वैशाली बिनीवाले
‘‘कन्या वरयते रूपम् माता वित्तं पिता श्रृतम्। बान्धवा: कुलमिच्छन्ति, मिष्टान्न इतरे जना:।।’’
विवाहासंदर्भात प्रत्येकाच्या आवडीनिवडींची माहिती देणारा हा प्रसिद्ध संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ असा, लग्न ठरवताना विवाहेच्छुक मुलगी आपल्या होणाऱ्या जोडीदाराचं रूप बघून त्याला पसंत करते. मुलीची आई तो वर सुखवस्तू घरातला आहे ना? आपल्या मुलीला काही कमी पडणार नाही ना? याचा विचार करते. मुलीचे वडील जावयाचे शिक्षण, कर्तृत्व बघतात. नातेवाईक मुलाचं कुळ बघतात. तो सुसंस्कृत घरातला आहे का, याची खात्री करतात. तर इतर लोक मात्र फक्त लग्नातल्या भोजनाचा आनंद घेतात.

या संस्कृत श्लोकात म्हटल्याप्रमाणे, आपल्या समाजात विवाह ठरवताना जोडा अनुरूप आहे ना? हे बघितलं जातं. मुला-मुलीचं रंग, रूप, शिक्षण, व्यवसाय, कुटुंब याबरोबरच धर्म, जातसुद्धा विचारात घेतली जाते. मुला-मुलीचे गुण-दोष पारखले जातात. कुटुंबीयांचा, नातेवाईकांचा विचार केला जातो. अनेकदा जन्मपत्रिकेतले किती गुण जुळताहेत यावरही लग्न ठरतं. ही सर्व अनुरूपता अजमावताना वैद्याकीय बाबींकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होतं. लग्न ठरवताना लक्षात घेण्याची एक महत्त्वाची बाब म्हणजे नात्यामधले विवाह संबंध कसे आहेत, ते पाहणे. पूर्वीच्या काळी आपल्या देशात अनेक ठिकाणी आत्ते-मामे भावंडांच्यात लग्न लावण्याची प्रथा होती. आपली मुलगी लग्न होऊन आत्याच्याच घरी गेली तर तिला सासुरवास होणार नाही, जास्त हुंडा द्यावा लागणार नाही आणि ती चांगल्या, ओळखीच्याच घरात राहील या कारणाने ही पद्धत योग्य समजली जात असे. अजूनही काही समाजात नात्यात लग्नसंबंध जुळवले जातात.

शाम आणि बबिता, दोघे आत्ते-मामे भावंड. समाजातल्या रीतीप्रमाणे त्या दोघांचं लग्न झालं. दोघेही शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सामान्य प्रकृतीचे. लग्नानंतर एका वर्षातच बबिताला मुलगा झाला. मुलगा जन्मत: सुदृढ होता. दोन वर्षांनी बबिताला एक मुलगीही झाली. सगळं छान चालू होतं. मुलगा दोन वर्षांचा असताना त्याला अचानक फीट्स येऊ लागल्या. त्याच्यावर औषधोपचार सुरू झाले. एक-दोन वर्षांतच त्याच्या शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागले. हातापायातली शक्ती हळूहळू कमी व्हायला लागली. त्याला उभं राहायला, चालायला त्रास होऊ लागला. तपासण्या करताना लक्षात आलं की, बाळाच्या गुणसूत्रांमध्ये दोष होता. त्यामुळे त्याच्या मेंदूची झीज (अॅट्रोफी) सुरू झाली होती. दुर्दैवानं या आजाराला वैद्याकशास्त्रामध्ये उपचार नव्हते. गुणसूत्रातील हा दोष आनुवंशिक असल्यानं बबिता व शामची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान लक्षात आलं की, दोघेही या आजाराचे वाहक (कॅरियर) होते. काही वर्षांत मुलाला बसायला, अन्न गिळायला व अखेर श्वास घ्यायलासुद्धा त्रास होऊ लागला. त्यांच्या छोट्या मुलीलाही हाच आजार असल्याने वयाच्या दुसऱ्या वर्षी तिलाही त्रास सुरू झाले. औषधोपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे दोन्ही मुलं त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी दगावली.

काही कुटुंबांत आनुवंशिक आजार असू शकतात. बहुतेक वेळी ते व्यक्त होत नाहीत. मात्र नात्यात लग्न केल्यास नवरा व बायको दोघांमध्येही हा आजार असण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी त्यांना होणाऱ्या अपत्यांमध्ये आजार गंभीर स्वरूपात व्यक्त होतो. जसा, शाम व बबिताच्या बाळांमध्ये झाला. म्हणूनच आधुनिक वैद्याक शास्त्रानुसार नात्यातील लग्नसंबंध नक्कीच टाळायला हवा.

गीता आणि अविनाश यांची मुलगी मिताली हिच्यासाठी वर संशोधन जोरात सुरू आहे. मितालीसाठी एक पूरक स्थळसुद्धा सांगून आलंय. मुलगा उच्चशिक्षित आहे, चांगल्या कंपनीत नोकरीला आहे, सुशिक्षित कुटुंबातला आहे. मुला-मुलीने एकमेकांना पसंतही केलंय. पण मग कुणीतरी म्हणालं की, दोघांचा रक्तगट एकच असल्याने पुढे बाळ व्हायला त्रास होईल. रक्तगट एकच म्हणून इतकं चांगलं स्थळ सोडून द्यायचं का? रक्तगट एक असेल तर खरंच काही त्रास होतो का? हे विचारायला गीता आणि अविनाश आले होते. मुला-मुलीचा रक्तगट एक असेल तर बाळ होण्यात अडचणी निर्माण होतात, यासारख्या अनेक गैरसमजुती समाजात आढळतात. रक्तगट एक असेल तर काहीही समस्या निर्माण होत नाही. मुलीचा रक्तगट ‘निगेटिव्ह’असेल व तिच्या नवऱ्याचा ‘पॉझिटिव्ह’असेल तर मात्र गर्भारपणात काही वेळेस समस्या निर्माण होऊ शकते. यामध्ये बाळाचा रक्तगट वडिलांप्रमाणे ‘पॉझिटिव्ह’ असल्यास आईच्या रक्तामध्ये बाळासाठी त्रासदायक अशा ‘अँटीबॉडीज’ निर्माण होऊ शकतात. मात्र आधुनिक वैद्याकशास्त्रात औषधांच्या साहाय्याने हा त्रास टाळता येऊ शकतो म्हणूनच रक्तगट कोणताही असला, तरी लग्न करायला हरकत नाही.

प्रत्येक विवाहेच्छुक जोडप्याने ‘थॅलेसेमिया’ या रक्ताच्या आजाराची तपासणी मात्र नक्की करून घ्यायला हवी. ‘अल्फा’ व ‘बीटा’ थॅलेसेमिया हे आजार रक्तातील हिमोग्लोबिनमधील प्रथिनांच्या साखळीतील दोषांमुळे होतात. या आजारात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. ‘बीटा थॅलेसेमिया’ दोन प्रकारचा असतो. ‘थॅलेसेमिया मेजर’मध्ये प्रथिनांच्या दोन्ही साखळ्यांत दोष असतो. या आजारांचे अगदी लहान वयातच निदान होते. यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी होत असल्याने शरीरात वारंवार रक्त भरावं लागतं. हा आजार खूपच गंभीर असतो.

‘थॅलेसेमिया मायनर’मध्ये प्रथिनांच्या एका साखळीत दोष असतो. या आजाराच्या व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण थोडे कमी असते. स्वत:ला हा आजार असल्याची माहिती बहुतेकदा त्यांना नसते. या व्यक्ती प्रामुख्याने आजाराच्या वाहक (कॅरियर) असतात. गरोदरपणातील तपासण्यांमध्ये प्रेमा हिला ‘थॅलेसेमिया मायनर’ आजार असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे तिच्या नवऱ्याची अखिलची तपासणी करण्यात आली. अखिल पण ‘थॅलेसेमिया मायनर’ होता. अशा वेळेस गर्भाला ‘थॅलेसेमिया मेजर’ असण्याचा धोका असल्याने गर्भजल परीक्षा करून तपासणी केली. दुर्देवानं गर्भाला ‘थॅलेसेमिया मेजर’चा आजार असल्याचं निदान झालं. अशा परिस्थितीत प्रेमाला नाइलाजानं गर्भपात करायला लागला. नवरा व बायको दोघेही ‘थॅलेसेमिया मायनर’ असतील तर होणाऱ्या बाळांमध्ये ‘थॅलेसेमिया मेजर’ची शक्यता २५ टक्के असते, तर ५० टक्के बाळांमध्ये ‘थॅलेसेमिया मायनर’ आढळतो व २५ टक्के बाळांमध्ये ‘थॅलेसेमिया’ हा आजार नसतो. म्हणूनच ‘थॅलेसेमिया मायनर’ असणाऱ्या दोन व्यक्तींनी एकमेकांबरोबर विवाह करणं टाळावं.

लग्न करण्यापूर्वी मुला-मुलींनी हिमोग्लोबीन, रक्तातील साखर, थायरॉईड याबरोबरच एच.आय.व्ही., हिपॅटायटीस सारख्या रक्त तपासण्यासुद्धा नक्की कराव्यात. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याबद्दलही माहिती असावी. कॉलेजमधील शेवटच्या वर्षात माधवीला नैराश्याचा (डिप्रेशन) त्रास सुरू झाला. महाविद्यालयामधील वातावरण, अभ्यासाचा ताण अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत होत्या. नैराश्य दूर होण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून औषधोपचार सुरू केले आणि त्याचा चांगला उपयोगही झाला. तिची आई तिला दररोज नाश्त्यातून औषधं देत असे. यथावकाश कॉलेज संपलं, नोकरी लागली आणि लग्नही झालं. लग्नाच्या वेळी तिच्या नैराश्याच्या आजाराची कल्पना सासरच्यांना दिली गेली नव्हती. सासरी गेल्यावर माधवीची औषधं बंद झाली. नवीन संसाराच्या ताणाने व औषधं बंद झाल्याने माधवीला पुन्हा नैराश्याचा झटका आला.

आपल्या समाजात आजही मानसिक आजारांविषयीची माहिती लपवली जाते. त्याविषयी मोकळेपणानं बोललं जात नाही. दुर्दैवानं यामुळे भावनिक नातं निर्माण होण्यास अडसर होतो. विवाहेच्छुक मुला-मुलींची एकमेकांबरोबरची भावनिक अनुरूपतासुद्धा बघायला हवी. यासाठी त्यांनी एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा. एकमेकांना समजून घ्यायला हवं. लग्नानंतर तडजोडी तर करायला लागतातच परंतु ते शक्य आहे का? याचा विचार आधीच व्हायला हवा. यासाठी विवाहपूर्व समुपदेशन उपयोगी ठरतं. गेल्याच आठवड्यात माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. लग्नाला एक वर्षं झालं होतं, परंतु अजूनही त्यांना शरीरसंबंध ठेवायला जमलं नव्हतं. याविषयी एकमेकांशी ते मोकळेपणानं बोलू शकले नव्हते व इतर कुणाशी बोलायचं हे त्यांना समजत नव्हतं. सुरुवातीला ठेवलेला संयम आता सुटत चालला होता आणि आता चिडचिड, अबोला, भांडणं सुरू झाली होती. अगदी नाइलाजाने त्याने आपल्या बहिणीला ही समस्या सांगितली आणि मग बहीणच त्या दोघांना माझ्याकडे मार्गदर्शनासाठी घेऊन आली. खरं तर ही खूपच सर्वसामान्य समस्या आहे. बहुतेकदा याविषयी मोकळेपणानं बोललं जात नाही. हा विषय आपल्या समाजात निषिद्ध समजला जातो. अनेकदा नवविवाहित जोडप्याला शरीररचना, शरीरसंबंध याविषयीची शास्त्रीय माहितीच नसते. कधी कधी याविषयी भीती असते. दुखेल का? किती त्रास होईल? जमेल का? यासारखे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात.

सिनेमा, कादंबऱ्या, मित्रमंडळी यांच्याकडून अतिरंजित व अशास्त्रीय माहिती त्यांना मिळालेली असते. ‘सुहागरात’, ‘पहिली रात्र’ याविषयी वेगळ्याच काल्पनिक अपेक्षा असतात आणि मग अपेक्षाभंग झाल्यावर एकमेकांबरोबरच्या नात्यावर वाईट परिणाम होतात. अशा वेळी अगदी घटस्फोटापर्यंत पोचलेली जोडपी मी पाहिली आहेत. म्हणूनच लग्न ठरल्यानंतर प्रत्येक जोडप्याने याविषयी शास्त्रीय माहिती घ्यायला हवी.

लग्न ठरलं की लग्नघरी धामधूम सुरू होते. खरेदी, वेगवेगळे समारंभ आणि त्याची तयारी यात सगळे जण पूर्णपणे मग्न होतात. आणि मग काही महत्त्वाच्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष होतं. लग्नासाठी सुट्टी काढून अमेय अमेरिकेतून भारतात आला. स्नेहाबरोबर लग्न ठरलं आणि पंधरा दिवसांत झालंसुद्धा. स्नेहाचं शिक्षण अजून चालू होतं. एका वर्षाने शिक्षण संपल्यावर ती अमेरिकेला जाणार होती. लग्नानंतरचा दीड महिन्यांचा काळ धावपळीतच गेला. अमेयची अमेरिकेला परत जाण्याची वेळ अगदी उद्यावर येऊन ठेपली. तेव्हा अमेय व स्नेहा घाईघाईतच दवाखान्यात आले. स्नेहाची मासिक पाळी चुकली होती. ती गर्भवती होती. मूल होऊ देण्याची दोघांचीही तेव्हा मानसिक तयारी नसल्याने गर्भपाताविषयी विचारणा करण्यासाठी दोघे जण आले होते. स्नेहा आणि अमेयप्रमाणे अनेक जोडपी नको असताना गर्भधारणा झाल्याने गर्भपात करण्यासाठी येतात. खरं तर लग्नानंतर गर्भधारणा कधी हवी हा विचार लग्नाआधीच करायला हवा. त्यानुसार गर्भनिरोधक साधनांची माहितीसुद्धा लग्नापूर्वीच घ्यायला हवी. या काळात प्रामुख्याने कंडोम व गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या जातात. याविषयीची माहिती डॉक्टरांकडून घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी अनुरूप जोडीदार निवडताना वैद्याकीय सल्ला घ्या. जोडीदाराची माहिती घ्या, समानता व भिन्नता डोळसपणे बघा. एकमेकांशी संवाद साधा, भविष्यावर चर्चा करा आणि नंतरच लग्नाचा निर्णय घ्या. संवादाने अनेक गोष्टी सोप्या होतात, हा मूलमंत्र महत्त्वाचा.