देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. मात्र असं असलं तरी बिहारमध्ये मृतांच्या आकडेवारीवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. दुसऱ्या लाटेत बिहार सरकारने मृतांचे आकडे लपल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर पटणा हायकोर्टाने मृतांच्या आकडेवारीवरून सरकारला खडे बोल सुनावले होते. गंगा किनाऱ्यावरील मृतदेह असो की, पटणा स्मशानघाटावर मृतदेहांवर होणारे अंत्यसंस्कार यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र आता सरकारनेच मृतांच्या आकडेवारीत तफावत असल्याची कबुली दिली आहे. आरोग्य विभागातील अप्पर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. ७ जूनपर्यंत बिहारमध्ये मृतांचा आकडा ५४२४ असा जाहीर करण्यात आला होता. तो आकडा चुकीचा असल्याचा सांगत अप्पर मुख्य सचिवांनी हा आकडा ९,३७५ असल्याचं स्पष्ट केलं आहे. नव्या आकडेवारीनुसार मृतांचा आकडा ७३ टक्क्यांनी वाढला आहे. या स्पष्टीकरणानंतर विरोधकांनी बिहार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पटणा उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर १८ मे रोजी राज्य सरकारने करोनामुळे होणाऱ्या मृतांच्या चौकशीसाठी दोन टीम तयार केल्या होत्या. या टीमने केलेल्या चौकशीत मृतांचा आकड्यात तफावत असल्याचं समोर आलं आहे. नव्या आकडेवारीनंतर करोना मृतांच्या यादीत बिहार राज्य १२ व्या स्थानावर आलं आहे. यापूर्वी बिहार १७ व्या स्थानावर होतं. आता आकडेवारीत तफावत आढळल्यानंतर सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

योगगुरु रामदेव यांचं शीर्षासन!; करोनावरील लस घेणार असल्याचं केलं स्पष्ट

मृतांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर सरकारकडून काही तर्क मांडण्यात आले आहेत. “करोनामुळे काही जणांचा मृत्यू होम आयसोलेशनमध्ये झाला आहे. तर काही जण करोनाची लागण झाल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात गेले होते, तिथे त्यांचा मृत्यू झाला. काही जणांचा मृत्यू करोनातून बरे झाल्यानंतर झालं”, असं स्पष्टीकरण आरोग्य विभागातील अप्पर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी दिलं आहे.

लसींची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकार करणार घासाघीस

मागच्या वर्षीपासून देशात करोनाचा प्रकोप सुरु आहे. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेतील चित्र विदारक होतं. बिहारमध्ये करोनाबाधितांचा आकडा ७ लाख १५ हजार १७९ इतका झाला आहे. यातील पाच लाखांहून अधिक लोकांना काही महिन्यांपूर्वी करोनाची लागण झाली आहे. करोनातून बरे झालेल्यांची आकडेवारी सरकारने मंगळवारी ७ लाख १ हजार २३४ इतकी जाहीर केली होती. त्यानंतर आता ही आकडेवारी ६ लाख ९८ हजार ३९७ इतकी करण्यात आली आहे. तर बिहारमध्ये मंगळवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.७० टक्के इतकं होतं. ते आता ९७.६५ टक्के करण्यात आलं आहे. या आकडेवारीनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.