महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही करोनाचं थैमान सुरूच आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. मागील २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, खडबडून जागं करणारेच आकडे समोर आले आहेत. देशात २४ तासांत पहिल्यांदाच तब्बल दीड लाखांच्याजवळपास रुग्ण आढळून आले असून, ८०० रुग्णांना जीव गमावावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. गर्दी आणि करोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गेल्या २४ तासांतील आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे.

देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल एक लाख ४५ हजार ३८४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७७ हजार ५६७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत ७९४ म्हणजेच जवळपास ८०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी तीनशेच्यावर करोना बळी

राज्यात शुक्रवारीही रुग्णसंख्या वाढीचा आलेख कायम राहिला. दिवसभरात ५८ हजार ९९३ नवीन करोनाबाधित आढळून आले. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे दिवसभरात ३०१ रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर १.७४ टक्के इतका असून, आतापर्यंत राज्यात ५७ हजार ३२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण ५ लाख ३४ हजार ६०३ रूग्ण उपचार घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus update india sees record spike of 1 lakh 45 thousand fresh covid19 cases 794 deaths in 24 hours bmh
First published on: 10-04-2021 at 10:02 IST