फेसबुकद्वारे ठरलेले लग्न मोडणारच, असे निरीक्षण गुजरात हायकोर्टाने नोंदवले आहे. गुजरातमधील एका दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे मत मांडले असून पती- पत्नीने संमतीने घटस्फोट घ्यावा, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

गुजरातमधील नवसारीत राहणाऱ्या तरुणाची राजकोटमधील एका तरुणीशी २०१४ मध्ये फेसबुकवर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले आणि दोघांनीही २०१५ मध्ये लग्न देखील केले. मात्र, लग्नाच्या दोन महिन्यानंतरच दोघांमध्ये वाद सुरु झाले. वाद इतके टोकाला गेले की तरुणी तिच्या माहेरी निघून गेली. तिने पती आणि सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. २०१६ मध्ये तरुणाच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, अशी त्यांची मागणी होती. या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टाने  निर्णय दिला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार हायकोर्टाने या दाम्पत्याला सांमजस्याने वादावर तोडगा काढायला सांगितले. चांगल्या भविष्यासाठी दोघांनीही संमतीने घटस्फोट घ्यावा, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

‘आधुनिक काळात फेसबुकद्वारे लग्न ठरु लागली आहेत, पण ती फार काळ टिकणार नाही’, असे निरीक्षण हायकोर्टाने मांडले. या खटल्यातील पती व पत्नी दोघेही तरुण आहे. दोन्ही पक्षांनी वादावर तोडगा काढून घटस्फोट घ्यावा, असेही हायकोर्टाने नमूद केले. हायकोर्टाने पतीच्या कुटुंबीयांना या आरोपांमधून मुक्त केले. पतीला लक्ष्य करण्यासाठीच तरुणीने हा गुन्हा दाखल केला, असे हायकोर्टाने म्हटले आहे. तरुणीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सासरच्या मंडळींनी तरुणीचा छळ केला नसेलही. मात्र तिच्या पतीने छळ केला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधातील गुन्हा रद्द करु नये, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर हायकोर्टाने तरुणाविरोधातील गुन्हा रद्द होणार नाही, असे स्पष्ट केले.