एका क्रिकेट मॅचमधील कॅचचा व्हिडिओ पोस्ट करुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जेव्हा क्रिकेट या खेळात कॅच पकडायचा असतो तेव्हा चेंडूवर नजर आणि खेळ खेळण्याची सच्ची भावना मनात असणं गरजेचं आहे. कॅच सुटला म्हणून गणित, गुरुत्वाकर्षण, ओला-उबर अशी कारणं द्यायची नसतात. असं म्हणत प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसंच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जनहितार्थ जारी असंही त्यांनी या ट्विट सोबत लिहिलं आहे. सही कैच पकड़ने के लिए अंत तक गेंद पर नजर और खेल की सच्ची भावना होनी जरुरी है। वरना आप सारा दोष #gravity, गणित, ओला-उबर और इधर-उधर की बातों पर मढ़ते रहेंगे। भारतीय अर्थव्यवस्था के लिए जनहित में जारी। pic.twitter.com/3zqBnoIZYp — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 13, 2019 याआधीही प्रियंका गांधी यांनी फोटो ट्विट करुन मोदी सरकारवर आर्थिक मंदीवरुन निशाणा साधला होता. भारतीय अर्थव्यवस्था मंदी फेऱ्यात अडकत चालली असून, देशाचा जीडीपी (विकास दर) पाच टक्क्यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या आर्थिक संकटावरून काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सरकारवर टीका केली होती. “सरकारच्या चुकीमुळे अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाली आहे”, अशी टीका करत “यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा”, असे आवाहन सिंग यांनी केले होते. अर्थव्यवस्थेची होत असलेली घसरण आणि वाहन उद्योगावर आलेल्या आर्थिक अरिष्टावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. “लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार डोळे कधी उघडणार?”, असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला केला आहे.