उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीमध्ये ऐतिहासिक आघाडी झाल्यानंतर छोटया पक्षांना महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या राजकारणात ‘वोट कटवा’ म्हणजे मतांचे विभाजन करणारे पक्ष म्हणून पाहिले जाते. सपा-बसपाने आपल्या आघाडीत काँग्रेसला स्थान दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर सर्वच्या सर्व ८० जागांवर उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले आहेत.

काँग्रेससमोर छोटया-छोटया पक्षांसोबत आघाडी करण्याचा पर्याय खुला आहे. राष्ट्रीय लोकदल, सुहेलदेव बहुजन समाज पार्टी, निषाद पार्टी, अपना दल, पीएसपी आणि पीस पार्टी या फारशा माहित नसलेल्या छोटया पक्षांवर मोठया पक्षांची नजर आहे. अपक्ष आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भय्या हे नव्याने स्थापन झालेल्या प्रजा पार्टीचे प्रमुख आहेत.

सध्या एसबीएसपी आणि अपना दल हे दोन्ही पक्ष भाजपासोबत सत्तेमध्ये आहेत. या दोन्ही पक्षांनी अलीकडेच आपली नाराजी व्यक्त केली असून ते वेगळा मार्ग पत्करु शकतात. एसबीएसपीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी अनेक मुद्यावर केंद्र आणि योगी सरकारवर जाहीर टीका केली आहे. अपना दलच्या केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी जागा वाटपात अपेक्षित जागा मिळेपर्यंत योगी सरकारच्या अधिकृत कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला.

निषाद पार्टीला मोठया पक्षांसोबत मिळून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. सध्या सपासोबत असलेल्या निषाद पार्टीवर भाजपाचे लक्ष आहे. मागच्यावर्षी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवात निषाद पार्टीने महत्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस आरएलडी, एसबीएसपी आणि पीस पार्टीच्या संपर्कात आहे. उत्तर प्रदेशातील छोटया पक्षांचा मर्यादीत भागांवर प्रभाव आहे. पण त्यांच्याकडे एकनिष्ठ मतदार आणि समर्थक आहेत. भाजपाने छोटया पक्षांसोबत आघाडी करुन २०१४ लोकसभा आणि २०१७ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. छोटे पक्ष उत्तर प्रदेशच्या राजकारणात वोट कटवा म्हणून ओळखले जातात.