मुक्ता बाम

आपल्या मार्गक्रमणात अवघे काही दिवस शहरात मुक्काम करणारी आणि न रेंगाळता ठरल्या दिवशी मार्गस्थ होणारी वारी. शहरातल्या कोलाहलाचीच अधिक सवय असलेल्या, प्रचंड स्पर्धेत सतत धावणाऱ्या तरुणांना या वारीचं अस्तित्व जाणवतं का?.. त्यांना वारीची ओळख आहे, की ‘सेल्फी विथ वारी’च्या पोस्ट टाकण्यापर्यंतच ती मर्यादित आहे?.. मुळात वारीला त्यांच्या विश्वात काही स्थान आहे का?.. हे आहेत काही तरुणींचे अनुभव. वारी पाहताना आणि काही पावलं का होईना, पण त्याबरोबर चालताना त्यांना कशी भेटली वारी?.. काय जाणवलं, काय नवं सापडलं?.. ते त्यांच्याच शब्दांत.

वारी.. यात्रा.. शेकडो वर्षांची परंपरा. तिला कायमच इतकं गौरवण्यात येतं, की स्वतंत्र विचार करण्याचे संस्कार होण्याच्या आधीपासून आपण, म्हणजे मी तरी, वारी या कल्पनेनं भारलेलीच होते. गेल्या काही वर्षांत मात्र नाटक आणि आरोग्य सेवेशी निगडित एका कामाच्या निमित्तानं वारीशी थेट संबंध आला. पहिला एक दिवस आम्ही कामानिमित्त रस्त्याच्या बाजूला थांबून पालख्या पुण्यात येताना बघत होतो. सुरकुतलेले चेहरे, पदर सावरत चटचट चालणाऱ्या बाया, तान्हुली मुलं.. ही अफाट गर्दी! गर्दीला चेहरा नसतो म्हणतात. पण या गर्दीला एक वेगळंच, भक्तीचं रूप होतं. कोण कुठून आलेली ही माणसं चालत निघाली होती त्यांच्या श्रद्धेच्या, भक्तीच्या दिशेनं. एरवी ‘प्रॅक्टिकल’ जगण्यात हा भाबडा विश्वास आणि श्रद्धा म्हणजे ‘वीक पॉइंट’ असंच ठसलेलं असतं मनात! पण तीच श्रद्धा किती मोठी ताकद देऊन जाते ते अनुभवलं. ती ताकदही उन्मादाची नाही, डोळसपणाची होती. इथून-तिथं दर क्षणाला धावणाऱ्या जगात, चालणारी ती माणसं पाहून उगाच भरून आलं मला! एकमेकांना ‘माउली’ म्हणत, अभंग गात पुढे जाणाऱ्या कुणाच्याही पायावर चटकन डोकं ठेवावं, जवळ घ्यावं अशी अनामिक जवळीक जाणवली. विठ्ठलच अधिक जवळचा वाटला. दुसऱ्या दिवशी वारी पुण्यात मुक्कामाला होती. तेव्हा त्यांच्या राहण्याच्या भागातून फिरले. तिथली अस्वच्छता, गैरसोय पाहून निराशा झाली. या परिस्थितीचाही विचार व्हायला हवा असं वाटलं. तिसऱ्या दिवशी काही किलोमीटर वारकऱ्यांसह चालायला मिळालं. अभंग ऐकू लागलो की खरंच साधी पावलंही एका लयीत पडू लागतात! कालचे ओले कपडे डोक्याला गुंडाळून, जड गाठोडी डोक्यावर घेऊन वेगात सर्व चालत होते. भोवतालच्या लोकांकडे पाहून मला वाटलं, नक्की काय म्हणून चालत असतील हे?.. फक्त परंपरा आहे म्हणून कुणी इतकं करेल का?..

मला वाटतं, वारी हा एक विसावा आहे! आपल्या आयुष्याच्या प्रवासाचंच एक रूपक आहे. आयुष्य अशाश्वत आहे. (यांतले जमीन कसणारे आहेत, त्यांना तर सतत या अशाश्वततेचा फटका बसतो.) पण वारी शाश्वत आहे! तिला पूर्णत्व आहे. कुठं जातोय हे माहीत असल्यानं तिथं जाण्याचा आनंद वाढत असावा. वारीसह पंढरीच्या माहेरी पोहोचेपर्यंत प्रत्येक वारकरी विठ्ठल होऊन जात असावा! मुळात विठ्ठल हा खूप ‘आपला’ देव आहे! ‘विंदां’च्या कवितेत खोडय़ा करणाऱ्या ‘अट्टल’ मुलातही तो भेटतो आणि संत साहित्यातही! देव म्हणजे कुणी वेगळा, ज्याच्याशी आब राखूनच वागावं, या सगळय़ा कल्पनांना फाटा देत भक्तांच्या हक्काचं माणूस होणारा, जातीपातीपलीकडे जाणारा विठ्ठल. धार्मिक आणि धर्माध यातल्या पुसट रेषेची अतिरेकी वातावरणात भीती तयार होते. विठ्ठलाच्या भेटीसाठी जाणारी ही पावलं मात्र त्या रेषेपलीकडची निर्मळ आस दाखवतात. त्यांना जवळचं न मानण्याची मोकळीक देतात.. आणि म्हणूनच जवळची वाटतात!

देव आहे, असं ठामपणे म्हणणारे (म्हणजे धाक, परंपरा म्हणून नाही, तर समजून देवाचं सगळं करणारे.) मला फारसे भेटलेले नाहीत. मात्र अनामिक शक्ती आहे, हा सिद्धांत अनेक जण मांडतात. रोजच्या आयुष्यात यावर विचार करायला असाही कितीसा वेळ मिळतो? पण वारी बघितल्यावर जाणवलं, की हाडाचा भक्त देव घडवू शकतो.हवशे-नवशे असोत, वा दरवर्षी वारी करणारे. माणसांचा तो लोंढा सर्वाना सामावून घेतो. त्यांच्यापर्यंत जाण्याचा हा प्रवास जितका मोठा, तितका विठ्ठलही मोठा होत जातो!

तरुणांनाही ओढ लावणारा विशुद्ध आनंद!-क्षितिजा ताशी

वारी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाली, पण आपल्या देशातल्या, राज्यातल्या तरुण पिढीपर्यंत ती पोहोचतेय का? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. विभक्त कुटुंबांमध्ये राहणारी सध्याची तरुण पिढी मोबाइल आणि गॅजेटस्च्या दुनियेत रममाण आहे.. किंवा वातानुकूलित खोलीत बसून ‘ओटीटी’च्या विश्वात आनंदी आहे.. ही मुलं इंग्रजी भाषा आणि ‘कॅपॅचिनो-पिझ्झा’मय झाली आहेत, मग आपलीच संस्कृती त्यांना ‘टर्मरिक लाते’ पिऊन तरी समजेल का?.. असं नकारात्मक सुरातलं वर्णन अनेकदा तरुणांच्या बाबतीत केलेलं बघायला मिळतं. मला वाटतं, की अगदी अशी नाहीये तरुण पिढी. अनेक तरुण आपली संस्कृती अभ्यासत आहेत. त्यांना इथली आपुलकी आहे, ते या वारीमध्ये सहभागीसुद्धा होत आहेत. शहरात पालख्या आल्या, की फोटो आणि सेल्फी काढणं, ते समाजमाध्यमांवर टाकणं, हा हेतू ठेवून काही जण येतात हे खरं असलं, तरी याहीपलीकडे वारीचा विलक्षण अनुभव घेण्याची इच्छा अनेकांची आहे.

इतके लोक वारीमध्ये देहभान हरपून कसे सहभागी होतात? एवढं अंतर पायी चालून कुणी थकत कसं नाही? असे प्रश्न आणि कुतूहल घेऊन तरुण वारीमध्ये सहभागी होत आहेत. संशोधन करणारे प्रत्यक्ष सहभागी होऊन विविध अंगांनी वारीचा अभ्यास करतात, खूप तरुण वारी आध्यात्मिक दृष्टीनंही पाहू इच्छितात. माझं आजोळ पंढरपूरचं. त्यामुळे एक प्रकारे वारी घरचीच. भाषाशास्त्र, संतसाहित्य हे माझे अभ्यासाचे विषय. मी कोल्हापूरला प्राध्यापिका म्हणून काम करते. पण वारीशी असलेला बंध मनात कायम आहे.

माझा मावसभाऊ अभिषेक डोंबिवलीमध्ये राहतो. तो नुकताच बारावी उत्तीर्ण झाला. पुणे ते दिवे घाट चालत सासवडपर्यंत वारीमध्ये सहभागी झाला. तो सांगत होता, ‘‘वेगळा अनुभव घेण्यासाठी वारीमध्ये चाललो. अभ्यासाचा ताण जाऊन खूप प्रसन्न वाटलं.’’ नऊ-दहा वर्षांची मुलंही आजोबांची वारीची परंपरा पुढे नेत वारीत उत्साहानं सहभागी झाली, अशा बातम्या वाचायला मिळतात, तेव्हा कौतुक वाटतं. डोक्यावर तुळस, गळय़ात टाळ आणि मुखी विठ्ठलनाम असलेले वारकरी समानतेचा संदेश वारीतून देत असतात. कदाचित हे आजच्या तरुण पिढीला भावलं असेल..माझा मित्र सतीश गेली कित्येक वर्ष वारीमध्ये सहभागी होतो. वारी का आवडते, हे सांगताना तो म्हणतो, ‘‘इतर तीर्थक्षेत्रं किंवा धार्मिक स्थळांप्रमाणे इथे कर्मकांडं नाहीत, कोणते नियम नाहीत, तर वारी सर्व बंधनांतून मुक्त करणारी आहे.’’ सतीश त्याच्या चिमुकल्यालासुद्धा वारीमध्ये घेऊन येतो. त्याला आपल्या या संस्कृतीची सकारात्मक पद्धतीनं ओळख करून देतो. वारीतून शिकण्यासारखं खूप आहे.

समानतेचा संदेश देणारी वारी माणुसकीचेही धडे देते. वारीमार्गावर वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक हात पुढे येतात. प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्याचा आनंद घेऊ न शकणारे कदाचित सेवेतून आनंद घेतात. त्या सेवेसाठीदेखील आज खूप तरुण पुढे येताना दिसतात. मला भेटलेल्या अनेक पुरोगामी तरुणांनीसुद्धा हेच सांगितलं, की ‘वारीत जो सर्वसमावेशकपणा आहे, तो आम्हाला आवडला. इथे भेदभाव नाही, हे आम्हाला पटलं.’ ‘पंढरीच्या लोका नाही अभिमान। पाया पडती जन एकमेकां।’ या ओळीची आठवण झाली मला.माझी मैत्रीण विदुला वारीचा अनुभव घेण्यासाठी या वर्षी वारीला जाते आहे. तिला ओढ विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा वारीतल्या सहप्रवाशांबरोबर पंढरपूरला जाण्याची आहे. इतकी वर्ष वारीबद्दल जे ऐकलं, ते तिला स्वत:ला अनुभवायचं आहे, असं ती म्हणते.

पुन:पुन्हा भेटीची ओढ लावणारा हा विशुद्ध आनंद आहे. एक वेगळा अनुभव घेऊन एकानं दुसऱ्यांना सांगावं आणि त्यांच्या अनुभवानं प्रेरित होऊन आणखी कुणीतरी नव्यानं वारीत सहभागी व्हावं, हे मी आजूबाजूला पाहिलं आहे. वारी ‘तरुण’ होतेय, याचं ते निदर्शक वाटतं मला!

विठ्ठल पाहाण्यासाठी.. विठ्ठल होण्यासाठी!- पूजा भडांगे

माझे मोठे काका कीर्तनकार आणि पांडुरंगाचे निस्सीम भक्त. लहानपणापासून त्यांच्या ओठी सगळय़ांसाठी ‘माउली’ हाच शब्द मी ऐकलाय. देव म्हणजे नेमकं काय, हा थेट प्रश्न कधी त्यांना विचारला नाही, पण त्यांच्यामुळेच ओठा तुकोबा आणि घरात विठ्ठल आला हे मात्र खरं! शिक्षण आणि नोकरीसाठी मला खूप लवकर घर सोडावं लागलं. त्यामुळे घरच्या या वारकरी वातावरणापासून मी हळूहळू दुरावले. मुंबईच्या रहाटगाडग्यात स्वत:ला अडकवल्यानंतर स्वत:ची ‘स्पेस’ शोधायलाही उसंत मिळेना. त्याच दरम्यान आषाढवारीत अभंगाच्या तालावर नाचणाऱ्या पावलांचा ठेका, टाळ-मृदुंगाचे सूर सोशल मीडियावरून ‘लाइव्ह’ ऐकू येऊ लागले होते. घरातला पारंपरिक वारसा खुणावू लागला. २०२० मध्ये करोनाचं सावट देशावर आलं आणि संचारबंदीमुळे वारी निघालीच नाही. आता आपल्याला पायी वारी करता येणार नाही, या धक्क्यानं काका त्या ऐन आषाढात वारले. काकांना पंढरपूर गाठता आलं नाही आणि संचारबंदीमुळे मलाही काकांचं शेवटचं दर्शन झालं नाही. कदाचित हा पहिला धक्का मला त्या वेळी बसला आणि मी वारीला जायचा निर्णय केला.

एकीकडे वारकरी परंपरेतून पुढे आलेलं, कर्नाटक सीमेवरचं माझं माहेर, तर पंढरपुरापासून जवळच असलेलं सासर, या दोन्ही गोष्टींचा योगायोग आणि काकांची आठवण पोटात घेऊन वारीत पाय चालतात. गेली अनेक वर्ष आळंदीच्या पालखीबरोबर असणाऱ्या मानाच्या अश्वाच्या सेवेचा मान माझ्या घराला मिळालाय. तो वारसा आता पुढची पिढी जितकी नेटानं चालवते, तितकीच वारी नव्यानं कळते आहे. वारीत घोळक्यानं चाला, वा एकटय़ानं.. मुखानं अभंग म्हणा, वा हात उंचावत ‘सेल्फी’ घ्या.. प्रत्येकाला येणारी अनुभूती जरी वेगळी असली, तरी सर्वाना एकत्र बांधून ठेवणारं चैतन्य एक आहे.
संतांच्या काव्यपंक्ती गात लाखो लोक, कित्येक दिवस, मैलोनमैल, रस्त्यावर एकत्र येऊन अखंड चालतात, त्या शब्दांचा गौरव करतात, ही एकमेवाद्वितीय गोष्ट माझ्यातल्या कवीमाणसाला मोठं बळ देते. वर्षभर कुठल्या ना कुठल्या व्यापात, शिक्षणात, नोकरी-धंद्यात अडकून पडलेली तरुणाई एका वेगळय़ा अँगलनं वारीकडे बघते, असं मला जाणवतं. वारीत आलेले तरुण फक्त सेल्फीच काढतात असा ओरडा एकीकडे असतो, पण त्या निमित्तानं का होईना, वारीचा अद्भुत अनुभव ते कॅमेरात कैद करतात आणि ‘डिजिटल वारी’ अनेकांपर्यंत पोहोचवतात. नक्की कुठल्या जिद्दीनं हे वारकरी तहानभूक विसरून पायी चालतात, हा शोध घ्यायलाही बरीचशी तरुणाई वारीत चालते आणि वारीचा एक भाग होऊन जाते. या वारीत कुणी देवासाठी येतो, तर कुणी भावासाठी. कुणी भक्तीसाठी येतो, तर कुणी ‘रूटीन’ लाइफमधून क्षणिक मुक्ती मिळवण्यासाठी. वारी लिंगभेदापलीकडे जाऊन माणसं एकत्र आणतेय. तरुण पिढीला ज्ञाना-तुकाचे अभंग ऐकवतेय. सर्व नातेसंबंधांच्या पलीकडे जाऊन वारीत चालणारा प्रत्येकजण ‘माउली’ ही विश्वात्मक हाक प्रत्येकाला मारतो, तेव्हा मनात कुठलीही कटू भावना जन्म घेत नाही. माझ्या मते देवधर्म यापलीकडे जाऊन उत्तम व्यवस्थापनाचा आदर्श परिपाठ कसा असावा, हे पाहण्यासाठी तरी एकदा वारी केलीच पाहिजे.

सगळय़ा वारकऱ्यांना पंढरपुरात जाऊन विठ्ठल भेटतो की नाही, हे मला माहीत नाही. पण वारीत ठायी ठायी विठ्ठल आहे हे मी अनुभवलंय. आपल्या आजीला आता चालता येत नाही, म्हणून एक तरुण मुलगा तिला पाठीवर घेऊन वारी चालत होता. परंपरेनं आलेली वारी चुकू नये, असं मानणारी एक माउली आपल्या लहान पोराला कडेवर घेऊन वारीत चालत होती. कुणी बातमी ‘कव्हर’ करायला माइक घेऊन वारी चालतोय, कुणी वारीचा िरगण सोहळा उंचावरून कॅमेऱ्यात टिपण्यासाठी ‘ड्रोन’ उडवतोय. केवळ १४ वर्षांचा माझा भाचा परंपरेनं आलेली, माउलींच्या अश्वाची सेवा करत पूर्ण वारीत आनंदानं आणि स्वखुशीनं चालतो. हे सगळं मी बघते, तेव्हा वाटतं, की वेगळा विठ्ठल कशाला शोधायचा?..

‘रूप नाही रेखा जयासी आकार
आम्ही तो साकार विठ्ठल केला’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुकोबा माऊली म्हणतात, तसं ज्याला रूप, आकार असं काही नाही. तो विठ्ठल खऱ्या अर्थानं वारीतच जन्म घेतोय, साकार होतोय. तो विठ्ठल पाहण्यासाठी, तो विठ्ठल होण्यासाठी वारीचा एक अनुभव माझ्या मते पुरेसा आहे!