पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाइकांवर पाळत ठेवण्यासाठी गुप्तहेर नेमल्याच्या घटनेची चौकशी केली जाईल, कारण हा प्रकार धक्कादायक आहे, असे केंद्रीय मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातेवाईक असलेले सूर्यकुमार बोस जर्मनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बोस यांच्याविषयीच्या फायलींमधील माहिती उघड करण्याची मागणी करणार आहेत. त्यांना मोदी यांच्या भेटीवेळी जर्मनीतील भारतीय दूतावासात होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
संसदीय कामकाज मंत्री नायडू म्हणाले की,नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे थोर सुपुत्र होते व त्यांच्या कुटुंबीयांवरच टेहळणी करण्यात आली असेल, ते कुणाला भेटतात, काय करतात हे पाहिले असेल त्यांची पत्रे फोडून पाहिली असतील तर त्याची चौकशी केली पाहिजे, असे आपल्याला वाटते.
नायडू म्हणाले की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहोत. या हेरगिरीला कोण जबाबदार आहे हे लोकांना कळले पाहिजे. या बातमीनंतर काँग्रेस नेत्यांना धक्का का बसला? पूर्ण चौकशी झाल्यानंतर कुणाला आक्षेप घेण्यास जागा उरणार नाही.
तेलंगणात चकमकीत पाच अतिरेकी मारले गेल्याच्या प्रकरणी ते म्हणाले की, जेव्हा पोलीस मारले जातात तेव्हा एमआयएमचे नेते गप्प का असतात, आंध्र प्रदेशात वीस चंदन तस्करांना गोळ्या घालून ठार केल्याबाबत काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.