महाराष्ट्रातील रेल्वे दुर्घटनेत मध्य प्रदेशचे जे १६ स्थलांतरित कामगार मालगाडीखाली चिरडून मरण पावले, त्यांनी मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारकडे परतीच्या परवान्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी नोंदणी केली होती, पण प्रशासनाने त्यावर कार्यवाही न केल्याने या कामगारांवर पायी निघण्याची वेळ आली व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा आरोप मध्य प्रदेश काँग्रेसने केला आहे.

वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, परतीचे परवाने वेळेत मिळाले असते तर १६ जणांचे जीव वाचले असते. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या ‘जंगल राज’मुळेच हे मृत्यू झाले आहेत.

सुरत जिल्ह्य़ात लाठीमार

सुरत : गुजरातेत पुन्हा एकदा सुरत जिल्ह्य़ात स्थलांतरित कामगार व पोलिस यांच्यात चकमक झाली. हाजिरा  या औद्योगिक पट्टय़ातील मोरा गावातील मजुरांनी त्यांना ताबडतोब मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था करावी किंवा कारखाने सुरू करावेत, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी त्यांना  पांगवण्यासाठी लाठीमार केला.