माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी दिल्लीहून अस्थी कलश आल्यानंतर भल्ला महाविद्यालयाच्या मैदानावर हर-की-पौडी पर्यंत कलश यात्रा काढण्यात आली. यादरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. या अस्थी कलश यात्रेत भाजपा कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकही सामील झाले होते.

यावेळी विधी पार पाडल्यानंतर वाजपेयींच्या मानसकन्या नमिता यांनी वाजपेयींच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या. यावेळी वातावरण अतिशय भावूक झाले होते. दरम्यान, दिल्ली येथील स्मृती स्थळाहून तीन वेगवेगळ्या कलशात अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थी देशभरातील सुमारे १०० नदींमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत.

वाजपेयींच्या स्मरणार्थ सोमवारी दिल्लीतील के.डी.जाधव स्टेडिअममध्ये सर्वपक्षीय प्रार्थना सभा होणार आहे. त्याचबरोबर सर्व राज्यांमध्ये प्रार्थना सभांचे आयोजनही करण्यात आले आहे. तत्पूर्वी अस्थी कलश शांतीकुंजचे संस्थापक पं.श्रीराम शर्मा आचार्य आणि माता भगवती देवी शर्मा यांच्या समाधीस्थळी ठेवण्यात येणार आहे.