सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला सरकारच्या पॅनेलकडून देण्यात आला आहे. सध्या कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांनी दुसरा डोस देण्यात य़ेतो. कोवॅक्सिन लसींच्या दोन डोसमधल्या अंतरात काहीही बदल सुचवलेला नाही.

त्याचबरोबर ज्यांना करोनाची लागण झालेली आहे आणि लस घेण्याची वाट पाहत आहेत, त्यांना करोनातून बरे झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस दिली जावी असा सल्लाही सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी गृप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या पॅनेलकडून देण्यात आला आहे.

त्याचबरोबर गर्भवती महिलांना कोणतीही लस निवडण्याची मुभा असेल. तर स्तनपान देणाऱ्या महिला प्रसुतीनंतर केव्हाही लस घेऊ शकतात, असंही या पॅनेलकडून सांगण्यात आलेलं आहे. या पॅनेलकडून सुचवण्यात आलेल्या सुधारणा आता राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाकडे पाठवण्यात येईल. यावर्षीच्या मार्च महिन्यापासून केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर ४ ते ६ आठवड्यापासून ४ ते ८ आठवडे करण्यास सांगितलं होतं.

NTAGI ने दिलेल्या सल्ल्याचा विचार आता राष्ट्रीय तज्ज्ञांचा गट करेल आणि मग निर्णय घेतला जाणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यावरुनच माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, आधी दुसरा डोस ४ आठवड्यांनी दिला जात होता. त्यानंतर हा कालावधी ६ ते ८ आठवडे करण्यात आला आणि आता १२ ते १६ आठवडे झाला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे का? मोदी सरकारकडून आम्ही पारदर्शी कारभाराची अपेक्षा करावी का?