आदेश नांदवीकर
‘लग्न म्हणजे स्वर्गातल्या गाठी’ ही उक्ती माझ्यासाठी सार्थ ठरते, याचं कारण माझी पत्नी प्रिया. आमचं ‘अॅरेंज मॅरेज’ आहे. यामध्ये जरी पत्रिका जुळणं हा मुद्दा महत्त्वाचा असला, तरी प्रियाचं मत होतं, की स्वभाव जुळणं, समजून घेणं आणि समाधानी असणं हे महत्त्वाचं असतं. या तिच्या मतांमुळे आमच्या दोघांची मनं जुळली. एका महिन्यात आमचं लग्न पार पडलं.
माझ्या नोकरीत मला त्या वेळी जास्त पगार नव्हता. पण प्रियानं स्वत: काम करून तिचं शिक्षण आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्यामुळे तिला परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. काही स्त्रियांमध्ये असं दिसतं, की एकमेकींचं पाहून खरेदीसाठी हट्ट धरला जातो. पण ‘कुणी काही खरेदी केलं म्हणून मलासुद्धा पाहिजे’ असा हट्ट प्रिया कधीच करत नाही. फक्त अबोल प्रियाला व्यक्त होणं मात्र अवघड व्हायचं. यामुळे कित्येक वेळा संवाद अपुरा राहायचा. असा हा अपुरा संवाद खूप काळानं पूर्ण व्हायला लागला. लग्नानंतर सहा महिन्यांच्या आतच आम्हाला दोन सुखद धक्के मिळाले, ते म्हणजे एका नवीन पाहुण्याचं आगमन आणि प्रियाला सरकारी नोकरीची संधी- जे तिचं आणि माझं स्वप्न होतं. आमच्या एकत्र कुटुंबात प्रियानं कधीही कोणती कुरकुर न करता ऑफिस आणि घरच्या जबाबदाऱ्या आनंदानं सांभाळल्या.
आराध्यचा जन्म झाला. कुटुंब वाढत गेलं की जागा कमी पडू लागते, त्यामुळे आम्ही वेगळं राहाण्याचा विचार केला. एकाएकी आमच्यावर शून्यापासून घर उभं करण्याची वेळ आली. दोघंही नोकरी करणारे असल्यामुळे छोटय़ा आराध्यला सांभाळून घरातली सर्व कामं प्रियाच करायची. या वेळी मात्र आमच्यात रोज भांडण होऊ लागलं. मला ऑफिसच्या कामानिमित्त जास्तीत जास्त दौऱ्यावर जावं लागायचं. आराध्यचं, घरचं आणि ऑफिस, हे सर्व करून प्रिया थकून जायची. साहजिकच प्रियाचा पारा नेहमी चढलेला असायचा. मग प्रिया प्रत्येक शनिवारी-रविवारी माहेरी निघून जायची. तिचं हे माहेरी जाणं आणि राहाणं मला रुचायचं नाही. मग मी ती नोकरी सोडली आणि मुंबईतल्या मुंबईत कमी पगाराची नोकरी शोधली. यानंतर मी प्रियाला आणि आराध्यला व्यवस्थित वेळ देऊ शकलो.
अत्यंत नाजूक परिस्थितीत खूप वर्ष विंचवाच्या पाठीवरचा संसार घेऊन आम्ही फिरलो. स्वत:चं घर असावं असं दोघांनाही वाटू लागलं. त्या काळात हातात कोणतीही मुद्दल नसताना, दागदागिने विकून नवीन घर घेण्याचा निर्णय घेतला. घर घेतलं, पण घर चालवणं यामध्ये घराचा ‘ईएमआय’, किराणा, डॉक्टर अशाच काही गरजा पूर्ण होऊ शकत होत्या, बाकी गरजा आ-वासून दारात उभ्याच असायच्या. या वेळी पुन्हा दोघांमध्ये खर्चावरून भांडं वाजत असायचं. कित्येक वेळा घर विकून माघार घ्यायची असे विचार यायचे. अशा वेळी खंबीर प्रियानं आहे त्या तुटपुंजीमध्ये घर चालवण्याचं ठरवून मला साथ दिली. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी, की आम्ही ज्या समुदायाबरोबर राहातो, तिथे दागिन्यांचा बडेजाव असे. त्यात स्त्रियांना दागिने घालून मिरवणं म्हणजे विशेष बाब असते. याच काळात दागिन्यांचा कोणताही बडेजाव न करता प्रियानं परिस्थितीला सांभाळून घेतलं.
जोडीदारांनी सावरून, आवरून आणि समजून घेतलं तर दिवस नक्कीच बदलतात. हीच सुखी संसाराची किल्ली असते. आज दोघांची आर्थिक मिळकत व्यवस्थित होऊन आम्ही सुखाचा संसार थाटला. यामुळेच सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, त्या टिकवणं, जपणं आणि त्यात आनंदाची पेरणी करणं हे सर्वस्वी आपल्या हाती असतं हे आमच्या या सुखाच्या प्रवासातून दिसलं.
aadesh.nandvikar3184@gmail.com