विनोद द. मुळे
आपण जीवनात सतत काही ना काही शिकतच असतो आणि या प्रक्रियेत आपल्या कळत नकळत कुणी तरी सतत शिक्षकाची भूमिका वठवत असतंच. तेव्हा कुणाबद्दल लिहावं आणि कुणाला वगळावं, हे निश्चित करणं म्हणजे तारेवरची कसरतच. आज पासष्टीच्या पुढे असलेल्या माझं जीवनरूपी सुंदर शिल्प घडवताना अनेक शिक्षकांनी आपल्या शिक्षणरूपी छिन्नी-हातोडीचे घाव घातले; पण मला घडवणाऱ्या शिक्षकाबद्दल लिहिण्याकरिता मी लेखणी हाती धरली तेव्हा माझा डोळय़ांसमोर प्रकर्षांनं उभे ठाकतात ते आजपासून तब्बल छप्पन्न वर्षांपूर्वी मला इयत्ता चौथी आणि पाचवीत शिकवणारे आमचे मुख्याध्यापक तेरेदेसाई सर!
सरांचं पूर्ण नाव गणेश मोरेश्वर तेरेदेसाई; सर्व जण त्यांना तेरेदेसाई सर म्हणून ओळखत. माझ्या या शिक्षकांकडून मी मुख्यत्वे तीन गुण शिकलो. हे तीन गुण म्हणजे शिस्त, साधेपणा आणि करुणा. या तिन्ही गुणांच्या उपयोगानं माझं जीवन समृद्ध झालं आणि म्हणूनच मला पदोपदी तेरेदेसाई सरांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.
आमच्या त्या मराठी शाळेत (शाळेचं नाव ‘शासकीय मराठी प्राथमिक विद्यालय क्र. १४, इंदोर’. पण संपूर्ण इंदोरमध्ये ही शाळा ‘मल्हारी मरतडाची शाळा’ म्हणून प्रसिद्ध होती, कारण शाळेच्या जवळच मल्हारी मरतडाचं देऊळ होतं). शाळेत शिरता-शिरताच सरांची खोली डाव्या बाजूस होती. ते दाराकडे तोंड करूनच बसत. त्यामुळे शाळेत कोण शिरतंय आणि कोण बाहेर पडतंय, हे त्यांना सहजगत्या दिसत असे. सकाळी प्रार्थनेची घंटा व्हायच्या पाच मिनिटं आधीच सर प्रार्थनेच्या जागी येऊन उभे ठाकत. असं केल्यानं कोणकोणते शिक्षक वेळेवर आले आहेत हे त्यांना कळत असे. प्रार्थना संपताच सर हातात छडी घेऊन शाळेच्या मुख्य दारावर येऊन उभे राहात. ठरलेलंच होतं, की उशिरा येणारे विद्यार्थी आपला उजवा हात पुढे करत अन् सर मोजून पाच सपके मारत. हे सर्व यंत्रवत होत असे आणि हा क्रम फक्त दहाच मिनिटं चाले. प्रार्थना संपल्यावर फक्त दहा मिनिटं उशिरा येण्याची मुभा होती. मग मुख्य दार बंद. वर्गात हजेरी झाली, की प्रत्येक वर्गातल्या अनुपस्थित विद्यार्थ्यांची यादी सरांच्या टेबलावर येत असे. (पूर्वसूचना न देता शाळेत न आलेली मुलं ‘अनुपस्थित’ श्रेणीत येत.) मग या अनुपस्थित राहणाऱ्या मुलांच्या पालकांना शाळेत बोलावण्यात येत असे.
सरांची ही शिस्त माझ्या रक्तात भिनली आहे. अगदी आजही. याच शिस्तीनं आजतागायतच्या जीवनात बरंच काही मिळालं. पित्याच्या भूमिकेत असताना मी मुलांमध्ये शिस्त रुजवलीय आणि आता आजोबा झाल्यावर नातवांमध्येही रुजवतोय. आजच्या काळात जेव्हा वर्तमानपत्रात ‘विद्यार्थ्यांला शिक्षा म्हणून उठाबश्या काढायला लावणाऱ्या शिक्षकावर बडतर्फीचा बडगा’ अशा बातम्या वाचनात येतात, तेव्हा तेरेदेसाई सर डोळय़ांसमोर उभे राहिल्याशिवाय राहात नाहीत.
तेरेदेसाई सर मला भावले ते त्यांच्या साधेपणाच्या गुणामुळे. इतक्या वर्षांनंतरही मला त्यांचा पेहराव जसाचा तसा आठवतोय. डोक्यावर काळी टोपी, पांढरा शर्ट, त्यावर ग्रे रंगाचा कोट, पांढरंशुभ्र धोतर, पांढरेच मोजे आणि पॉलिश केलेले काळेशार बिनबंदांचे बूट. या ठरलेल्या पेहरावाशिवाय आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांना कधीच इतर कुठल्या पेहरावात बघितल्याचं आठवत नाही. थंडीत मात्र त्यांच्या गळय़ाभोवती एक मफलर वाढायचा इतकंच! त्या वेळी आम्ही लहान होतो आणि जास्त काही समजत नव्हतं; पण हे मात्र आमच्या लक्षात यायचं, की सर नेहमी एकाच पेहरावात दिसतात. त्यांच्याकडे कपडय़ांचे मोजकेच जोड असायचे, पण अगदी टापटीप. ते नेहमी म्हणत, ‘‘आपल्याकडे कपडय़ांचे किती जोड आहेत, ते किती महागडे आहेत याला काहीही महत्त्व नसतं. तुमच्याकडे अगदी एक किंवा दोन जोड असले तरी काही हरकत नाही; पण ते नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असावेत.’’ आज लोकांची कपाटं उंची वस्त्रांनी ओसंडून वाहताना पाहतो, त्यांना सकाळी एक, तर दुपारी दुसरे कपडे घालताना पाहतो, तेव्हा तेरेदेसाई सर हमखास आठवतात. मी त्यांचा साधेपणाचा गुण घेतला. आता तो नातवंडांनाही देण्याचा प्रयत्न करतो.
सरांकडून घेतलेला तिसरा गुण म्हणजे करुणा. ‘‘वरपांगी अगदी कठोर दिसणाऱ्या वा असणाऱ्या शरीरात हृदय मात्र अगदी कोमल आणि करुणेनं ओतप्रोत असावं,’’ असं सर नेहमी सांगत. याची प्रचीती आम्हाला त्यांच्या वर्तणुकीतून येत असे. एरवी अवघी काही मिनिटं उशीरा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्तीचा धडा शिकवण्यासाठी हातावर सपासप छडय़ा मारणारे तेरेदेसाई सर वर्गात श्रावणबाळाची कविता शिकवताना ‘शर आला तो धाऊनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ..’ वाचताना मुसमुसून रडत, तेव्हा अख्ख्या वर्गाचे हुंदके थांबत नसत. पुढे मग, ‘हा आई गे! दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊनी झोक’पासून अगदी शेवटच्या ओळीपर्यंत आम्ही सर्व विद्यार्थी सरांबरोबर पदोपदी हुंदके देत बसायचो. एरवी तास संपल्याची घंटा वाजल्यावर आनंदी होणारे आम्ही विद्यार्थी कविता अर्धवट असतानाच वाजलेली घंटा ऐकून चिडायचो.
शिस्तीच्या बाबतीत बाहेरून दगडासारख्या कठोर, पण आतून तितक्याच कोमल असणाऱ्या सरांविषयी भावना व्यक्त करतानाच मला एक अजून नमूद करावंसं वाटतंय.. ‘दुर्गा सप्तशती’ पाठात देवीच्या स्तुतीत म्हटलेल्या एका श्लोकात एक वाक्य येतं, ‘संग्रामे निष्ठुरता, हृदये कोमलता’. ते जेव्हा वाचतो अथवा ऐकतो तेव्हा तेरेदेसाई सर आठवल्याशिवाय राहात नाहीत. आज जेव्हा माझ्या वयाच्या ६६ व्या वर्षी मी वृद्ध आई-वडिलांनी भरलेले वृद्धाश्रम बघतो, तेव्हा तेरेदेसाई सरांचा दाटून आलेला कंठ आठवतो. वाटतं, की वृद्धाश्रमात राहणाऱ्या आई-वडिलांच्या मुलांना जर सरांनी स्वर्गातून परत येऊन श्रावणबाळाची कविता ऐकवली, तर त्यातली किती तरी मुलं आई-वडिलांना परत घरी आणल्याशिवाय राहणार नाहीत! मला घडवून माझं जीवन समृद्ध करणाऱ्या या तेरेदेसाई सरांना मन:पूर्वक साष्टांग दंडवत!