विमानसेवा पुरवणाऱ्या भारतातील आघाडीच्या इंडिगो कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. मे महिन्यापासून कंपनीतील सर्व वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याशिवाय काही कर्मचाऱ्यांना मे, जून आणि जुलै या काळात विना पगार सुट्टीवर पाठवले जाणार आहे.

याबाबत कंपनीचे सीईओ रणजय दत्ता यांनी सर्व कर्मचाऱ्यांना इ-मेल पाठवला आहे. ‘आम्ही मार्च आणि एप्रिल महिन्याचा कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार दिला. पण, आता आमच्याकडे पगार कपात करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाहीये. त्यामुळे मार्चमध्ये जी पगार कपात जाहीर केली होती, त्याप्रमाणे मे २०२० पासून पगार कपात केली जाईल’, असे दत्ता यांनी आपल्या इ-मेलमध्ये नमूद केले आहे. खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात न करण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल, असेही दत्ता यांनी म्हटले आहे.

१९ मार्च रोजी इंडिगोने पगार कपात करण्याचं जाहीर केलं होतं. पण, नंतर सरकारने कुणीही वेतन कपात करू नये असे आवाहन केल्यानंतर २३ एप्रिल रोजी कंपनीकडून पगार कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला होता. त्यावेळी कंपनीचे सीईओ दत्ता यांनी स्वतःच्या पगारात २५ टक्के कपात करणार असल्याचं सांगितलं होतं. तर, अन्य वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात १० ते २० टक्के कपात केली जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वच कंपन्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. हवाई प्रवास पूर्णपणे बंद असल्याने सर्वाधिक फटका विमान कंपन्यांना बसतोय.