कोलकाता : रोजगार, सामाजिक सुरक्षा बळकट करणे आणि नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीला मंजुरी इ. उपाययोजनांद्वारे ‘सोनार बांगला’ची निर्मिती करण्याचे आश्वासन देणारा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी जारी केला.

प्रत्येक कुटुंबात किमान एकाला नोकरी देण्याशिवाय, आयुष्मान भारत आरोग्य योजना आणि पंतप्रधान- किसान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची भाजप निश्चिती करेल, असे कोलकात्यातील सॉल्ट लेक येथे पक्षाचे ‘सोनार बांगला संकल्प पत्र’ जारी करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

जाहीरनाम्याची ठळक वैशिष्टय़े

पीएम- किसान योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी १० हजार रुपये. या योजनेंतर्गत राज्यातील ७५ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी १८ हजार रुपयांची थकबाकी.  कला, साहित्य व अशा इतर क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांचा सोनार बांगला निधी, तसेच नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर टागोर पुरस्कार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के आरक्षण. सर्व महिलांना ‘केजी टू पीजी’ मोफत शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत त्यांना मोफत प्रवासाची सुविधा. शाळांच्या विकासासाठी २० हजार कोटी रुपयांचा ईश्वरचंद्र विद्यासागर निधी. आयआयटी आणि आयआयएम यांच्या समकक्ष असलेली ५ विद्यापीठे सुरू करणे. कोलकात्याचे आंतरराष्ट्रीय शहरात रूपांतर करण्यासाठी २० हजार कोटी. प्रत्येक निर्वासित कुटुंबाच्या खात्यात दरवर्षी १० हजार रुपये थेट जमा करणे, आदी आश्वासने भाजपने दिली.

दुर्गापूजा, सरस्वतीपूजा उत्सव निर्बंधमुक्त-अमित शहा

एगरा : भाजप मतपेढीचे राजकारण करत नाही, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘तुष्टीकरणाचे धोरण’ राबवणाऱ्या तृणमूल काँग्रेसवर रविवारी टीका केली. आपला पक्ष बंगालमध्ये सत्तेवर आल्यास दुर्गापूजा व सरस्वतीपूजा उत्सवांवर कुठलेही निर्बंध राहणार नाहीत हे निश्चित करू, असेही त्यांनी सांगितले.