पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीवरुन विरोधक मोठ्या प्रमाणात त्यांची खिल्ली उडवत आहे. बालाकोट हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत मोदींनी या मुलाखतीत भाष्य केलं असून त्यांच्या विधानावरुन विरोधकांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. ‘हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता’ अशाप्रकारचं विधान मोदींनी केलं आहे. दरम्यान, मोदींचं ते विधान गुजरात भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही ट्विट करण्यात आलं होतं. मात्र, सोशल मीडियामध्ये खिल्ली उडायला सुरूवात झाल्यानंतर ते ट्विट गुजरात भाजपाच्या अकाउंटवरुन डीलिट करण्यात आलं आहे.

काय म्हणालेत मोदी मुलाखतीत –
”मी 9 वाजता (हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत) माहिती घेतली…त्यानंतर 12 वाजता पुन्हा माहिती घेतली. त्यावेळेस वातावरण अचानक खराब झालं होतं आणि ती आमच्यासमोरील मोठी समस्या होती…खूप पाऊस झाला…मी हैराण झालो, आतापर्यंत देशातील एवढे विद्वान लोक मला शिव्या घालतात, त्यांचं डोकं येथे चालत नाही. 12 वाजता…मी पहिल्यांदाच हे सांगतोय…एका क्षणासाठी आमच्या मनात आलं अशा खराब वातावरणात आपण काय करणार…ढग जातील की नाही…त्यावेळी तज्ज्ञ देखील हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते…त्यावेळी माझ्ा मनात दोन विचार डोकावले…एक गोपनियता….आतापर्यंत सर्व गोपनिय होतं… गोपनियतेत जर काही चूक झाली तर आम्हीच काही करु शकणार नव्हतो…दुसरा विचार माझ्या मनात आला…मला सर्व विज्ञान काही समजत नाही, पण ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय याचा आपल्याला फायदाच होऊ शकतो असा विचार माझ्या मनात आला. आपण त्यांच्या रडारपासून वाचू शकतो काय…आकाशात जमा झालेल्या ढगांचा फायदा होऊ शकतो असा माझा विचार असल्याचं मी सांगितलं…सगळे बुचकळ्यात पडले…अखेरीस मी म्हटलं…ओके जा…नंतर ते निघाले”.


मोदींच्या या विधानावरुन विरोधकांनी टीका केली आहे. काँग्रेस, एमआयएमचे अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, आणि मार्क्सवादी पक्षाचे सीताराम येचुरी यांनी मोदींच्या विधानवरुन खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य अवमानकारक आहे. त्यांनी एअरफोर्सचा अपमान केला आहे. कोणताही देशभक्त व्यक्ती असं विधान कधीच करणर नाही असं ट्विट करत येचुरी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.