बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातींसाठी लोकसंख्येवर आधारित आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र लोकसंख्येची योग्य माहिती उपलब्ध असेल तरच त्याची अमलबजावणी केली जाऊ शकते असंही ते म्हणाले आहेत. जदयूचे वाल्मिकीनगरमधील खासदार वैद्यनात महतो यांचं निधन झालं आहे. यामुळे मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून यानिमित्ताने आयोजित प्रचारसभेत नितीश कुमार बोलत होते. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून सध्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरु आहे. "जिथपर्यंत लोकसंख्येचा प्रश्न आहे तो निर्णय जनगणना झाल्यानतंरच घेऊ शकतो. तोपर्यंत निर्णय आपल्या हातात नाही. जातींच्या लोकसंख्येच्या आधारे आरक्षण असावं यामध्ये आमच्यात कोणतंही दुमत नाही," असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी यावेळी जातीनिहाय लोकसंख्येची गणना व्हावी का यासंबंधी स्पष्ट भाष्य केलं नाही. नितीश कुमार यांनी याआधीही ही मागणी केली आहे. आणखी वाचा- Bihar Election : ब्रिटनच्या पंतप्रधानांपेक्षाही काही उमेदवारांकडे आहे अधिक संपत्ती "लोकांनी मला १५ वर्ष त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्यांनी पुन्हा संधी दिली तर लोकांमध्ये जाऊन दखल न घेतलेल्या समस्यांबद्दल चर्चा करणार, तसंच त्यांच्यासाठी काम करणार," असं आश्वासन नितीश कुमार यांनी यावेळी दिलं. "आपल्या सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अत्यंत मागासवर्ग आणि महादलित यांच्यासह समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत," हे सांगायला ते विसरले नाहीत. आणखी वाचा- … तर लोक मोदींना हाकलून लावतील; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल नितीश कुमार यांनी यावेळी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरुन आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला. तेजस्वी यादव यांनी दिलेल्या १० लाख रोजगाराच्या आश्वासनांचीही त्यांनी खिल्ली उडवली. नितीश कुमार यावेळी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सहाय्याने आपण बिहारच्या विकासासाठी काम केल्याचा उल्लेख केला.