हॉस्टेल’मध्ये ‘वाट्टेल ते चालतं’ असं अनेकदा ऐकल्यामुळे वसतिगृह आणि तिथं राहणाऱ्या मुली यांच्याबद्दलचं कुतूहल कमालीचं वाढलेलं असतानाच्या काळातलं हे वाक्य. ‘ती’ म्हणजे काय हे माहीत नव्हतं. कुणी धड काही सांगत नव्हतं. असे विषय खुलेपणाने बोलणं तेव्हाही होत नव्हतं. कुजबूज असायची, पण मी वसतिगृहामध्ये न राहिल्यामुळे माझ्यापर्यंत यायला वेळ लागायचा.

काही दिवसांनी ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धे’त ‘चंद्रपूरच्या जंगलात’ ही एकांकिका पाहिली. विक्रम वाटवे लिखित आणि चेतन दातार दिग्दर्शित मूळ एकांकिका. चेतननं ‘आर देअर एनी टायगर्स इन कांगो’ हे इंग्रजी नाटक वाचून विक्रम वाटवेला मराठीकरण करायला दिलं होतं. मी तेव्हा नुकतीच नाटक बघू लागले होते. ऐकीव माहितीनुसार आपण काही तरी खूप ‘बोल्ड’ बघणार आहोत, असा माझा समज झाला होता. प्रत्यक्ष एकांकिका सुरू झाली. सालाबादप्रमाणे दुसऱ्यांची नाटकं ‘पाडायला’ आलेली मुलं नाट्यगृहात खचाखच भरलेली होती. एकांकिका सुरू झाली आणि काहीच वेळात रंगमंचावर मधोमध टाकलेल्या कॉटवरून दोन पुरुष झोपून उठले आणि अचानक संपूर्ण नाट्यगृह टाचणी पडली तरी ऐकू येईल इतकं शांत झालं. गडबड, हल्ला, धिंगाणा हे सगळं करण्याची पूर्ण संधी असतानाही.

मी शेजारी बसलेल्या मैत्रिणीला विचारलं, ‘‘काय झालं?’’

ती म्हणाली, ‘‘अगं तुला कळलं नाही का? ते ‘ते’ आहेत.’’

मला तेव्हा एवढंच कळलं की ‘ते’ वेगळे असतात. ‘समलिंगी संबंध’ या विषयाचं गांभीर्य कळण्याएवढी माझी बुद्धी विकसित नसावी तेव्हा, पण हा विषय समाजात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करतो, कुणीच याबद्दल फार उघडपणे काही बोलत नाही, जे त्यातले असतात ते कदाचित संकोचाने आणि जे नसतात त्यांना हे सगळं चुकीचं वाटतं म्हणून. पण हा विषय अनेक निषिद्ध विषयांपैकी एक आहे, हे मला त्या वेळी कळलं.

वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी ‘लैंगिक संबंध’ हीच भयंकर काही तरी लपवून ठेवण्यासारखी गोष्ट असते असं वाटत असताना, ‘समलैंगिक संबंधांबद्दल’ कोण बोलणार आणि कुठून काही कळणार! जे कळत होतं ते अर्धवट काही तरी होतं. तेव्हा ‘माहितीचं जाळं’ नसल्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीची खोलात जाऊन माहिती वगैरे घेता येत नव्हती. तेव्हा ती गरजही वाटली नाही, कारण सर्वसामान्य जगातली लैंगिकतेची प्रचलित संकल्पना घेऊन जगणारीच माणसं आजूबाजूला होती किंवा निदान तशी बाहेरून तरी दिसत होती. त्यामुळे हा विषय संपूर्णपणे वजा करून आयुष्य सुरू होतं.

दीपा मेहता यांचा ‘फायर’ हा चित्रपट १९९६ मध्ये आला तेव्हा तो फक्त प्रौढांसाठी असल्याने मी पाहिला नव्हता. जब्बार पटेल यांच्या ‘उंबरठा’ चित्रपटातल्या ‘त्या’ दृश्याचा अर्थ खूप उशिरा कधी तरी मला कळला. विजय तेंडुलकरांचं ‘मित्राची गोष्ट’सुद्धा मी उशिरा वाचलं. कालांतराने मी मुंबईला राहायला आले आणि एक वेगळं जग माझ्यासमोर आलं. माझ्या यापूर्वीच्या अतिसुरक्षित जगात नसलेल्या असंख्य गोष्टी या जगात होत्या. मुख्य म्हणजे विविध प्रकारे गुंतागुंतीची नाती जपणारी माणसं होती, तशीच समलैंगिक संबंध ठेवणारी माणसंही होती. माझ्यासाठी हे सगळं त्यावेळी धक्कादायक होतं, स्वातंत्र्याची एक भीतीदायक बाजू दाखवणारं होतं. उगाच बंडखोरी करणारी, जे प्रस्थापित आणि प्रचलित असतं त्याला विरोध करणारी, ठरावीक मार्गावरून न जाण्यात आनंद मानणारी काही माणसं मुद्दाम हे असं काही तरी करून लक्ष वेधून घेतात असं तेव्हा मलाही वाटायचं. आजही समलैंगिकतेबद्दल फार काही सहिष्णू वातावरण नाहीए, २५ वर्षांपूर्वी तर नक्कीच नव्हतं.

सिनेजग, फॅशन इंडस्ट्री यात अशी माणसं फार असतात, असं मला वाटायचं. थोडी भीतीही वाटायची. ‘ही माणसं फार आक्रमक असतात, विचित्र वागतात, उघडपणे आवाहन करता येत नाही म्हणून छुप्या मार्गांनी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात’, असं बरंच काही त्या वेळी बोललं जायचं. माझ्या जगात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग कधीच नव्हता. पण जसजसं मी जग अधिक बघितलं, माणसांना भेटले, माझं वाचन वाढलं, अनुभव येत गेले, तसा मला या बाबतीत अधिक डोळसपणे विचार करावा, माहिती घ्यावी असं नक्कीच वाटू लागलं आणि वाटत आहे.

लैंगिक संबंध ही माणसाची प्राथमिक गरज असली, तरी फक्त तीच सगळ्यांत महत्त्वाची असते असं मी अजिबात मानत नाही. बहुतांश माणसांना तरुण वयात करिअर, पैसा, कौटुंबिक जबाबदाऱ्या यासाठीही वेळ द्यावा लागतो. त्यातही मोलाचा आनंद असतो. माणसाची ओळख त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे तयार होते किंवा व्हायला हवी, लैंगिकतेमुळे नाही. पण आपल्या संस्कृतीत लैंगिक व्यापाराला प्रचंड महत्त्व आहे. नैतिकतेचे सगळे निकष लैंगिकतेशीच येऊन थांबतात. त्यामुळे रूढ समजुतींच्या पलीकडे समलैंगिक संबंध जपणाऱ्यांची यात भयंकर कुचंबणा झाली.

लैंगिकता ही नैसर्गिक ऊर्मी, वाढीच्या वयातले अनुभव, समज-गैरसमज, सामाजिक समजुतींचा पगडा आणि कुतूहल या गोष्टींमुळे विकसित होते. प्रत्येक मनुष्याची जडणघडण वेगळी आणि त्यामुळे त्याच्या भावनांचं प्रकटीकरण वेगळं. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं आणि त्यातून प्रजोत्पादन होणं हा कालचक्राचा भाग आहे. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.

पूर्वापार चालत आलेले ‘जेंडर बायस’ किंवा ‘लिंगपूर्वग्रह’ आपल्या मनात खूप सूक्ष्मपणे बिंबलेले असतात. लहानपणी ‘घर-घर’ खेळताना मुलगा नोकरीवरून येतो आणि मुलगी भातुकलीच्या छोट्या बोळक्यात त्याला चहा करून देते. लग्न लावताना आपण बाहुला-बाहुलीचंच लावतो. म्हटलं तर या सगळ्याच सामाजिक सवयी आहेत. सातत्याने केलेल्या गोष्टी योग्य वाटायला लागतात तशा. वंशवृद्धीसाठी तयार केलेल्या कुटुंबरचनेच्या सोयीच्या. पण कुटुंब म्हणजे प्रेमाच्या माणसांनी एकत्र राहणं हीच व्याख्या मला अभिप्रेत आहे. आणि मग एखाद्याला या चौकटीत बसायचंच नसेल, तर लगेच ते समाजविघातक आहे असं म्हणणं मला तरी योग्य वाटत नाही.

आजही कित्येक लग्नं त्या व्यक्तींची समलैंगिकता समाजासमोर येऊ नये म्हणून लावली जातात. कित्येक घटस्फोट जोडीदार समलैंगिक आहे म्हणून होतात. ‘लग्न’ करण्याची इच्छा नसण्याच्या अनेक कारणांमध्ये हल्ली समलैंगिकता हेही कारण आहे. म्हणजे संपूर्ण आयुष्य भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर काढणं हे पराकोटीचं कठीण असतानाही केवळ सामाजिक दबाव म्हणून ही मंडळी हे करायला तयार होत असतील तर तो केवढा मोठा अन्याय आहे.

पूर्वी ही संकल्पना परदेशी असल्याचं मानलं जायचं. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव होऊन आपली मुलं ‘बिघडली’ असं म्हटलं जायचं. पण गंमत म्हणजे एक अभ्यास असं सांगतो की, भारतात प्राचीन काळापासून समलिंगी संबंध प्रचलित होते. ब्रिटिशांनी १८६२ मध्ये कायद्यात ३७७ हे कलम आणलं जे पुढे स्वतंत्र भारतातसुद्धा बराच काळ लागू केलं गेलं. अल्पसंख्य असला तरी हा गटसुद्धा खूप पूर्वीपासून अस्तित्वात होता. आणि जोपर्यंत दुसऱ्या कुणाही मनुष्य किंवा प्राण्याला शारीरिक आणि मानसिक इजा पोहोचवत नाही, तोपर्यंत एखाद्याचा जोडीदार ‘समलिंगी’ आहे की ‘भिन्नलिंगी’ यानं जगाला का फरक पडावा?

आपल्याला आपला धर्म थोडाफार माहीत असतो, किंवा नसला तरीही आपण आपल्या आधीच्या पिढ्यांचं बघून त्याचं अनुकरण करायला शिकलेले असतो. दुसऱ्या कोणत्याही धर्माची आपल्याला तितकीशी माहिती नसते. आयुष्यात जेव्हा त्यातली माणसं आपल्या संपर्कात येतात तेव्हा आपण त्याबद्दल थोडंफार शिकत जातो. माहिती घेत जातो. आपल्याला ते पटतं की पटत नाही हा प्रश्नच नसतो. तो त्यांचा धर्म असतो आणि ते त्याचं पालन करत असतात, संपला विषय.

हेही वाचा

अजूनही माझ्या आजूबाजूला असे अनेक जण आहेत जे समलैंगिक आहेत असं मला बाहेरून कळतं. माझ्याशी कुणी तसं प्रत्यक्ष बोलत नाही. कदाचित मी अतिशय पारंपरिक संसाराच्या चौकटीत बसल्यामुळे मी त्यांना तितकी जवळची वाटत नसेन, मी समजून घेईन असं वाटत नसेल, किंवा मी त्यांना माझ्यासारख्यांमध्ये ओढण्याचा प्रयत्न करेन असं त्यांना वाटत असेल, तर तसं मला काहीच करायचं नाहीये. उलट हे जेवढं मोकळं होईल तेवढं त्याच्याशी संबंधित हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरण कमी होईल, असं मला वाटतं.

मी ‘चंद्रपूरच्या जंगलात’ पाहिलं तेव्हा मी ज्या वयाची होते, त्याच वयाची आज माझी मुलगी आहे. तिच्या वयाच्या बाराव्या वर्षांपासून मी तिच्याशी अनेकदा ‘लैंगिक संबंध’ या विषयावर बोलले आहे, कारण आता ते गरजेचं आहे. ‘डेटिंग’ म्हणजे काय, त्यात तुला काय अपेक्षित आहे, कमी वयातल्या लैंगिक संबंधांचे परिणाम, मुक्त लैंगिक संबंधांचे परिणाम, स्पर्शाची ओढ, भूक, जाणीव, शारीरिक संबंधांच्या मागचं शास्त्र याबद्दल जितकं मला बोलता येईल तितकं मी तिच्याशी बोलते. मध्यंतरी मी तिला विचारलं, ‘‘तुझ्या माहितीत कुणी समलैंगिक जोडपी आहेत?’’ ती पटकन आणि अतिशय शांतपणे ‘हो’ म्हणाली. ‘‘मग यावर तुझं म्हणणं काय?’’ असं विचारल्यावर ‘‘काही नाही, माझं काय म्हणणं असणार. टू ईच हिज ओन… ज्याचा-प्रश्न आहे!’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला बरं वाटलं. आपल्या जगाच्या पलीकडे जग आहे, त्याला त्याच्या पद्धतीनं जगू द्यावं, त्याबद्दल चीड, द्वेष, घृणा, तिरस्कार मनात बाळगू नये, इतपत सारासार विचार ती करू शकत असेल, तर आई म्हणून मला आनंद आहे.