जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरास आवश्यक असणाऱ्या गोष्टींपैकी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चयापचय क्रियेमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खूप कमी प्रमाणात शरीराला त्यांची आवश्यकता असते. असे असले तरी चयापचय क्रियेमध्ये ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कमतरतेमुळे चयापचय क्रिया बिघडू शकते आणि अनेक आजारांना निमंत्रण मिळते.

प्रत्येक पदार्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ती सर्व आपल्याला मिळण्यासाठी आपल्या आहारामध्ये वैविध्य हवे. तरच सर्व प्रकारची जीवनसत्त्वे व खनिजे आपल्याला मिळू शकतील. हिवाळ्यामध्ये पचनशक्ती चांगली असल्यामुळे कच्चे पदार्थपण चांगले पचू शकतात. स्वयंपाकादरम्यान होणारा जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा ऱ्हास आपण कच्चे पदार्थ खाल्ल्यामुळे टाळू शकतो. हिवाळ्यात सॅलड भरपूर प्रमाणात खावे. गाजर, बीट, कांदा, टोमॅटो, कोबी इत्यादी अनेक पदार्थ हिवाळ्यामध्ये उपलब्ध असतात. त्यांचा वापर सॅलडमध्ये जरूर करावा. अ, ब, क जीवनसत्त्व त्यातून भरपूर प्रमाणात मिळते. हिवाळ्यामध्ये वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास ज्यांना होतो, त्या व्यक्तींनी ‘क’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात खावेत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. लिंबूवर्गातील फळे उदाहरणार्थ संत्री, मोसंबी आदी. तसेच टोमॅटो, पेरू, आवळा आदी अनेक पदार्थामधून ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते.

पालक, मेथी, शेपू, वाटाणा, घेवडा इत्यादी हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचा वापर जेवणात अवश्य करावा. फक्त त्या भाज्या अतिप्रमाणात शिजवू नयेत आणि खूप बारीक चिरू नयेत. अन्यथा जीवनसत्त्वांचा ऱ्हास होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिवाळ्यात अन्नपदार्थ गरम असताना खाण्याची इच्छा होते म्हणून ताजे असताना, गरम असतानाच जेवण करावे. पण गरम हवे म्हणून अन्नपदार्थ पुन:पुन्हा गरम करू नये. तसे केल्याने जीवनसत्त्वांचा व खनिजांचा ऱ्हास होतो. एकूणच हिवाळ्यात ताजे, शिजवलेले अन्नपदार्थ गरम असतानाच खावे. तसेच धान्ये, भाज्या, दूध व दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्ये, फळे, मांसाहार या प्रत्येक आहारवर्गातले पदार्थ जेवणात ठेवावे. त्यायोगे सर्व प्रकारची जीवनसत्त्वे व खनिजे आपणास मिळण्यास मदत होते.