करोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरूच असून, जवळपास सर्वच राज्यांमध्ये करोनानं हातपाय पसरले आहेत. सगळीकडे रुग्ण आणि नातेवाईकांची बेड आणि ऑक्सिजनसाठी धडपड सुरू असून, आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी रुग्णवाढ सोमवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचंच दिसून आलं असून, नवा उच्चांकही नोंदवला गेला आहे. देशात दैनंदिन रुग्णसंख्येत सलग ४० व्या दिवशी वाढ नोंदविण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा आकडा जाहीर केला असून, देशात रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. चिंतेत टाकणारी गोष्ट म्हणजे अवघ्या २४ तासांत देशात मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.

आणखी वाचा- “लोकांच्या रोषाला सामोरं जाऊ, पण मृतदेहांचे ढिग बघायचे नाहीत”

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात १ हजार ६१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण मृत्यूचा आकडा आता १ लाख ७८ हजार ७६९ वर पोहोचला असून, १२,३८,५२,५६६ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- करोना काळात प्राण गमावणाऱ्या आरोग्य योद्ध्याचं विमा छत्र मोदी सरकारनं काढलं

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील सुविधांवर प्रचंड ताण येऊ लागला आहे. बेड, आयसीयू बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यासह रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह काही राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे.

विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांशी पत्रव्यवहार केला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ऑक्सिजन तुटवडा आणि इतर सुविधांकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारला पाच महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.