देशभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून, सोमवारी हा आकडा ४१५ पर्यंत पोहोचला. करोना व्हायरचा हा फैलाव रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, कंपन्या, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ४१ परदेशी नागरीक आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

करोनामुळे आतापर्यंत देशात सात जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार सकाळपर्यंत करोना संबंधित १८,३८३ नमुन्यांची चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली. २२ राज्यातील ७५ जिल्ह्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे.

करोना व्हायरसचा पादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची कठोरपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशी कारवाई करा असे केंद्राने राज्यांना पाठवलेल्या नोटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- लॉकडाउन बरोबर भारत सरकारने कराव्यात ‘या’ दहा गोष्टी

कलम १८८ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागू शकतो किंवा एक हजार रुपये दंड ठोठावला जाईल. दिल्ली, झारखंड, पंजाब आणि नागालँड या राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. बिहार, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, आणि उत्तराखंड इथेही लॉकडाउन आहे.