मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मानहानीचा खटला दाखल करण्याचा पवित्रा जाहीर करताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एक पाऊल मागे गेले आहेत. ‘मध्य प्रदेशमध्ये भ्रष्टाचार इतका आहे की मी विसरुनच गेलो की त्यांनी पनामा पेपर्स घोटाळा केला नसून व्यापम घोटाळा, ई टेंडर घोटाळा केला’, असे सांगत राहुल गांधी यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मध्य प्रदेशमधील इंदूर येथे सोमवारी रोड शोनंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर घोटाळ्यांवरून टीका केली होती. मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये आले. मात्र, त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर आपल्या शेजारी राष्ट्रात म्हणजेच पाकिस्तानमध्ये पनामा पेपर्समुळे माजी पंतप्रधांनाना शिक्षा झाली, याकडे लक्ष वेधत राहुल गांधींनी शिवराजसिंह चौहानांवर टीका केली होती.

वाचा: राहुल गांधींविरोधात शिवराजसिंह चौहान दाखल करणार मानहानीचा खटला

यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी देखील राहुल गांधींना इशारा दिला होता. आपल्या मुलावर राहुल गांधी यांनी आरोप केल्यामुळे शिवराजसिंह चौहान चांगलेच भडकले. त्यांनी काँग्रेस अध्यक्षांविरोधात थेट मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली. मात्र, यानंतर राहुल गांधी यांनी मंगळवारी नमते घेतल्याचे दिसते. मध्य प्रदेशमध्ये भ्रष्टाचारच इतका आहे की मी कन्फ्यूज झालो की मुख्यमंत्र्यांनी पनामा पेपर्स नव्हे ई- टेंडरिंग, व्यापम घोटाळा केलाय, असे सांगत राहुल गांधींनी बोलण्याच्या ओघात अनावधानाने पनामा पेपर्सचा उल्लेख केल्याचे मान्य केले. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

राहुल गांधी यांच्या स्पष्टीकरणानंतर भाजपा आणि शिवराजसिंह चौहान आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न आता भाजपाकडून केला जाण्याची शक्यता आहे.