किराणा व्यापारातील विदेशी गुंतवणुकीच्या प्रश्नावर काल (बुधवारी) लोकसभेत बाजी मारल्यानंतर उद्या (शुक्रवार) सरकारला राज्यसभेतही विजय विजय प्रप्त होईल असे वातावरण निर्माण झाले आहे. आज राज्यसभेमध्ये एफडीआयवर झालेल्या चर्चेमध्ये मायावती यांच्या बहुजन समाजवादी पक्षाने सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे, त्यामुळे सरकार उद्याच्या मतदानाच्या बाबतीत निश्चिंत झालं आहे.   
दरम्यान, आम्ही सरकारच्या बाजूने कधीही मतदान केले, की ‘सीबीआयच्या भीतीने उचललेले पाऊल’ अशी टीका विरोधी पक्ष करतात. त्यामुळे काल लोकसभेतून ‘वॉक आउट’ केल्यावर टिका करताना सुषमा स्वराज यांनी वापरलेल्या भाषेचा मी निषेध करते, असं मायावती म्हणाल्या.
एफडीआयप्रश्नी आज भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी आक्रमकपणे भाषण केले. बहुमतासाठी फक्त १८ मते कमी असताना तुम्ही सरकार तुमच्या मर्जीनुसार चालवू शकत नाही, असं ते म्हणाले. तसेच चीन हा भारताचा आदर्श होऊ शकत नाही कारण चीनमध्ये ‘वॉल मार्ट’ला परवानगी देण्याआधी तेथील उत्पादन क्षेत्र आपल्यापेक्षा जास्त संघटित होते, असंही ते म्हणाले. जेटली पुढे म्हणाले की, ‘एफडीआय’मुळे छोट्या मध्यस्थांऐवजी आता मोठे मध्यस्थ निर्माण होतील, जे देशासाठी आणखी घातक आहे. तुम्ही ‘एफडीआय’चे धोरण सर्वांवर लादू शकता; पण भारतीय नागरिक त्याचा कधीही स्वीकार करणार नाहीत, असं अरूण जेटली म्हणाले.  
दरम्यान, उद्या राज्यसभेत होणा-या मतदानाला समाजवादी पार्टी आपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.