जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट असताना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एकीकडे हल्ल्यावरुन राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून होत असताना आझम खान यांनी असं काही तरी होणारच होतं असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

देशातील सुरक्षा यंत्रणांना फक्त ममता बॅनर्जी, रॉबर्ट वड्रा आणि अखिलेश यादव यांच्यावरच लक्ष ठेवायला सांगितल्यानंतर अशा परिस्थितीत पुलवामासारखा हल्ला अपेक्षितच होता असं वक्तव्य आझम खान यांनी केलं आहे.

‘आपल्या ज्या काही यंत्रणा आहेत मग त्यामध्ये गुप्तचर यंत्रणाही असतील त्यांच्यावर राजकीय कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काहीजण ममता बॅनर्जींचा तपास करत आहेत तर काहीजण रॉबर्ट वड्रा आणि अखिलेश यादव यांचा तपास करण्यात व्यस्त आहेत’, असं आझम खान यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, ‘जेव्हा तपास यंत्रणांकडून त्यांचं मूळ काम काढून घेतलं जातं, आणि राजकीय काम सोपवलं जातं. तेव्हा वाईट गोष्टी होणारच’.

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. २०१८मध्ये तो जैश ए महम्मदमध्ये सामील झाला होता.

सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे.