दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलना दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात उफाळलेल्या हिंसचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जात असल्यावरूनही त्यांनी टीका केली आहे.

प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, “शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अटक केली जात आहे, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ते हे विसरले आहेत की शेतकऱ्यांचा आवज जेवढ्या प्रमाणात दाबला जाईल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठतील.”

“भाजपा सरकारद्वारे पत्रकार व लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हे दाखल करून, त्यांन धमकावण्याचा प्रकार अत्यंत भयानक आहे. लोकशाहीचा सन्मान करणे ही सरकारची मर्जी नाही तर ती सरकारची जबाबदारी देखील आहे. भीतीचे वातावरण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.”

“भाजपा सरकारने वरिष्ठ पत्रकार व लोक प्रतिनिधींना धमकावण्यासाठी गुन्हे दाखल करून, लोकशाहीच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन करण्यासारखं आहे.” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.