बिहारच्या मुख्यमंत्री पदाची तब्बल सातव्यांदा शपथ घेतलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, असं खुद्द नितीश कुमार यांनी काल सांगितलं. त्यानंतर, आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी देखील या वृत्तास दुजोरा दिला आहे. एवढच नाही तर इच्छा नसतानाही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद का स्वीकारलं? या मागचं कारण देखील सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं आहे.

“त्यांना(नितीश कुमार) मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. भाजपा आणि जदयूच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्या नावावर व दूरदृष्टीवर निवडणूक लढवली आणि जनतेने त्यांच्यासाठी मतदान केलं आहे. अखेर जदयू, भाजपा व विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी) नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केला.” असं सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं आहे.

तर, “यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे. कोणालाही मुख्यमंत्री बनवा. कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाही” अशा शब्दांमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यावरील निर्णयाबद्दल बोलताना म्हटलं आहे.

नितीश कुमार म्हणतात, “मी दबावाखाली मुख्यमंत्री पद स्वीकारलं; कोणालाही मुख्यमंत्री बनवा मला…”

या अगोदरही बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान नितीश कुमार यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचेही नमूद केलं होतं. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्यावरुन बरीच चर्चा रंगली होती. यंदाच्या त्यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसने थेट त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश यांच्या या वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आघाडीच्या राजकारणासाठी हे चागले संकेत नाही; जदयूचा भाजपाला इशारा!

तसेच, अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूच्या सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर, जदयूकडून व्यक्त करण्यात आलेल्या नाराजीबद्दल बोलताना सुशील कुमार मोदी म्हणाले, “जदयूच्या नेत्यांनी सांगितलं आहे की, अरुणचाल प्रदेशमध्ये जे काही झाले, त्याचा परिणाम बिहार सरकार व बिहारमधील आघाडीवर होणार नाही. भाजपा-जदयू आघाडी अतूट आहे. नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार पाच वर्षे काम करेल.”

अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूच्या सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला, याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करत आहोत. आघाडीच्या राजकारणासाठी हे चागले संकेत नाहीत. असं जदयूचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी म्हटलं आहे. पाटणा येथील पत्रकारपरिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.