फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली. या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या पाच वैमानिकांचा त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विंगकमांडर अमित राजन, स्वाड्रन लिडर राहुल बसोया, पंकज भुजाडे, बी.एन.के रेड्डी आणि शशांक सिंग या वैमानिकांना हवाई दलाकडून वायूसेना पदक (मेडल ऑफ गॅलेंट्री) देण्यात येणार आहे.

२६ फेब्रुवारी बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये या वैमानिकांचा सहभाग होता. मिराज- २००० या लडाऊ विमानांच्या तुकडीने २६ फेब्रुवारीच्या रात्री बालाकोट येथे हवाई हल्ला करत तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते. भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा पार करत आठ किलोमीटरपर्यंत आतमध्ये जाऊन मिराज २००० च्या मदतीने स्पाइस २००० बॉम्ब निर्देशित करण्यात आलेल्या ठिकाणी पाडले होते. हल्ल्याच्या दिवशी ‘लो क्लाउड बेस’ म्हणजेच ढगाळ वातावरण असल्याने वैमानिकांना ‘क्रिस्टल मेज’ शस्त्राचा वापर करता आला नाही. मात्र लढाऊ विमानांमधील सहापैकी पाच स्पाइस २००० बॉम्ब या तुकडीने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रांवर टाकले.

फेब्रुवारी महिन्यात जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. एअर स्ट्राइक करत भारताने या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवला.