दहशतवादाला सातत्याने खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुद्धा हल्ल्याचा कट रचला होता. पण सीमेवर सर्तक असलेल्या आपल्या जवानांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात बुधवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास सर्तक जवानांनी पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावले.

सकाळी सव्वापाचच्या सुमारास नौशेरा सेक्टरमध्ये जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. भारतीय जवानांनी हटकले असताना सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. भारतीय जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले. या दरम्यान पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांकडून दहशतवाद्यांच्या मदतीसाठी गोळीबार सुरु होता.

या चकमकी दरम्यान गोळी लागून भारताचा एक जवान जखमी झाला. या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. पळून गेलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सध्या या भागात शोधमोहिम सुरु आहे.