दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ई.व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी केलेल्या विधानावरून तामिळनाडूमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. “१९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये राम आणि सीता यांचे वस्त्रहीन फोटो लावण्यात आले होते,” असं रजनीकांत म्हणाले होते. यावरून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत असून, एक गुन्हाही दाखल झाला आहे.

मागील आठवड्यात तुघलक या तामिळ मासिकाला रजनीकांत यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना रजनीकांत यांनी ई. व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी वक्तव्य केलं होतं. “१९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये रॅली काढली होती. त्या रॅलीमध्ये राम आणि सीता यांचे वस्त्रहीन फोटो लावण्यात आले होते,” असं रजनीकांत यांनी सांगितलं. त्याच्या या विधानावर द्रविड विधुतलाई कळगम या संघटनेनं आक्षेप घेत निदर्शन सुरू केले आहे. हे कार्यकर्ते रजनीकांत यांच्या घरासमोर आंदोलन करत असून, या प्रकरणात रजनीकांत यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.

मी माफी मागणार नाही-
त्या विधानाविषयी माफी मागण्याची मागणी होत असताना रजनीकांत यांनी नकार दिला आहे. पेरियार यांच्याविषयी मी जे वक्तव्य केलं आहे, ते अगदी खरं आहे. अनेक माध्यमांमध्ये ते प्रकाशित झालं आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही”, अशी भूमिका रजनीकांत यांनी घेतली आहे.